sangmahiti
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६
विशेष संक्षिप्त पुनरीक्षणांतर्गत विभागीय आयुक्त मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर
सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR)-2026 अंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याच्या टप्प्यात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त हे मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observer) म्हणून काम पाहत आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षकांचा मंगळवार, दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी दौरा आयोजित करण्यात आला आहे. ते या दौऱ्यात जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांच्या ठिकाणी भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा करणार असून मतदार नोंदणी अधिकारी मिरज व सांगली यांच्या कार्यालयास भेट देऊन आढावा घेणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक यांच्या मंगळवार, दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दुपारी 3 ते 3.15 या वेळेत 287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 193 (जि. प. मुला मुलींची शाळा, नरसिंहगाव) येथे भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा. त्यानंतर दुपारी 3.15 ते 3.45 या वेळेत 287 तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 187 (जि. प. प्राथमिक शाळा, अलकुड एम) येथे भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा. दुपारी 3.45 ते 4.20 या वेळेत 281-मिरज विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 186 (मिरज हायस्कूल, मिरज) येथे भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा. दुपारी 4.20 ते 4.45 वाजेपर्यंत 281 मिरज विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 150 (रोझरी इंग्लिश स्कूल, मिरज) येथे भेट देऊन बीएलओ व मतदारांशी चर्चा. दुपारी 4.45 ते 5.15 वाजेपर्यंत मतदार नोंदणी अधिकारी (ERO), 281-मिरज यांच्या कार्यालयास भेट व आढावा बैठक. सायंकाळी 5.15 ते 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे विद्यमान खासदार, आमदार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. सायंकाळी 6 ते 6.25 वाजेपर्यंत मतदार नोंदणी अधिकारी, 282- सांगली यांच्या कार्यालयास भेट व आढावा बैठक. सायंकाळी 6.25 ते 6.45 वाजेपर्यंत 282-सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 157 (श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, सांगली) येथे भेट, बीएलओ व मतदारांशी चर्चा. सायंकाळी 6.45 ते 7.10 वाजेपर्यंत 282-सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 148 (सुपर इंग्लिश मीडियम स्कूल, सह्याद्रीनगर, मंगल कॉलनी, सांगली) येथे भेट, बीएलओ व मतदारांशी चर्चा. रात्री शासकीय विश्रामगृह सांगली येथे मुक्काम व राखीव.
बुधवार दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह सांगली येथून उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
00000
जत तहसील कार्यालयात 21 सप्टेंबरला लोकशाही दिन
सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : तहसील कार्यालय जतच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकशाही दिन आयोजित केला आहे. शासन परिपत्रकानुसार सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व अडचणी यांचे न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार, 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जत तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी, जत उपविभाग यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाची बैठक घेण्यात येणार असल्याचे जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावयाचे आहे, त्या अर्जदारांनी नियोजित बैठकीपूर्वी विहित नमुन्यात दोन प्रतींत अर्ज तहसील कार्यालय, जत येथे जमा करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांवर संबंधित विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
00000
महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी 11 नोव्हेंबरला परीक्षा
सांगली, दि. 3 (जि. मा. का.) : राज्यातील दिनांक 31 मे 2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची (कोतवाल) रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. सांगली जिल्ह्यात महसूल सेवकांची एकूण 354 पदे असून 287 पदे भरलेली आहेत, तर 67 पदे रिक्त आहेत. या पदभरतीची प्रक्रिया निश्चित कालबद्ध कार्यक्रमानुसार 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडण्याचे निर्देश महसूल व वन विभागाच्या वतीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
