रविवार, २५ जानेवारी, २०२६

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

देशाला, जिल्ह्याला वैभवशाली, संपन्न बनविण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होऊया - पालकमंत्री चंद्रकांत पाटील - 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण - प्रजासत्ताक दिन हा संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस - संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : प्रजासत्ताक दिनी देशाला तसेच जिल्ह्याला वैभवशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर त्यांनी सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक सागर गवते, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्यायाची व्यवस्था देणे ही एक मोठी जबाबदारी होती. स्वातंत्र्यापूर्वी राजघराणेशाही होती. स्वातंत्र्यानंतर लोकांचे लोकांसाठी राज्य आले. या अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. महिलेला पुरूषांबरोबरीचे स्थान देणे या मूळ भारतीय गाभ्याप्रमाणे या समितीमध्ये 5 महिला सदस्य होत्या, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. तर संविधान संपूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागे एक ऐतिहासिक कारण होते. 26 जानेवारी 1930 रोजी आपण लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करूनच संविधान अंमलात आणण्याचा दिवस ठरवण्यात आला, असे ते म्हणाले. भारतीय राज्यघटनेमध्ये अशी रचना करण्यात आली की भविष्यात त्यात बदल करावा लागणार नाही. राज्यघटना सोप्या शब्दात मांडलेली असून, देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना त्यात करण्यात आल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिन हा संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस आहे. अधिकारांसोबतच कर्तव्यांचे आणि कायद्याचे आदरपूर्वक पालन करणे, सार्वजनिक शिस्त राखणे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, त्यामुळेच आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, सांगली जिल्हा अमली पदार्थमुक्त करताना भावी पिढी नशामुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिलेले थोर क्रांतिकारक, शूरवीर, शहीद, महापुरूष, स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त, समाजसुधारक, शहीद जवान, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांना अभिवादन करून उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मुख्य शासकीय समारंभात प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. यावेळी विविध पथक प्रमुखांनी त्यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा दल, अग्निशमन दल, पोलीस दल बँड पथक, दंगल ‍विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जिल्ह्यामध्ये विविध शाळांमध्ये विद्यार्थीनीना कराटे प्रशिक्षण दिले जाते, याचे प्रात्यक्षिक आज सादर करण्यात आले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे, बाळासाहेब माळी यांनी केले. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. तसेच, विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हे सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे कार्यरत असताना शहीद झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री. भगत यांचे वडील शंकर भगत यांना 1 कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. दिनांक 23 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सोलापूर येथील महापुराच्या वेळी सांगली जिल्ह्यातील स्वयंस्फूर्त, स्वयंसेवक, आपदा मित्र यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल दत्ता पाटील, महेश कुमारमठ व कैलास वडर यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. शिवछत्रपती विद्यालय शिराळा शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी बालाजी पाटील, (वय वर्षे 11) याने उपवळे येथे त्याची सख्खी बहीण स्वरांजली (वय 9 वर्षे) हिला बिबट्याच्या तावडीतून वाचवल्याबद्दल तसेच परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेला विद्यार्थी प्रणव भोसले (अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी) याचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील निखील साळुंखे व नेहा ठोंबरे, राकेश दड्डणवार, राधिका पेंडसे, यांचा तसेच, नॅशनल इन्स्टिट्युट फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च सेंटर सांगली, युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था सांगली, या संस्थांचा सहाय्यक कृषि अधिकारी सर्वश्री गोरख जरे, गजानन अजेटराव, उमेश साळे तसेच विजया राठोड, जिल्हा संसाधन व्यक्ती राहूल ठोंबरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस विभागाकडील विविध कामगिरीमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक सर्वश्री सतीश शिंदे, संजीव झाडे व मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, संदीप शिंदे, त. अधिकारी संतोष यादव व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कोळेकर यांचाही सन्मान करण्यात आला. 00000

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

श्री गुरु तेज बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या समागम निमित्त माहिती देणारी क्रमशः मालिका

