मंगळवार, ३० जून, २०२६

सांगली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेसाठी 57 हजारांहून अधिक खात्याची माहिती अपलोड - जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यात माहिती अपलोड करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील 56 हजार 962 शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभागाकडून उर्वरित प्रकरणांची पडताळणी व आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 57 हजार 112 खात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आले आहे. लेखापरीक्षण व 99.74 टक्के खाती बँकेने पोर्टलवर अपलोड केली आहेत. जिल्ह्यात केवळ 150 शेतकऱ्यांची माहिती अपलोड होणे बाकी आहे. यापैकी 12 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण प्रलंबित, तर 129 खाती मयत वारस पूर्तता न झाल्यामुळे प्रलंबित आहेत. बँकेने पोर्टलवर अपलोड केलेल्या खात्यांचा तालुकानिहाय आढावा घेतल्यास खानापूर आणि तासगाव या तालुक्यांनी 100 टक्के प्रगती साधली आहे. आटपाडी (९९.९१%), जत (९९.७५%), मिरज (९९.९५%), वाळवा (९७.९२%), कडेगाव (९९.९४%), पलूस (९९.९७%), शिराळा (९९.८७%) आणि कवठेमहांकाळ (९९.९२%) या तालुक्यांमध्येही काम अंतिम टप्प्यात आहे. वाळवा तालुक्यात 94 प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी 91 प्रकरणांमध्ये मयत वारस पूर्तता झाली नाही. त्याचप्रमाणे जत तालुक्यात 41 प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी ३८ प्रकरणांमध्ये मयत वारस पूर्तता झाली नाही. त्यामुळे त्या प्रकरणांची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा