sangmahiti
रविवार, ९ ऑगस्ट, २०२६
महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे अण्णासाहेब डांगे यांना श्रेय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा नागरी सत्कार,
- शिक्षण, समाजसेवेच्या प्रदीर्घ वाटचालीला मानाचा मुजरा
- ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन
- शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचे लोकार्पण
सांगली, दि. 9 : ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील भीष्म पितामह असून, धडधाकट शरीरयष्टी, कणखर आवाज, शिस्त आणि दरारा हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. तळागाळातील जनतेचे प्रश्न प्रशासकीय पकड व सखोल अभ्यास याद्वारे त्यांनी सोडवले असून, महाराष्ट्राला टँकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचे श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जाते, असे कौतुकोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
वाळवा तालुक्यातील आष्टा येथे माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांचे अभिष्टचिंतन, आम्रवृक्ष आत्मचरित्राचे प्रकाशन आणि आष्टा शैक्षणिक संकुलातील शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा येथे आयोजित या कार्यक्रमास सत्कारमूर्ती डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्यासह विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, लोकसभा सदस्य धैर्यशील माने, आमदार सर्वश्री अरुण लाड, सदाभाऊ खोत आणि धैर्यशील कदम तसेच, डॉ. सुरेश खाडे, विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, अशोक माने आणि सुहास बाबर, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे यांच्यासह डांगे कुटुंबिय आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात प्रदीर्घ काळ योगदान देणारे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या वयाच्या 91 व्या वर्षात पदार्पणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच, यावेळी त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणाऱ्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अण्णासाहेब डांगे हे आपणासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांना आपण वैयक्तिकरीत्या काही देऊ शकत नसलो तरी त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उपहार दिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 80 च्या दशकाच्या शेवटी कर्जमाफीच्या लढ्यात सक्रिय सहभाग अण्णासाहेबांनी घेतला. या लढ्याला राजकीय स्वरूप देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा हा लढा व्यापक केला. तळागाळात जायचे असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, याची जाणिव त्यांना होती. त्यामुळे आज कर्जमाफी करूनच त्यांच्या वाढदिनी आपण इथे आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून, त्यापैकी 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात 5 हजार कोटी रूपये जमा केले असल्याचे सांगून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन महिन्यात पैसे जमा होतील, असे ते म्हणाले. प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्याही खात्यात 50 हजार रूपये भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णासाहेब डांगे पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचा धाडसी निर्धार केला. प्रत्येक गावात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नियोजन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची स्थापना केली. प्रत्येक गावात पाणीपुरवठ्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. मोगलांच्या काळात देशभरातील हिंदू देवतांच्या मूर्ती आणि मंदिरांची विटंबणा केली गेली होती. त्या सर्व देवालयांचे व घाटांचे पुनरूज्जीवन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. पण, त्यांच्या चौंडी या जन्मस्थानाचा शोध अण्णासाहेब डांगे यांनी घेतला आणि त्याचे पुनरूज्जीवन केले. तसेच, वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही त्यांनी सुरू केले. त्यांचे कार्य राज्य शासन पुढे नेत असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मस्थान विकासासाठी राज्य शासनाने 700 कोटींचा विकास आराखडा केला आहे. तसेच, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी वाढीव भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून, त्यांच्या भव्य स्मारकाचेही काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक क्षेत्राबरोबर शैक्षणिक कार्य करताना अण्णासाहेब डांगे यांनी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आश्रमशाळा उभी केली आहे. अनेक आव्हानांच्या काळातही दीनदयाळ सूतगिरणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असे ते म्हणाले. अण्णांना जडीबुटींचे उत्तम ज्ञान असून, ते त्यांचा वापर करून शंभरी पार करतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या शतकीय वाढदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करू, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्था उभारल्या. या संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील विविध घटकांना त्यांनी घडविले. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले. अण्णासाहेब डांगे यांचे कार्य आणि योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना निरोगी, दीर्घ आणि आनंदी आयुष्य लाभावे, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली आहे. त्यांच्या शिस्तीचा, नियमांचा आणि स्वभावाचा आपल्या जीवनात परिपूर्ण उपयोग करून घेतला आहे. आप्पांचे मार्गदर्शन हे आपल्या जीवनाला परिवर्तनाकडे घेऊन जाणारे आहे, असे सांगून त्यांनी अण्णासाहेब डांगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांनी कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले. राजकारणासोबतच शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले असल्याचे सांगून त्यांनी आजचा सोहळा हा केवळ सत्कार नसून माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या ९० वर्षांच्या प्रदीर्घ, तत्त्वनिष्ठ आणि समाजोपयोगी सार्वजनिक जीवनाचा गौरव आहे, असे सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अण्णासाहेब डांगे यांनी त्यांच्या जीवनातील विविध टप्पातील आठवणींना उजाळा दिला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी केले आहे. सूत्रसंचालन विजय कडणे व राणी यादव यांनी केले. आभार विश्वनाथ डांगे यांनी मानले. यावेळी संस्थेचे संचालक, पदाधिकारी, मान्यवर, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक संकुलात नव्या वास्तूंची भर
या सोहळ्यात शैक्षणिक संकुलातील विविध नूतन वास्तूंचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक बळ देणाऱ्या या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल व अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे आभासी पध्दतीने उद्घाटन करण्यात आले.