(विशेष लेख मालिका भाग 3) श्री गुरु तेज बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या समागम निमित्त माहिती देणारी क्रमशः मालिका ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमिवर नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम होत असून, नांदेड येथील कार्यक्रम येत्या दि. 24 व 25 जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमिवर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनचरित्राची क्रमशः माहिती…. गुरुगद्दीचा प्रकाश गुरु तेज बहादुर यांचे नाव पंजाब आणि भारताच्या अनेक भागांत पसरले. जेव्हा त्यांनी 'गुरु' असल्याचा अधिकार मान्य केला, तेव्हा त्यांच्या गुरुगद्दीचा प्रकाश सर्व समुदायासाठी आनंदाचा विषय ठरला. ते नेहमी गुरूच्या भल्यासाठी वेळ घालवत आणि गुरूंचा आशीर्वाद त्यांना २२ पौर्णिमा मिळाला. ते काही काळ स्थिर राहून काम करत राहिले. पण, त्यात त्यांना लोभ आला आणि त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही व गुरूच्या आदेशांचे पालन करू शकले नाही. एका दिवशी त्यांनी महंत आत्मारामांना असे बोलले जे चांगल्या हेतूने नव्हते. गुरु तेज बहादूर यांनी प्रेमाने समजावून सांगितले की, श्री गुरु ग्रंथ साहिबकडून विचार (वाचून) मनातील मलिनता दूर करावी. "जर तुम्ही वचन दिले असेल तर का पाळत नाही? गुरूची सेवा करण्याचे वचन पूर्ण करा. गुरूंना दिलेले कधीही वाया जात नाही. ही गोष्ट त्यांना पटली, त्यांनी नम्रतेने मान्य केले कि त्यांनी गुरूचा अनादर केला. गुरु लाहे रे, गुरु लाहे रे | क्षमा करणे सर्वात मोठा गुण आहे भाई मक्खन शहा यांनी "गुरु लाहे रे" या ओव्या देऊन गुरुजींना उपहार दिला. तरीही गुरु तेज बहादुर यांनी बाबा मलिकच्या प्रामाणिकपणाला प्राधान्य दिले. पीर मलिकच्या सेवकांनी गुरु साहिबकडे मागणी केली की, त्यांची चूक माफ केली जावी. गुरु साहिबांनी सर्वांना प्रेमाने समजावले. "माझ्या मनात कोणाविषयी द्वेष नाही. मला सर्व मानव समान आहेत. "भाई मक्खन शहा यांनी हे सगळे वचन लिहून मंडपात ठेवले आणि गुरु साहेबांकडून माफी मंत्र मागितला. जे लोक घर अन् प्रदेश सोडत होते, त्यांनाही क्षमा केली आणि त्या परिवारांना श्री गुरु ग्रंथ साहिब" चे स्वरूप देऊन आदर केला. त्यांनी लोकांना गुरुची सेवा करण्याचे महत्त्व शिकवले. कृपा करणे (क्षमा करणे) हा एक गुण आहे; तो सर्वोच्च परोपकार आहे. तो जगातील द्वेष नष्ट करून प्रेमाला जन्म देतो. ही अशी प्रकाशमयता आहे, जिला अंधार दूर करतो. सर्व लोक गुरु सारखे उदार असू शकत नाहीत. क्षमा करणे हे सोपे नाही, तर महानतेचे चिन्ह आहे. शीखांना बळकट करणे गुरु तेज बहादूर यांनी गुरु हरिगोविंद यांच्या प्रेरणेद्वारे १६६४ मध्ये शीख संघटना स्थापन केली. त्यांनी नानोलाची संपूर्ण जबाबदारी दूरदूरच्या भागातील शीखांना आणि त्याच्या माळी (सेवक) ला देऊन शीखांच्या सेवेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले होते. त्यांनी शीख संघटनांना (समाजाला) मजबूत करण्यासाठी वेगवेगळे धर्मप्रचारक सर्व दिशांना पाठवले आणि आपल्या दयाळू स्वभावाने सर्व लोकांना एकजूट केले. धार्मिक आणि सामाजिक विधींचे योग्य स्वरूपात रूपांतर करून, संदेश दुर्गम भागात पोहोचवला गेला. अनुयायांनी अथक परिश्रमपूर्वक सेवा केली आणि गुरुसाहेबांना अनेक मौल्यवान संदेश आणि अहवाल पाठवले गेले. (माहितीस्त्रोत - https://gurutegbahadurshahidi.com/) 00000

