sangmahiti
शनिवार, २५ जुलै, २०२६
कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र 37865 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर
- पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र सभासद शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँकेकडील एकूण 37 हजार 865 लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील आपले सेवा केंद्र येथे जावून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पात्र सभासद शेतकरी यांची यादी ग्रामपंचायत, गाव तलाठी कार्यालय, विकास सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँक यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तालुकानिहाय पात्र सभासद शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे. शिराळा 1425, सांगली 17, वाळवा 3481, मिरज 5403, आटपाडी 1725, कवठेमहांकाळ 2872, विटा 1617, पलूस 2516, कडेगाव 1795, तासगाव 5496, जत 11 हजार 518.
000000
टेंभू- म्हैसाळच्या विस्तारित योजनेचे पाणी लाभक्षेत्रात पोहोचवण्यासाठी लवकरच बैठक -जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे -पाटील
- कृष्णा नदीवरील प्रस्तावित बॅरेजची मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडून पाहणी
- पूरस्थिती निर्माण होवू नये, यासाठी उपाययोजनांवर भर
सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : टेंभू- म्हैसाळच्या विस्तारित योजनेचे पाणी लाभ क्षेत्रात पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लवकरच बैठक घेण्यात येईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
टेंभू व म्हैसाळ योजनेद्वारे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात कृष्णा नदीचे पाणी पोहोचवून शेतीला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु ज्या भागांमध्ये या योजनेचे पाणी पोहोचलेले नाही, त्या भागात विस्तारित योजनेची कामे प्रगती पथावर आहेत. या योजनेचे पाणी सर्व लाभक्षेत्राला देण्यासाठी या कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा केला. तसेच,सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील वारणा व कृष्णा नदीच्या संगमाच्या खालील बाजूस प्रस्तावित द्वारयुक्त बंधाऱ्याच्या (बॅरेज) ठिकाणची पाहणी व म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक 1 ला मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार सर्वश्री पृथ्वीराज देशमुख, उल्हास दादा पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता महादेव कदम, कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे, सीमा मोहिते आणि अमोल गुरव तसेच संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, टेंभू, म्हैसाळ सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि अत्याधुनिक क्षमतेची पाणीउपसा यंत्रणा उभी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात असून उपसा सिंचन योजना, केटी वेअर बंधारे, सिंचनाच्या योजना निर्माण केल्या जात आहेत. यामुळे शेतकरी सुखावला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढत चालली असून विस्तृत भागाला पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उपाययोजना करण्याचा जलसंपदा विभागाच्या वतीने प्रयत्न केला जात असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.
अलमट्टीमुळे कोल्हापूर व सांगलीत पूरस्थिती निर्माण होवू नये, यासाठी उपाययोजनांवर भर
अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये समन्वय ठेवण्यात येत आहे. पूर परिस्थितीवरील उपाययोजनांसाठीच्या अहवालावर अभ्यास करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.
म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 ला भेट
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 ला भेट देऊन पाहणी केली. म्हैसाळ प्रकल्पातील सर्व टप्प्यातील सर्व पंप मागणीनुसार सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सध्या प्रगतीपथावर असलेली म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना ही मुख्यमंत्री वॉर रुम मध्ये असल्याने या प्रकल्पाला गती मिळाली आहे. यामुळे प्रकल्पातील भूसंपादन, वन विभाग तसेच इतर विभागांकडून जलद गतीने सहकार्य प्राप्त झाले आहे. या सर्वांमुळे मागील २ वर्षातच योजनेची शिर्षकामे ९५ टक्के पर्यंत पूर्ण झाली असून कालवा कामे ४६ टक्के पूर्ण झाली आहेत.
या भेटींदरम्यान जलसंपदा विभागाच्या योजनांच्या सद्यस्थितीची माहिती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनी दिली.
बॅरेजमध्ये रुपांतर केल्यानंतर होणारे फायदे -
प्राथमिक अभ्यासातून को. प. बंधारा सांगलीचे बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी मौजे हरिपूर येथील कृष्णा व वारणा नदीच्या संगमापुढील बाजूचे स्थान निश्चित केले आहे.