00000
शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६
पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी घेणार शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील अनुपालनाचा आढावा
सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील नागरिकांच्या अर्जांसंबंधी शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अनुपालनाचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता घेणार आहेत. या अनुपालन सभेत दि. 30 जुलै रोजीच्या शासकीय जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी दिलेल्या अर्जावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून, असे अर्ज दिलेल्या नागरिकांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मा. पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही अनुपालन सभा होणार आहे. नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी सोडवल्या जाव्यात, या उद्देशाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. ३० जुलै रोजी शासकीय जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. नागरिकांच्या प्राप्त अर्जावर केलेल्या अहवालासह विभागप्रमुखांनी या सभेस उपस्थित राहण्यास सूचना देण्यात आल्या असून, संबंधित नागरिकांनीही या सभेस उपस्थित राहून आपल्या अर्जावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती घ्यावी, असे आवाहन मा. पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दुसरा शासकीय जनसंवाद कार्यक्रम आगामी कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, त्याची तारीख स्वतंत्ररीत्या कळवण्यात येईल. शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्न, नागरिकांच्या समस्या यांना या शासकीय जनसंवाद कार्यक्रमातून व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
00000
"पॉश" ची अंमलबजावणी न करणाऱ्या जिल्ह्यातील ५५ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा - महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील
सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : पॉश कायदा 2013 हा कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 आहे. हा कायदा भारतातील सर्व सरकारी, खाजगी आणि संघटित-असंघटित क्षेत्रातील कार्यालयांमध्ये महिलांना सुरक्षित व छळमुक्त वातावरण मिळावे यासाठी लागू करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने जिल्ह्यातील ९९ शासकीय व १४९ खाजगी कंपन्या / कार्यालयांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २४ शासकीय व ३१ खाजगी कार्यालयांना पूर्तता न केल्याबद्दल जिल्हा स्तरावरून कारणे दाखवा नोटीसा देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था, कंपन्या, त्यांच्या शाखांनी Posh Act - २०१३ मधील तरतुदी व सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार त्यांचे कार्यालयाची केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL वर नोंद, अंतर्गत समितीची स्थापना व नोंद, समितीचे प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वार्षिक अहवाल, इ. वरील पोर्टल अद्यावत करणे बंधनकारक आहे. तपासणीवेळी पूर्तता केली नसल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यालये/संस्था/कंपन्या यांच्यावर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Posh Act - २०१३ मधील तरतुदी व सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार पूर्तता केली किंवा नाही यासाठी राज्यातील शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था, कंपन्या, त्यांच्या शाखांची राज्याच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ४,००० पेक्षा जास्त तपासणी अधिकाऱ्यांकडून जून २०२६ पासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत राज्यातील ३,५७९ शासकीय व ३,२१६ खाजगी कंपन्या / कार्यालयांची अशा एकूण ६,७९५ तपासण्या करण्यात आली असून २९४ शासकीय व ३७८ खाजगी कार्यालयांना पूर्तता न केल्याबद्दल जिल्हा स्तरावरून राज्यात एकूण ६७२ कारणे दाखवा नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. नोटीसा दिलेल्या कार्यालयांनी विहित वेळेत पूर्तता न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार रू. ५०,०००/- पर्यंत दंड आकारण्याची कारवाई संबंधीत जिल्हा अधिकारी (Posh Act 2013) व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे.
