sangmahiti
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६
मुद्देमाल हस्तांतरणातून नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास दृढ - विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा
- चार कोटींचा मुद्देमाल हस्तांतरीत
- 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदी परत
- 283 मोबाईल, 24500 किलो बेदाण्याचा समावेश
सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 24 तास कार्यरत असलेल्या पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुन्ह्यांच्या तपासात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियमानुसार हस्तांतरण करण्यासाठी घेण्यात आलेला मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम हा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या विश्वासाला बळ देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. खरे क्लब हाऊसच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी व मुद्देमालाचे विश्वस्त-मालक उपस्थित होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा या दोन्ही बाबींसाठी पोलीस दल कर्तव्यदक्ष आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. केंद्र शासनाचे पोर्टलच्या माध्यमातूनही कार्यवाही केली जात आहे. आज 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदी व 283 मोबाईल आणि 24500 किलो बेदाणा असा जवळपास 4 कोटी रूपयांचा मुद्देमाल परत देण्यात येत आहेत. या माध्यमातून नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास निश्चितच वृद्धिंगत होईल, असे ते म्हणाले.
नागरिकांनीही दक्ष राहून गुन्हा घडला तर 112 क्रमांकावर तक्रार करावी. तपासासाठी सहकार्य व पाठपुरावा करावा, असे स्पष्ट करून विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांनी मुद्देमाल हस्तांतरणाचे उद्दिष्टनिहाय काम करावे. महिनावार संबंधितांचे ऐवज परत करावेत. आपल्या माध्यमातून संबंधित पीडिताला दिलासा द्यायचे काम होते, याची जाणिव ठेवून पोलीस दलावरील नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे सांगून त्यांनी गुन्ह्याचा योग्य वेळी छडा लावून, मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल व सदर मुद्देमाल हस्तांतरणाचा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि गुन्हे अन्वेषण हे पोलिसांचे प्रमुख काम असले तरी गुन्ह्यातील संपत्ती संबंधितास परत केला तर पीडितास खऱ्या अर्थाने न्याय मिळतो. दागिने हा केवळ ऐवज नसून, संबंधितांची भावनिक गुंतवणूक त्यात झालेली असते. मूर्ती, दागिने यांना सांस्कृतिक महत्त्वही असते. त्यामुळे हा मुद्देमाल परत करताना संबंधिताचे भावनिक मूल्य परत केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविकात अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक अभिलेख आणि नियमित पडताळणी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले. आभार मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी मानले.
पोलिसांप्रती कृतज्ञता
कवठेमहांकाळचे डॉ. म्हेत्रे यांच्या घरात 14 सप्टेंबर 2025 रोजी स्पेशल 26 या चित्रपटासारखी घटना घडली. त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचा चमू आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी दोन ते तीन दिवसात मुद्देमाल परत मिळवला. आज त्यांना तो परत देण्यात आला. याबद्दल त्यांनी पोलीस विभागातील सर्व टीमचे आभार व्यक्त केले.
रमाबाई शिवाजी गायकवाड (रा. बाणूरगड) यांचे गंठण हा त्यांच्यासाठी केवळ दागिना नव्हता. त्यांच्या वडिलांनी दिलेले आशीर्वाद होते. त्यामुळे दीड वर्षापूर्वी जेव्हा गंठण हरवले, तेव्हा त्या व्यथित झाल्या. आज त्यांना गंठण परत सुपूर्द केल्यानंतर त्यांनी पोलीस विभागाचे विशेष आभार व्यक्त केले.
बिरोबा देवस्थानचे दागिने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवले जात असत. मात्र, साधारण सहा महिन्यांपूर्वी त्या बँकेच्या शाखेतच दरोडा पडल्याने देवस्थानचे दागिने लुटले गेले. सांगली जिल्ह्यामध्ये घडलेल्या या मोठ्या चोरीचा छडा जिल्हा पोलीस दलाच्या नेतृत्त्वाखाली दोन महिन्यातच लावला गेला. हा मुद्देमाल आज परत ताब्यात देण्यात आला. त्यासाठी बिरोबा देवस्थान व ट्रस्टच्या वतीने विभूतवाडीचे माजी सरपंच व देवस्थानचे पुजारी चंद्रकांत पावणे यांनी पोलीस दलाचे आभार मानले.