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

(विशेष लेख मालिका भाग 2) श्री गुरु तेज बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या समागम निमित्त माहिती देणारी क्रमशः मालिका

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमिवर नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम होत असून, नांदेड येथील कार्यक्रम येत्या दि. 24 व 25 जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमिवर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनचरित्राची क्रमशः माहिती…. तेज के धनी १६२८ मध्ये दिल्लीमध्ये त्या वेळच्या सरकारशी तणाव निर्माण झाला. अमृतसर देखील या तणावाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला. अमृतसरची परिस्थिती खराब होताच गुरु हरिगोविंद जी यांनी पंजाबमध्ये करतारपूर साहिब नावाचे एक नवीन केंद्र स्थापन केले आणि पुन्हा तिथे तीन दशके राज्य केले. १६३५ मध्ये करतारपूर युद्धात गुरु हरिगोविंद जी आणि त्यांचे पुत्र शूरतेने लढले. त्यात गुरु तेज बहादूर (त्या वेळी त्यागमल) यांनीही अत्यंत रोमांचक साहस दाखवले. त्यांनी स्वतःच्या तगड्या हातात तलवार धरून शत्रूंशी लढा दिला. त्यांनी गंभीर जखमा देखील घेतल्या. त्यांचे शौर्य पाहून गुरु हरिगोविंद यांनी त्यांना 'तेज बहादूर' (तलवारधारी) असा सन्मान दिला. बाबा बकाला येथे वास्तव्य करतारपूर युद्धानंतर गुरु हरिगोविंद यांनी परिवारासोबत कीरतपूर साहिब येथे वास्तव्य केले. गुरु तेज बहादूर आणि माता गुजरीही देखील तिथे आले. गुरु हरिगोविंद यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी गुरु तेज बहादूर आणि माता नानकी यांनी घेतली. १६४४ मध्ये गुरु हरिगोविंद साहिब यांचे देहावसान झाल्यानंतर गुरु तेज बहादूर आणि त्यांच्या पत्नी यांनी करतारपूर सोडून आपले ननिहाल (आजोळ) असलेले गाव “बाबा बकाला” (अमृतसर जिल्हा) गावात वास्तव्य केले व तिथे ते तपस्या व भक्तीत लीन झाले. गुरु-रूपात दिल्ली येथे गुरु हरिगोविंद साहिब यांचे देहावसान झाल्याची बातमी येताच गुरु तेज बहादूर म्हणाले - "बाबा बकाला, बाबा बकाला, बाबा बकाला, घर बैठ गुरसिख आप मिलाए।" यानंतर त्यांनी कोणताही जाहीरनामा किंवा घोषणा केली नाही; घरातच साधना करत राहिले. बाबा बकाला गावात अनेक दावेदार तयार झाले. जेथे लोकांना वाटले की आता त्यांना गुरु घोषित करतील. पण खरी अनुभूती गुरु तेज बहादूर यांच्यावरच आली. त्यांची नम्रता, शांत स्वभाव आणि तपस्या यांनी शीख समाजात त्यांना आदर प्राप्त झाला. अमृतसरचे भक्त भाई मक्खन शहा लबाना बाबा बकाला येथे आले. त्यांनी मनापासून प्रार्थना करत त्या खोलीत प्रवेश केला, जिथे गुरु तेज बहादूर ध्यानात होते. मक्खन शहा लबाना यांना प्रथम त्यांची ओळख पटली नाही, पण नंतर मनापासून बघितल्यावर त्यांना दिव्य संकेतांनी त्यांची खरी ओळख कळाली. त्यांना गुरु म्हणून मान्य करून त्यांनी गुरु तेज बहादूर यांना संपूर्ण सन्मान व विश्वसनीयतेने शीख जगतात नववे गुरु म्हणून घोषित केले. (माहितीस्त्रोत - https://gurutegbahadurshahidi.com/) 00000