०००००
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६
मुद्देमाल हस्तांतरणातून नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास दृढ - विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा
- चार कोटींचा मुद्देमाल हस्तांतरीत
- 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदी परत
- 283 मोबाईल, 24500 किलो बेदाण्याचा समावेश
सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 24 तास कार्यरत असलेल्या पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुन्ह्यांच्या तपासात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियमानुसार हस्तांतरण करण्यासाठी घेण्यात आलेला मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम हा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या विश्वासाला बळ देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. खरे क्लब हाऊसच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी व मुद्देमालाचे विश्वस्त-मालक उपस्थित होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा या दोन्ही बाबींसाठी पोलीस दल कर्तव्यदक्ष आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. केंद्र शासनाचे पोर्टलच्या माध्यमातूनही कार्यवाही केली जात आहे. आज 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदी व 283 मोबाईल आणि 24500 किलो बेदाणा असा जवळपास 4 कोटी रूपयांचा मुद्देमाल परत देण्यात येत आहेत. या माध्यमातून नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास निश्चितच वृद्धिंगत होईल, असे ते म्हणाले.
नागरिकांनीही दक्ष राहून गुन्हा घडला तर 112 क्रमांकावर तक्रार करावी. तपासासाठी सहकार्य व पाठपुरावा करावा, असे स्पष्ट करून विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांनी मुद्देमाल हस्तांतरणाचे उद्दिष्टनिहाय काम करावे. महिनावार संबंधितांचे ऐवज परत करावेत. आपल्या माध्यमातून संबंधित पीडिताला दिलासा द्यायचे काम होते, याची जाणिव ठेवून पोलीस दलावरील नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे सांगून त्यांनी गुन्ह्याचा योग्य वेळी छडा लावून, मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल व सदर मुद्देमाल हस्तांतरणाचा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि गुन्हे अन्वेषण हे पोलिसांचे प्रमुख काम असले तरी गुन्ह्यातील संपत्ती संबंधितास परत केला तर पीडितास खऱ्या अर्थाने न्याय मिळतो. दागिने हा केवळ ऐवज नसून, संबंधितांची भावनिक गुंतवणूक त्यात झालेली असते. मूर्ती, दागिने यांना सांस्कृतिक महत्त्वही असते. त्यामुळे हा मुद्देमाल परत करताना संबंधिताचे भावनिक मूल्य परत केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविकात अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक अभिलेख आणि नियमित पडताळणी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले. आभार मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी मानले.
पोलिसांप्रती कृतज्ञता
कवठेमहांकाळचे डॉ. म्हेत्रे यांच्या घरात 14 सप्टेंबर 2025 रोजी स्पेशल 26 या चित्रपटासारखी घटना घडली. त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचा चमू आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी दोन ते तीन दिवसात मुद्देमाल परत मिळवला. आज त्यांना तो परत देण्यात आला. याबद्दल त्यांनी पोलीस विभागातील सर्व टीमचे आभार व्यक्त केले.
रमाबाई शिवाजी गायकवाड (रा. बाणूरगड) यांचे गंठण हा त्यांच्यासाठी केवळ दागिना नव्हता. त्यांच्या वडिलांनी दिलेले आशीर्वाद होते. त्यामुळे दीड वर्षापूर्वी जेव्हा गंठण हरवले, तेव्हा त्या व्यथित झाल्या. आज त्यांना गंठण परत सुपूर्द केल्यानंतर त्यांनी पोलीस विभागाचे विशेष आभार व्यक्त केले.
बिरोबा देवस्थानचे दागिने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवले जात असत. मात्र, साधारण सहा महिन्यांपूर्वी त्या बँकेच्या शाखेतच दरोडा पडल्याने देवस्थानचे दागिने लुटले गेले. सांगली जिल्ह्यामध्ये घडलेल्या या मोठ्या चोरीचा छडा जिल्हा पोलीस दलाच्या नेतृत्त्वाखाली दोन महिन्यातच लावला गेला. हा मुद्देमाल आज परत ताब्यात देण्यात आला. त्यासाठी बिरोबा देवस्थान व ट्रस्टच्या वतीने विभूतवाडीचे माजी सरपंच व देवस्थानचे पुजारी चंद्रकांत पावणे यांनी पोलीस दलाचे आभार मानले.