एकूणच सांगलीसारख्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सातत्याने आव्हाने असलेल्या जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ अंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया न राहता पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख पोलीस व्यवस्थेचा संदेश देणारा ठरला आहे.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने
कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ
सांगली जिल्ह्यातील 21,725 शेतकऱ्यांची 156.54 कोटींची कर्जमाफी
सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ आज डिजिटल पद्धतीने करण्यात आला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21 हजार 725 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 156.54 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली तसेच संबंधित अधिकारी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 हजार 726 लाभार्थ्यांच्या खात्यावर 132.85 कोटी रुपये, तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 1 हजार 999 लाभार्थ्यांच्या खात्यावर 23.69 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील 68 हजार 981 पात्र कर्जखाती शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 56 हजार 962, तर राष्ट्रीयकृत बँकांची 12 हजार 19 कर्जखाती आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील 38 हजार 410 पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होती. त्यापैकी 31 हजार 944 पात्र लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अद्याप 6 हजार 418 पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 5 हजार 598 लाभार्थ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांपैकी 4 हजार 509 लाभार्थ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.
ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक क्रमांक काढलेला नाही, त्यांनी आपल्या नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन ॲग्रीस्टॅक क्रमांक काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
तसेच जिल्ह्यातील 1 हजार 676 पात्र शेतकरी मयत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांच्या वारसांनी महसुली दप्तरी वारस नोंद करून त्याची पूर्तता संबंधित सेवा संस्था तसेच राष्ट्रीयकृत बँकेत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांवर सहकार विभागातील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत पात्र शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित तालुक्यातील उप निबंधक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.
000000
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करा - उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे
सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : कला व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना प्रतिमहिना 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. इच्छुक पात्र साहित्यिक व कलावंतांनी 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मुळ दस्ताऐवजासह आपले सरकार पोर्टलवर http://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांगांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे (दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्षे). कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे योगदान, ज्यांनी साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे, वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा/परितक्त्या/दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील, कलाकाराचे सर्व मार्गानी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रूपये पेक्षा जास्त नसावे, ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार, कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. आदी अटी लागू आहेत.
अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञा पत्र, पती व पत्नी एकत्रीत फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास), राज्य किंवा केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था /व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास), विविध पुरावे आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
00000
आदिशक्ती पुरस्कारात येडेनिपाणी ग्रामपंचायत व्दितीय, कवठेपिरान तृतीय
सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या ‘आदिशक्ती अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची घोषणा करण्यात आली असून, सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी व कवठेपिरान या दोन ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) सोमनाथ रसाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
यामध्ये येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत 10 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. तर कवळठेपिरान (ता. मिरज) ग्रामपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक मिळवून 7 लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले
याशिवाय अभियानांतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास 5 लाख, द्वितीय क्रमांकास 3 लाख आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावर प्रथम क्रमांकास 1 लाख, द्वितीय क्रमांकास 50 हजार आणि तृतीय क्रमांकास 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांक कवठेपिरान, व्दितीय येडेनिपाणी तर तृतीय क्रमांक अंबक (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीस मिळाला आहे.
तालुकानिहाय तालुकास्तरीय प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायती अनुक्रमे पुढीलप्रमाणे – आटपाडी – राजेवाडी, पळसखेळ, निंबवडे. जत – रावळगुंडवाडी, बनाली, आसंगी जत. कडेगाव – अंबक, बेलवडे, चिंचणी वांगी. कवठेमहांकाळ – करलहट्टी, आगळगाव, धुळगाव. खानापूर (विटा) – गार्डी, वाझर, बामणी. मिरज – कवठेपिरान, सावळवाडी, बामणोली. पलूस – आमणापूर, भिलवडी, आंधळी. शिराळा – शिरशी, करमाळे, मांगरूळ. तासगाव – हातनूर, बलगवडे, गव्हाण. वाळवा – येडेनिपाणी, पेठ, महादेववाडी.