कोतवाल परीक्षा 2026 च्या कार्यक्रमानुसार तालुकानिहाय रिक्त जागांची यादी बनविण्याचा कालावधी 2 ते 8 सप्टेंबर 2026, रिक्त जागेनुसार बिंदू नामावली तयार करणे 9 ते 23 सप्टेंबर 2026, परीक्षा भरतीकरिता समिती स्थापना 24 सप्टेंबर 2026, जाहिरातीचा दिनांक 2 ऑक्टोबर 2026 (गांधी जयंती) ते 17 ऑक्टोबर 2026. अर्जांची छाननी 18 ऑक्टोबर 2026 ते 1 नोव्हेंबर 2026, प्रवेशपत्र उपलब्ध 4 ते 10 नोव्हेंबर 2026, परीक्षा दिनांक 11 नोव्हेंबर 2026, उत्तरसूची आणि निकाल घोषणा 12 नोव्हेंबर 2026, दस्तऐवज पडताळणी 13 ते 27 नोव्हेंबर 2026, नियुक्तीपत्र 28 नोव्हेंबर 2026
00000
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६
कारागृहातील बंद्यांच्या मनपरिवर्तनासाठी मुलाखत कक्ष उपयुक्त - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- बंदी नातेवाईक भेटीसाठी मुलाखत कक्षाचे उद्घाटन
- कौशल्य प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वितरण
सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : कारागृहातील बंद्यांचे माणूस म्हणून पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांच्या मनपरिवर्तनासाठी नातेवाईकांशी संवाद महत्त्वाचा असून, मुलाखत कक्षाच्या माध्यमातून त्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. कारागृहात असे सुधारणात्मक कार्यक्रम राबवण्यासाठी तसेच मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासकीय निधी तसेच सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून तरतूद करू, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
सांगली जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी बांधलेल्या नवीन मुलाखत कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सांगली जिल्हा कारागृह येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे, पालमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, कारागृह अधीक्षक विजय कांबळे, कौशल्य विकास विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त हणमंत नलवडे, नगरसेविका स्वाती शिंदे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी अरूण मदने, तुरूंगाधिकारी माधुरी मोरे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, माणसाच्या हातून अनावधानाने झालेल्या अपराधासाठी त्याला त्याच्या स्वजन व नातेवाईकांपासून दूर राहणे हीच मोठी शिक्षा असते. पश्चात्तापदग्ध कैद्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी तसेच त्यांच्या मनपरिवर्तनासाठी अनेक उपक्रम कारागृह प्रशासनाकडून राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष करण्यात आला आहे. नातेवाईकांशी संवाद साधून बंद्यांचे मनपरिवर्तन होऊ शकते. त्यांना चांगले जीवन जगण्याची उमेद मिळू शकते, असे ते म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मनपरिवर्तन होऊन चांगल्या वर्तणुकीमुळे किंवा अन्य कारणाने शिक्षेत सूट मिळालेल्या बंद्यांचे पुनर्वसन होऊन त्यांना माणूस म्हणून चांगले जीवन व्यतीत करता यावे म्हणून शासन अनेक सकारात्मक उपक्रम राबवत आहे. त्या दृष्टीने कौशल्य विकासाचे धडे त्यांना देण्यात आले असून, कारागृहातील मूलभूत सोयी सुविधांसाठी आवश्यक निधी सदैव उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाला भेट देऊन पाहणी केली.
मुलाखत कक्षाचे उद्घाटन
सांगली जिल्हा कारागृह येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष बांधण्यात आला आहे. यामध्ये एका वेळी 10 कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येणार आहे. यासाठी 62 लाख रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
न्यायाधीन बंद्यांना आठवड्यातून एक दिवस व शिक्षाधीन बंद्यांना पंधरा दिवसातून एक वेळेस नातेवाईकांसोबत भेट देण्यात येते. या मुलाखत कक्षामुळे बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटण्यास सुसज्ज मुलाखत कक्ष जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात आले आहेत. बंद्यांना व बंद्यांच्या नातेवाईकांना व त्यांच्या वकिलांना प्रत्यक्ष भेटीवेळी या मुलाखत कक्षातून संवाद साधता येणार आहे. बंद्यांची नातेवाईकांबरोबर समक्ष भेट झाल्याने त्यांचा ताणतणाव कमी होऊन, गुन्हेगारीपासून दूर जाण्यासाठी त्यांची मानसिकता तयार होण्यासाठी मदत होते.
प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वाटप
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सांगली यांच्यावतीने कारागृहातील एकूण 81 बंद्यांना संगणक डाटा एन्ट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण दिले गेले. ते सर्व या डाटा एन्ट्री परीक्षेत उत्तीर्ण झाले. यापैकी 66 बंदी जामीनवर मुक्त झाले आहेत. सध्या कारागृहात 15 बंदी बंदिस्त असून त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
बंदी कारागृहातून मुक्त झाल्यानंतर सदर सर्टीफिकेटचा व कोर्सचा त्यांना नवीन आयुष्य जगण्याकरिता उपयोग होईल व देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून जगण्यास प्रोत्साहन मिळेल.