सांगली पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मादी गव्याचे वाचवले प्राण

सांगली पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मादी गव्याचे वाचवले प्राण सांगली, दि. 13 (जि.मा.का.) : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे वाहन अपघातात इजा झालेल्या मादी रानगव्यावर वनखाते कोल्हापूरकरिता सांगली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांनी सिझेरीन ऑपरेशन करून तिचा जीव वाचविला. वाहन अपघातात इजा झालेल्या मादी रानगव्यावर कडगाव येथे डॉ. संतोष वाळवेकर यांच्या कॉलवरुन मिळालेल्या माहितीनुसार उपचार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातून पशुसंवर्धन विभागाची टीम तेथे हजर झाली. तपासणीदरम्यान मादी गाभण असल्याचे जाणवले. पण वासराची हालचाल मंदावली होती. अंतर्गत इजा व रक्तस्त्राव झाला असल्याने गव्याचा जीव वाचवण्यासाठी सिझर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन विभाग वाळवा व वनविभाग कोल्हापूर यांच्या टीमने हे ऑपरेशन यशस्वी पार पाडले. त्यासाठी डॉ. सचिन वंजारी, डॉ संतोष वाळवेकर, डॉ. अंबादास माडकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. प्रविण निमसे, मुकुंद वाटेगावकर या सर्वांनी मिळून गव्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. सिझरनंतर आज गव्याच्या स्थितीमधे सुधारणा झाली आहे. तिचा प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अजून उपचार सुरु असल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले. 00000

अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाच्या कारवाईत सव्वा कोटींचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त, १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाच्या कारवाईत सव्वा कोटींचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त, १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करण्यासाठी स्थापन विशेष भरारी पथकाने सांगली जिल्ह्यात तीन दिवसात केलेल्या धडक कारवायामध्ये रु. १ कोटी, २३ लाख, ८५ हजार ,६४० रूपयांचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त करून १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे कि, अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनात राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात स्वतंत्र विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे प्रमुख भंडारा जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) यदुराज दहातोंडे यांनी पथकातील इतर अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर व मंगेश लवटे यांच्यासह सांगली जिल्ह्यामध्ये दि. 9 ते 12 जानेवारी 2026 या 3 दिवसात कारवाया केल्या. सांगली जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री. समुद्रे व नि. सु. मसारे तसेच स्थानिक अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासमवेत नियोजनबद्ध कारवायात त्यांनी प्रतिबंधित अन्न वाहतूकदार व विक्रेत्यांवर धडक कारवाया करून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. मगरमच्छ कॉलनी येथे वाहन क्र. एम एच १० सी आर ६४६० या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला किंमत २४,९०,४४०/-रु चा साठा व रु. ६,००,०००/-असा एकूण रु. ३०,९०,४४०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखु, पानमसाला व वाहन इत्यादी साठा सील करण्यात आला आहे व ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिरज म्हैसाळ रोड येथे वाहन क्र. के ए १३ सी ८०७४ या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला किंमत ७६,९५,२००/- रु. चा साठा व रु. १६,००,०००/- असा एकूण रु. ९२,९५,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पानमसाला व वाहन इत्यादी साठा सील करण्यात आला आहे व ७ आरोपींविरुद्ध ( खरेदीदार, वाहतूकदार, पुरवठादार, उत्पादक) गुन्हा दाखल करण्यात आला. तीन दिवसात केलेल्या धडक कारवायामध्ये रु. १ कोटी, २३ लाख, ८५ हजार ,६४० रूपयांचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त करून १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन, सांगली येथील अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, धनंजय आघाव, सुमित खांडेकर, तुषार घुमरे, प्रणव जिनगर यांनी सक्रिय सहभाग घेतला. 00000