आदिशक्ती पुरस्कारांतर्गत सांगली जिल्ह्याला एकूण 38 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त होणार असल्याचे प्रसिध्दीपप्कात म्हटले आहे.
00000
महसूल विभागाने सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न करावेत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : महसूल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या विभागाचा सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंध येतो. त्यामुळे या विभागाने आपल्या उत्तरदायित्वाची जाणिव ठेवून सामान्य माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी नीता शिंदे आणि विजया यादव व्यासपीठावर उपस्थित होते.
महसूल दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या महसूलमंत्री पदाच्या कार्यकालात ऑनलाईन सात बारा चा निर्णय घेतला. राज्यातील अडीच कोटी सात बारा ऑनलाईन करण्यात आले. याचबरोबर महसूल विभागाच्या अनेक सुविधा ऑनलाईन करण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांना घरात बसून या सेवांचा लाभ घेता येत आहे, असे ते म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नागरिकांच्या अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये महसूल विभागाची भूमिका केंद्रस्थानी असते. जनतेच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणारा आणि शासनाची प्रतिमा उजळवणारा हा विभाग आहे. त्यामुळे, प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेने पार पाडावी, कामातील दिरंगाई टाळावी, असे सांगून कोणतीही अडचण आली तर ती सोडवू, असे सांगून त्यांनी प्रशासनाच्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, महसूल यंत्रणा शासनाचा महत्त्वाचा विभाग असून, शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, पारदर्शक प्रशासन राबविणे आणि नागरिकांना वेळेत सेवा देणे ही महसूल विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. आगामी काळात सर्वांनी पारदर्शी व लोकाभिमुख सेवा द्याव्यात, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. खानापूर-विटाचे तहसीलदार योगेश टोंपे, मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय तोडकर, महसूल सहाय्यक कमलेश डाळिंबे तसेच, महसूल सेवक (कोतवाल) संघटनेचे प्रतिनिधी सुधीर गोंधळी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक डॉ. स्नेहल कनिचे यांनी केले. श्रीमती लीना खरात, तहसीलदार (सर्वसाधारण) यांनी आभार मानले.
मंडल अधिकारी वैशाली वाधमोडेंचा विशेष सत्कार
कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगावच्या मंडल अधिकारी वैशाली वाघमोडे शेंडगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी त्यांच्या मंडळामध्ये पाणंद रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी “नो अपील नो वकील” हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत ढालगाव मंडळामधील १४ गावांमधील पाणंद रस्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी रस्त्यांचे सर्वेक्षण केले. बैलगाडीतून शिवार फेरी केली. १०० पेक्षा अधिक रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ९३ रस्त्यांच्या अधिकृत नोंदी सातबाऱ्याच्या इतर अधिकार सदरी करण्यात आल्या. समझोत्याने वाद असणारे पाणंद रस्ते खुले करण्यात आले.
DBT STATUS ॲपचे उद्घाटन
DBT STATUS ॲपद्वारे सामाजिक न्याय विभाग – योजना, सद्यस्थिती याविषयीची माहिती नागरिकांना मिळणार आहे. हे ॲप जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे.
हे ॲप तयार करण्यासाठी उपजिल्हाधिकारी महसूल सतीश कदम, संजय गांधी योजनेच्या तहसीलदार शुभांगी कनवाडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक संचित पवार यांनी मेहनत घेतली.