- यामुळे सांगली शहराच्या सिंचन व बिगर सिंचन गरजांसाठी सुमारे २० आठवड्यांचा पाणीसाठा उपलब्ध होईल.
सांगली को.प. बंधाऱ्याचे आधुनिक रेडियल गेटयुक्त बॅरेजमध्ये रुपांतरण केल्यामुळे पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन शाश्वती निर्माण होईल.
* औद्योगिक क्षेत्रांना वर्षभर विश्वासार्ह जलपुरवठा मिळेल.
* म्हैसाळ उपसा सिंचन योजनेस आवश्यक जलपातळी उपलब्ध राहील.
* उन्हाळ्यात कृष्णा नदीतील जलउपलब्धता वाढेल.
* आधुनिक गेट प्रणालीमुळे जलनियमन अधिक सुरक्षित, जलद व कार्यक्षम होईल.
* पूरकाळात नदीतील प्रवाह व्यवस्थापन सुधारून पाण्याचा फुगवटा कमी होण्यास मदत होईल.
***
बुधवार, २२ जुलै, २०२६
शिराळा तालुक्यात 14.3 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 14.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.0 (202.2), जत 0.4 (158.2), खानापूर 2.5 (210.3), वाळवा 5.0 (278), तासगाव 0.9 (210.5), शिराळा 14.3 (552.2), आटपाडी 9.2 (175.3), कवठेमहांकाळ 0.9 (131.4), पलूस 2.3 (199), कडेगाव 4.3 (218.1).
00000
वारणा धरणात 24.52 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24.52 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 63.96 (105.25), धोम 8.90 (13.50), कन्हेर 9.06 (10.10), धोम बलकवडी 3.51 (4.08), उरमोडी 6.69 (9.97), तारळी 3.60 (5.85), वारणा 24.52 (34.40), राधानगरी 6.85 (8.36), दूधगंगा 10.39 (25.40), तुळशी 2.26 (3.47), कासारी 1.85 (2.77), पाटगांव 2.11 (3.72), अलमट्टी 101.37 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे - कण्हेर धरणातून 340, धोम बलकवडी 962 व अलमट्टी धरणातून 16 हजार 373 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 10 (40) व अंकली पूल हरिपूर 12.08 (45.11).
00000
विविध योजनांच्या लाभातून समाज सुखी राहण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उद्घाटन
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : नागरिकांच्या रोजच्या जीवनात लागणारे विविध दाखले, विविध योजनांचा लाभ तात्काळ व वेळीच मिळावा या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन केले आहे. अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिकांना फायदा घेता येतो. प्रशासनाने विविध योजनांचा लाभ नागरिकांना देऊन समाज सुखी कसा राहील यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 282 सांगली विधानसभा मतदारसंघात मल्हार हॉल, बालाजी मिल रोड, शिवाजीनगर, सांगली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, उपजिल्हाधिकारी विजया यादव, मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव, मुद्रांक जिल्हाधिकारी प्रमोद कदम, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समाजकल्याण समिती सभापती गीता पवार, सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे, माजी आमदार दिनकर पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानुसार लोकांची सेवा करणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात लावण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना आवश्यक असणारे दाखले व अन्य लाभ घ्यावेत. सुविधा केंद्र, शिबीरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त दाखले देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक असलेले दाखले तसेच मुलांचे जातीचे दाखले शाळेत असतानाच विहीत वेळेत काढून घ्यावेत. शेतकरी व महिला हे दोन घटक मजबूत झाले तर समाज मजबूत होईल यासाठी शेतकरी व महिलांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार सुधीर गाडगीळ व सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समाजकल्याण समिती सभापती गीता पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हा सतत चालणारा कार्यक्रम आहे. या अभियानाचा उद्देश महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. महसूल विभाग नियमित सेवा देत असतो. पाणंद रस्ते, मोजणी, रेखांकन, तुकडेबंदी आदी विविध प्रकरणे निर्गत करण्यात येत आहेत. या शिबीरामध्ये विविध विभागांचे स्टॉल लावले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात जातीचे दाखले वाटप, आधार केंद्राच्या किटचे वाटप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व मुद्रांक नोंदणी विभागाकडील लाभाचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले.