सांगली आकाशवाणीत नैमितिक उद्घोषकासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत

सांगली आकाशवाणीत नैमितिक उद्घोषकासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे नैमितिक उद्घोषक निवडण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2026 असल्याचे सांगली आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी तेजा दुर्वे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, आकाशवाणी सांगली कैद दैनंदिन प्रसारणासाठी उद्‌घोषकांचे पॅनल करू इच्छिते. लेखी परीक्षा, स्वर परीक्षा, मुलाखत या माध्यमातून समनुदेशिती अर्थात असायनींच्या पॅनेलमध्ये निवड झालेल्यांना नैमितिक उद्घोषक म्हणून काम करता येईल. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही प्रक्रिया कोणत्याही नियमित नोकरीसाठी नाही हे लक्षात घ्यावे. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना प्रसारणाच्या आवश्यकतेनुसार फक्त आणि फक्त जेव्हा अशी आवश्यकता असेल तेव्हाच प्रसारण कार्यासाठी बोलवण्यात येईल. उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर २०२५ रोजी २० ते ५० वर्षे असावे. उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर, प्रसारणयोग्य आवाज, उमेदवार सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील राहणारा असावा अशी आवश्यक पात्रता आहे. या प्रक्रियेला अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रुपये ३००/- + जीएसटी (१८ टक्के) म्हणजेच एकूण रु. ३५४/- एवढे शुल्क आकारले जाईल. अर्जाचा नमुना तसेच ऑनलाईन प‌द्धतीने शुल्क भरणे यासाठीचे पेमेंट डिटेल्स विभाग खोली क्र. २५ आकाशवाणी केंद्र, सांगली, कोल्हापूर रोड, सांगली ४१६४१६ येथे २१ जानेवारी २०२६ पर्यंत सुट्टीचे दिवस तसेच शनिवार, रविवार वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. प्रक्रियेचा तपशील जाणून घेण्यासाठी संपर्काचा दूरध्वनी क्र. ०२३३-२३३२८८३असा आहे. 00000

धामणी रोड येथील हसरा चौक रस्ता 17 ते 22 जानेवारीदरम्यान वाहतुकीस बंद

धामणी रोड येथील हसरा चौक रस्ता 17 ते 22 जानेवारीदरम्यान वाहतुकीस बंद सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी धामणी रोड येथील हसरा चौक हा रस्ता दिनांक 17 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत अटी व शर्तीच्या अधिन राहून वाहतुकीस बंद करून सदर वाहतूक पर्यायी वाहतूक मार्गावरून वळविण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. पर्यायी वाहतूक मार्ग (१) इनाम धामणीकडून सांगली शहरात येणाऱ्या वाहनांसाठी - इनाम धामणी- हॉरिझोन्टल हॉस्पिटल -डावीकडे वळून उषःकाल हॉस्पिटल - तक्षशिला रोड – १०० फुटी मार्गे शहरात जाता व येता येईल. (2) इनाम धामणीकडून सांगली शहरात येणाऱ्या वाहनांसाठी - इनाम धामणी - जुना जकात नाका -वसंतराव शिंदे मार्ग - लिमये चौक- स्फूर्ती चौक - एम.एस.ई.बी. रोड मार्गे शहरात जाता व येता येईल. (3) शांतीबन चौकाकडून इनाम धामणी रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - शांतीबन चौक १०० फुटी रोड - डी-मार्ट पुढे डावीकडे वळून तक्षशिला रोड- उषःकाल हॉस्पिटल - हॉरिझोन्टल हॉस्पिटल - उजवीकडे वळून धामणीकडे जाता व येता येईल. 00000