एकूणच सांगलीसारख्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सातत्याने आव्हाने असलेल्या जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ अंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया न राहता पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख पोलीस व्यवस्थेचा संदेश देणारा ठरला आहे.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने
कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ
सांगली जिल्ह्यातील 21,725 शेतकऱ्यांची 156.54 कोटींची कर्जमाफी
सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्याचा शुभारंभ आज डिजिटल पद्धतीने करण्यात आला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21 हजार 725 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 156.54 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली तसेच संबंधित अधिकारी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 हजार 726 लाभार्थ्यांच्या खात्यावर 132.85 कोटी रुपये, तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 1 हजार 999 लाभार्थ्यांच्या खात्यावर 23.69 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील 68 हजार 981 पात्र कर्जखाती शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 56 हजार 962, तर राष्ट्रीयकृत बँकांची 12 हजार 19 कर्जखाती आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील 38 हजार 410 पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होती. त्यापैकी 31 हजार 944 पात्र लाभार्थ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अद्याप 6 हजार 418 पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 5 हजार 598 लाभार्थ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांपैकी 4 हजार 509 लाभार्थ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.
ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक क्रमांक काढलेला नाही, त्यांनी आपल्या नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन ॲग्रीस्टॅक क्रमांक काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
तसेच जिल्ह्यातील 1 हजार 676 पात्र शेतकरी मयत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांच्या वारसांनी महसुली दप्तरी वारस नोंद करून त्याची पूर्तता संबंधित सेवा संस्था तसेच राष्ट्रीयकृत बँकेत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांवर सहकार विभागातील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत पात्र शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित तालुक्यातील उप निबंधक अथवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.
000000
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करा - उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे
सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : कला व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना प्रतिमहिना 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. इच्छुक पात्र साहित्यिक व कलावंतांनी 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मुळ दस्ताऐवजासह आपले सरकार पोर्टलवर http://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
योजनेसाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून दिव्यांगांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे (दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्षे). कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे योगदान, ज्यांनी साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे, वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा/परितक्त्या/दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील, कलाकाराचे सर्व मार्गानी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रूपये पेक्षा जास्त नसावे, ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार, कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. आदी अटी लागू आहेत.
अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञा पत्र, पती व पत्नी एकत्रीत फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास), राज्य किंवा केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था /व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास), विविध पुरावे आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
00000
आदिशक्ती पुरस्कारात येडेनिपाणी ग्रामपंचायत व्दितीय, कवठेपिरान तृतीय
सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या ‘आदिशक्ती अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची घोषणा करण्यात आली असून, सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी व कवठेपिरान या दोन ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) सोमनाथ रसाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
यामध्ये येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत 10 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. तर कवळठेपिरान (ता. मिरज) ग्रामपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक मिळवून 7 लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले
याशिवाय अभियानांतर्गत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास 5 लाख, द्वितीय क्रमांकास 3 लाख आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावर प्रथम क्रमांकास 1 लाख, द्वितीय क्रमांकास 50 हजार आणि तृतीय क्रमांकास 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांक कवठेपिरान, व्दितीय येडेनिपाणी तर तृतीय क्रमांक अंबक (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीस मिळाला आहे.
तालुकानिहाय तालुकास्तरीय प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायती अनुक्रमे पुढीलप्रमाणे – आटपाडी – राजेवाडी, पळसखेळ, निंबवडे. जत – रावळगुंडवाडी, बनाली, आसंगी जत. कडेगाव – अंबक, बेलवडे, चिंचणी वांगी. कवठेमहांकाळ – करलहट्टी, आगळगाव, धुळगाव. खानापूर (विटा) – गार्डी, वाझर, बामणी. मिरज – कवठेपिरान, सावळवाडी, बामणोली. पलूस – आमणापूर, भिलवडी, आंधळी. शिराळा – शिरशी, करमाळे, मांगरूळ. तासगाव – हातनूर, बलगवडे, गव्हाण. वाळवा – येडेनिपाणी, पेठ, महादेववाडी.
आदिशक्ती पुरस्कारांतर्गत सांगली जिल्ह्याला एकूण 38 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस प्राप्त होणार असल्याचे प्रसिध्दीपप्कात म्हटले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)