या शिबीरात विविध विभागांचे 14 स्टॉल लावण्यात आले असून या स्टॉलना पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी भेट देवून नागरिकांना देण्यात येणाऱ्या लाभांबाबत माहिती जाणून घेतली.
प्रास्ताविकात सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण, भूसंपादन प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून दप्तर अद्ययावत करणे, सातबारा मधील त्रुटींची दुरूस्ती करून दूरूस्त सातबारा देणे, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत वारस नोंदी, पात्र अ.पा.क. नोंदी कमी करणे, ए.कु.में. नोंदी कमी करणे, नजर गहाण इत्यादी नोंदीबाबत कार्यवाही, डिजीटल सातबाऱ्याच्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती करणे, अकृषक तरतुदीतील सुधारणांबाबत मार्गदर्शन करणे, ई-मोजणी सेवा, ॲग्रीस्टॅक नोंदणी, पी. एम. योजनेशी संबंधित कामे इत्यादी विविध विभागांकडून लाभ देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास विविध विभांगाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
मंगळवार, २१ जुलै, २०२६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या योजनेअंतर्गत आधुनिक सिंचन सुविधा, शेतीपूरक साधने आणि कृषी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरीसाठी 4 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 90 टक्के अनुदान अथवा कमाल 2 लाख रुपये (आकारमानानुसार अनुदान देय), इनवेल बोअरिंग व पंप संच 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत 90 टक्के अनुदान अथवा 40 हजार रुपये, पीव्हीसी/एचडीपीई पाईप व सोलर पंपासाठी 100 टक्के अनुदान अथवा 50 हजार रुपये, ठिबक व तुषार सिंचन संचासाठी 90 टक्के अनुदान किंवा 47 हजार रूपये व 97 हजार रूपये (पूरक अनुदान), कृषी यंत्रसामग्रीसाठी 50 हजार रूपये व परसबाग विकासासाठी 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (www.mahadbt.maharashtra.gov.in) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर जमीनधारणा असावी. दारिद्र्यरेषेखालील (BPL) लाभार्थ्यांना जमीन मर्यादेची अट लागू राहणार नाही. निवड प्रक्रिया "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" (FCFS) या तत्त्वावर होणार असून महिला, दिव्यांग व बीपीएल शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. मंजूर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
00000
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 22 जुलैला सांगलीत
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 22 जुलैला सांगलीत
- नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' आयोजित करण्यात येत आहे. 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी हे विशेष शिबीर दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 पर्यंत मल्हार हॉल, बालाजी मिल रोड, शिवाजीनगर, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव आणि सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
या अभियानास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर उपस्थित राहणार आहेत.
या अभियानाचा उद्देश महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. या अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण, भूसंपादन प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून दप्तर अद्ययावत करणे, सातबारा मधील त्रुटींची दुरूस्ती करून दूरूस्त सातबारा देणे, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत वारस नोंदी, पात्र अ.पा.क. नोंदी कमी करणे, ए.कु.में. नोंदी कमी करणे, नजर गहाण इत्यादी नोंदीबाबत कार्यवाही, डिजीटल सातबाऱ्याच्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती करणे, अकृषक तरतुदीतील सुधारणांबाबत मार्गदर्शन करणे, ई-मोजणी सेवा, ॲग्रीस्टॅक नोंदणी, पी. एम. योजनेशी संबंधित कामे इत्यादी विविध विभागांकडून लाभ देण्यात येणार आहे.
याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि सेवा हमी कायद्यानुसार देय असलेल्या सेवांचा लाभ नागरिकांना घेता येईल. मिरज तालुक्यातील प्रत्येक विभागाचा एक स्टॉल लावण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार असून 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव आणि सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी केले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)