संजय गांधी योजना DBT STATUS ॲपमुळे लाभार्थी व प्रशासनाला होणारे फायदे - ॲपच्या माध्यमातून लाभार्थीला घरबसल्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे अनुदान आपल्या खात्यात जमा झाले किंवा नाही हे कळेल. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये येऊन विचारणा करण्याकरिता लागणारा वेळ व पैसा वाचेल. लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्यास त्याचे कारण समजून त्रुटीपूर्तता करता येईल. कार्यालयामध्ये अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गर्दी होणार नाही. त्यामुळे कार्यालयातील इतर कामकाज करण्यास अधिक वेळ मिळेल.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
गौरवण्यात आलेले जिल्हाधिकारी कार्यालय व क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचे नाव व पदनाम पुढीलप्रमाणे - शिवाजी जगताप (उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ७), अजयकुमार नष्टे (उपविभागीय अधिकारी जत), श्रीनिवास अर्जुन (उपविभागीय अधिकारी वाळवा), श्रीमती लीना खरात (तहसीलदार (सर्वसाधारण)), डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ (तहसीलदार मिरज), सुरेश मुंढे ( निवडणूक नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली), योगेश जमदाडे (महसूल नायब तहसीलदार, मिरज), श्रीमती सुप्रिया खांडे ( सहाय्यक महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), सुनील कानडे (सहाय्यक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय वाळवा), श्रीमती अनिता विरकर (मंडळ अधिकारी, भूसंपादन क्र. 9), श्रीमती कविता चव्हाण (मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय कडेगाव), श्रीमती सुनीता डवरी (लघुलेखक, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), जगन्नाथ कदम ( ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय शिराळा), दीपक माने (महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), शैलेश जाधव (महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय विटा), बाबासाहेब नाईक (वाहनचालक, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), विजय वाघमारे (वाहनचालक, उपविभागीय अधिकारी कार्यालय जत), माणिक माळी (शिपाई, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), रविंद्र सुतार (शिपाई, तहसील कार्यालय पलूस), विलासराव तात्यासो पाटील (पहारेकरी, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), शिवाजी पुसावळे (कोतवाल, तहसील कार्यालय आटपाडी), गोरख चव्हाण (पोलीस पाटील, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ)
00000
सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद यंत्रणांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत जिल्हा परिषद यंत्रणांचा आढावा आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत. कोणताही निधी परत जाणार नाही, याची दक्षता घेऊन कामकाज करावे, अशा सूचना यंत्रणांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यासह जिल्हा परिषदेतील संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामपंचायतींना जनसुविधा, नागरिकांच्या शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी कामे करण्यास प्राधान्य द्यावे. अखर्चित निधी महिनाभरात खर्च करावा. प्रत्येक कामाचा युडीआयडी काढा. लोकप्रतिनिधी व संबंधित अन्य यंत्रणांच्या समन्वयाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधी 100 टक्के खर्च करण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी निर्देश दिले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर कामे सद्यस्थिती, कार्यादेश, कामांची भौतिक व आर्थिक प्रगती, प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, पूर्ण व रद्द झालेली कामे यांचा यंत्रणानिहाय सविस्तर आढावा घेतला. यामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य, जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, बालकल्याण, शिक्षण, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामकाजाची माहिती सादर केली.
00000
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले महिलांच्या स्वप्नांना बळ
- सावळीत महिला गृहउद्योग केंद्र, स्वयंरोजगार विक्री केंद्राचे लोकार्पण
- पौष्टिक लाडुंची खरेदी करून महिलांना स्वतः केले वाटप
- जिल्ह्यात 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे, डीपीसीतून अडीच कोटींचा निधी
- 32 महिला गृहउद्योग केंद्रांसाठी डीपीसीतून अडीच कोटींचा निधी
सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : मिरज तालुक्यातील सावळीतील महिलांसाठी सोमवारचा दिवस स्वप्नवत व अविस्मरणीय ठरला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रत्यक्ष आपल्या गावात येतात, आपण उभारलेल्या गृहउद्योग केंद्राला भेट देतात, आपल्या उत्पादनांची आत्मियतेने माहिती घेतात आणि स्वयंरोजगार विक्री केंद्राचे लोकार्पण करतात, हा क्षण येथील महिला भगिनींसाठी आनंदाची मर्मबंधातील ठेव बनला. त्यांच्या या “बंधु”तुल्य वावर आणि अनौपचारिक सहजतेने पायावर उभे राहण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महिला भगिनींच्या स्वप्नांना बळ दिले आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील सावळी येथे उभारण्यात आलेल्या विजयश्री महिला गृहउद्योग केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) आणि नवतेजस्विनी महिला स्वयंरोजगार विक्री (व्हेंडर स्टॉल) केंद्राच्या लोकार्पणाचा हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला.