00000
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६
पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा; पाणी बचतीची सवय अंगीकारा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- सांगलीत ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर उत्साहात’;
- ४ हजारहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे, तो जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळात पाण्याचे संकट अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरांमध्येही जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन आणि पाणी बचतीसाठी व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभाग, सांगली यांच्या वतीने आयोजित ‘महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ उपक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता तथा उपअभियंता अमित पाटील, उप कार्यकारी अभियंता सुनील खैरमोडे, उपअभियंता राजश्री काटकर, ज्योती भिसे व विक्रम देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी पाणी व माती संवर्धनाची शपथ घेतली. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनचा शुभारंभ केला. सांगलीतील वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेट (१०० फूट रोड) ते बापट मळा आणि पुन्हा वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेट असा महावॉकेथॉनचा मार्ग होता.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा’ या संकल्पनेवर आधारित व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून सांगलीत ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला एवढ्या सकाळी नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे. निसर्गातील बदलांसाठी केवळ निसर्गाला दोष देता येणार नाही. मानवाने पर्यावरणाचे संतुलन बिघडविले आहे. मोठमोठ्या इमारती, रस्ते आणि वाढते नागरीकरण यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरविण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
‘जलयुक्त शिवार’मुळे जलसंधारणाला गती
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात आले. पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरावे आणि भूजलसाठा वाढावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर पुन्हा सन 2022 मध्ये ‘जलयुक्त शिवार अभियान-२’ सुरू करण्यात आले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली असून भूजलसाठा वाढविण्यासाठी या कामांचा मोठा उपयोग होत आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आवश्यक
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रामीण भागाबरोबरच शहरांमध्येही पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत जिरविणे आवश्यक आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये छतावर पडणारे पावसाचे पाणी पाइपलाइनद्वारे त्याच परिसरातील बोअरमध्ये सोडून भूजलसाठा वाढविता येतो. रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग आता केवळ प्रयोग राहिलेला नसून तो प्रभावीपणे सिद्ध झाला आहे. त्यामुळे शहरांमध्ये त्याची व्यापक अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवसभरात आपण पाणी कोणकोणत्या कारणांसाठी वापरतो आणि त्यातील कुठे पाण्याची बचत करता येईल, याचा प्रत्येकाने विचार करावा. उपलब्ध पाण्याच्या साठ्याचे योग्य नियोजन आणि काटकसरीचा वापर केल्यास भविष्यातील पाणीटंचाईचे संकट कमी करता येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
रील स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’ या विशेष इन्स्टाग्राम स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. महावॉकेथॉनच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांना मिळालेल्या प्रतिसादाचे त्यांनी कौतुक केले.
या उपक्रमासाठी ४ हजार १६२ नागरिकांनी नोंदणी केली होती. नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेत जलसंधारणाचा संदेश दिला.
यावेळी महावॉकेथॉनमध्ये प्रथम दहा क्रमांकांमध्ये आलेल्या सहभागींचा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, सांगली पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महादेव कदम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे यांच्यासह मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.
00000
गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६
सांगलीच्या 'माडग्याळ' मेंढीला अखेर राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता!
- ICAR-NBAGR कडून ॲक्सेशन नंबर प्रदान;
- तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश
- सांगली व परिसरातील मेंढीपालकांसाठी सुवर्णकाळ
सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उगम पावलेल्या आणि आपल्या धिप्पाड शरीरासाठी व जलद वाढीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'माडग्याळ' मेंढीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो (NBAGR), कर्नाल द्वारे माडग्याळ मेंढीला 'स्वतंत्र देशी मेंढी जात (New Indigenous Breed) म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ICAR च्या १४ व्या 'ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटी'च्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याबाबतचे अधिकृत पत्र ICAR-NBAGR चे संचालक डॉ. एन. एच. मोहन यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आयुक्तांना पाठवले आहे.
यासंदर्भात जिल्हा उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी आनंद व्यक्त करून दिलेली प्रतिक्रिया अशी – जत तालुक्यातील सिद्धनाथ खोरे, माडग्याळ तसेच, आटपाडी तालुका तसेच कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागात वर्षानुवर्षे मेंढीपालन केले जाते. माडग्याळ जात म्हणून मान्यता मिळाल्यामुळे मेंढीपालन व्यवसायास उभारी मिळून शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या मान्यतेकरिता पशुसंवर्धन विभाग गेले तीन वर्षे प्रयत्नरत असून, तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
माडग्याळ मेंढीचे वैशिष्ट्य
माडग्याळ मेंढी ही तिच्या लांब व उंच शरीरयष्टी, वैशिष्ट्यपूर्ण बाकदार नाक (रोमन नोज), लांब कान आणि जलद वजन वाढण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी व लगतच्या भागात या मेंढीचे संगोपन मोठ्या प्रमाणावर केले जाते. कमी पाण्यात व प्रतिकूल हवामानात टिकून राहण्याची अफाट क्षमता हे या प्रजातीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
राष्ट्रीय मान्यतेमुळे भविष्यात होणारे प्रमुख फायदे
* अनुवंशिक संवर्धन व शुद्धता (Genetic Conservation)
स्वतंत्र 'ॲक्सेशन नंबर' मिळाल्यामुळे आता या प्रजातीचे संवर्धन वैज्ञानिक पद्धतीने केले जाईल. संकरित प्रजननामुळे मूळ जात नष्ट होण्याचा धोका टळेल.
* शासकीय योजना व निधी उपलब्धता
केंद्र व राज्य शासनाकडून माडग्याळ मेंढीच्या पैदास, संशोधन व पैदासकारांच्या विकासासाठी विशेष अर्थसंकल्प, योजना व अनुदान उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
* पशुपालकांच्या उत्पन्नात मोठी वाढ (Brand Value)
राष्ट्रीय मान्यतेमुळे माडग्याळ बोकड व मेंढ्यांना अधिकृत ब्रँड व्हॅल्यू प्राप्त होईल. यामुळे देश-परदेशातील बाजारात या मेंढ्यांना अत्यंत चांगला दर मिळेल, ज्याचा थेट फायदा स्थानिक मेंढीपालकांना होईल.
* शुद्ध पैदास केंद्र व सिमेन बँक (Breeding Center & Semen Bank)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व शेळी विकास महामंडळामार्फत माडग्याळ मेंढीचे शुद्ध पैदास केंद्र आणि कृत्रिम रेतनासाठी (AI) सिमेन बँक स्थापन करण्यास गती मिळेल.
* ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
सांगली व परिसरात माडग्याळ मेंढीपालन हा एक अत्यंत शाश्वत, सुरक्षित आणि अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय बनेल.
00000
महावॉकेथॉन, रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा - जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील
- महावॉकेथॉनसाठी आतापर्यंत अडीच हजार नागरिकांची नोंदणी
सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : ‘महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम शुक्रवार, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता होणार आहे. सांगलीतील वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेट (100 फूटी रोड) ते बापट मळा आणि पुन्हा वालचंद कॉलेजच्या पाठीमागील गेटपर्यंत महावॉकेथॉन होणार आहे. तसेच ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’ ही विशेष इन्स्टाग्राम स्पर्धा घेण्यात येणार आहे. महावॉकेथॉनमध्ये सहभागासाठी सांगली जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपर्यंत 2 हजार 500 नागरिकांची नोंदणी झाली आहे. या दोन्ही उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील यांनी केले आहे.
जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभाग सांगलीच्या वतीने ‘महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ आणि ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’ ही विशेष इन्स्टाग्राम स्पर्धा घेण्यात येणार आहे. दोन्ही उपक्रमांसाठी ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून किंवा https://register.mahaevent.co.in या लिंकवर भेट देऊन नागरिक सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी swcd_sangli या इन्स्टाग्राम अकाऊंटलाही भेट द्यावी.
रील फॉर सॉईल अँड वॉटर चॅलेंज’ ही विशेष इंस्टाग्राम स्पर्धा १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी असून, ‘सेव्ह सॉईल सेव्ह वॉटर’ या अधिकृत हॅशटॅगसह ३० ते ६० सेकंदांची रील तयार करून युवक या मोहिमेत सहभागी होऊ शकतात.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)