पालकमंत्र्यांच्या आगमनाची चाहूल लागताच सकाळपासूनच महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहउद्योग केंद्र आणि विक्री केंद्राची सजावट, उत्पादनांची आकर्षक मांडणी आणि पाहुण्यांच्या स्वागताची लगबग सुरू होती. वाहनांचा ताफा केंद्रासमोर थांबताच महिलांच्या चेहऱ्यावरील उत्सुकतेचे रूपांतर आनंदात झाले.
तुतारीच्या निनादात पालकमंत्री चंद्रकांत पाटील केंद्रात दाखल झाले आणि काही क्षणांतच औपचारिकतेचे वातावरण आपुलकीच्या संवादात बदलले. त्यांनी प्रत्येक महिलेशी बोलत तिच्या कामाची माहिती घेतली. गृहउद्योग केंद्रातील यंत्रसामग्री, उत्पादन प्रक्रिया आणि महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची त्यांनी पाहणी केली. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ, शेवया, मसाले, विविध प्रकारची पिठे आणि पौष्टिक खाद्यपदार्थांविषयी त्यांनी आत्मियतेने चौकशी केली.
महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे कौतुक करताना पालकमंत्र्यांनी स्वतः काही वस्तु खरेदी केल्या. स्वयंरोजगार विक्री केंद्रातून त्यांनी पौष्टिक लाडू विकत घेतले आणि तेच लाडू उपस्थित महिला भगिनींना स्वतःच्या हाताने वाटले. त्यांच्या या छोट्याशा कृतीने महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखी खुलला. आपण तयार केलेल्या उत्पादनाला पालकमंत्र्यांनी ग्राहक म्हणून पसंती दिल्याची भावना महिलांसाठी अभिमानाची ठरली.
महिलांनी पालकमंत्र्यांसोबत छायाचित्रे काढली. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी “व्यवसाय करताना कोणालाही वस्तू मोफत देऊ नका. उत्पादनाला योग्य किंमत मिळाली, तरच व्यवसाय वाढेल आणि तुमच्या श्रमाचे मूल्य टिकेल,” असा व्यावहारिक सल्ला पालकमंत्री पाटील यांनी दिला.
केंद्रातून बाहेर पडताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच “नारीशक्तीचा विजय असो” अशी घोषणा दिली. उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. या क्षणी अनेक महिलांच्या चेहऱ्यांवर आनंदाबरोबरच नव्या आत्मविश्वासाची झळाळी दिसून आली.
महिला उद्योजिकांना मिळणार नवी संधी
महिला गृहउद्योग केंद्र आणि स्वयंरोजगार विक्री केंद्रामुळे ग्रामीण महिला उद्योजिकांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे, उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करणे या केंद्रांमुळे अधिक सुलभ होईल.
महिलांनी केवळ बचतगटांच्या बैठकीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. महिला सक्षमीकरणाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे, डीपीसीतून अडीच कोटींचा निधी
32 महिला गृहउद्योग केंद्रांसाठी डीपीसीतून अडीच कोटींचा निधी
‘महिला लखपती’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के राखीव निधीतून महिला गृहउद्योग केंद्रे आणि स्वयंरोजगार विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. महिला व बाल सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत शेतीमाल आणि अन्नप्रक्रियेद्वारे मूल्यवर्धित वस्तूंचे उत्पादन गावपातळीवर व्हावे, बचतगटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी पोर्टेबल व्हेंडर स्टॉलच्या स्वरूपात स्वयंरोजगार विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त 2 कोटी 56 लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील सात तालुक्यांत 90 स्वयंरोजगार विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच जवळपास 32 लाभार्थी महिला गटांतील 384 महिला लाभार्थींसाठी महिला गृहउद्योग केंद्रे (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यात आली आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त 2 कोटी 49 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
सावळीतील हा कार्यक्रम केवळ दोन केंद्रांच्या लोकार्पणापुरता मर्यादित राहिला नाही. तो महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणारा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या त्यांच्या स्वप्नांना नवे बळ देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)