शनिवार, १८ जुलै, २०२६

कर्जमुक्तीसाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी करावी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांचे आवाहन

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयाद्वारे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर केली असून दि. १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे योजनेच्या निकषात बदल केला असून काही अटी वगळल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅकची नोंदणी केलेली नाही त्यांनी अॅग्रिस्टॅकची नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., सांगली मार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज देत असून जिल्ह्यातील या बँकेची 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत 50,060 सभासदांची 56,962 कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. वारसा पूर्तता न झाल्याने 129, आधार क्रमांक नसल्याने 12 व 1 हजार रूपये चे आतील 9 अशी एकूण 150 कर्ज खाती प्रलंबित आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असून कर्जमुक्तीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील पात्र लाभार्थ्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांकासह आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅक नोंदणी झालेली नसेल त्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त होताच गावातील तलाठी, ग्रामसेवक व संस्थेच्या सचिवामार्फत गावामध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच बँकांच्या शाखेमध्ये सुद्धा यादी प्रसिद्ध केली जाईल. शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये विसंगती असल्यास पडताळणी केंद्रावर तसेच पोर्टलवर विसंगतीबाबत नोंद करणे आवश्यक आहे. विसंगती दुरुस्ती करून झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 00000

गुरुवार, १६ जुलै, २०२६

मिरज शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

- लाँड्री विभाग, मेल सर्जिकल सेमी आयसीयूची भर - 'नशामुक्त सांगली' अभियानालाही प्रारंभ सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे अत्याधुनिक लाँड्री विभाग आणि मेल सर्जिकल सेमी आयसीयूचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'नशामुक्त सांगली' अभियानाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियांका राठी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेशकुमार शिंदे, महानगरपालिका गटनेते संदीप आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे-म्हैशाळकर यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीतून मिरज शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या सुविधांमुळे शासकीय आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न आहे. मेल सर्जिकल सेमी आयसीयूमुळे गंभीर रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा, सुसज्ज बेड आणि आवश्यक वैद्यकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील. तसेच, लाँड्री विभागामुळे रुग्णालयातील कपडे धुण्याची आधुनिक व स्वच्छ व्यवस्था निर्माण झाली असून, स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे ते म्हणाले. अद्ययावत लाँड्री विभागांतर्गत कपडे शंभर टक्के ड्राय होऊन व इस्त्री करून मिळणार आहेत. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'नशामुक्त सांगली' अभियानांतर्गत पथनाट्य आणि विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून युवकांसह नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक प्रबोधन करण्यात येणार असून समाजात व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नशामुक्त सांगली होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकार्पणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अत्याधुनिक लाँड्री विभाग आणि मेल सर्जिकल सेमी आयसीयूची पाहणी करून तेथील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. 00000

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रस्ताव मान्यतेसाठी 15 ऑगस्टपर्यंत सादर करावेत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

- जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजनेतील कामांचा घेतला आढावा - ⁠प्रलंबित कामेही तातडीने सुरू करण्याचे निर्देश सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत चालू आर्थिक वर्षाचे प्रस्ताव मान्यतेसाठी 15 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. तसेच गत आर्थिक वर्षातील प्राप्त निधीचा विहित वेळेत वापर करून प्रलंबित कामेही 15 ऑगस्टपूर्वी सुरू करावीत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हा वार्षिक योजना तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत कामाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) दत्तात्रय लांघी यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विविध विभागांना मंजूर झालेल्या निधीचा नियोजनबद्ध, पारदर्शक व दर्जेदार वापर करून विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. गत आर्थिक वर्षातील जी कामे अद्याप सुरू झाली नाहीत, ती कोणत्याही परिस्थितीत 15 ऑगस्टपूर्वी सुरू झाली पाहिजेत. निधी अखर्चित राहणार नाही यासाठी नियमित आढावा घेऊन कामांना गती द्यावी. दर्जेदार कामांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, चालू आर्थिक वर्षात सामान्य नागरिकांच्या गरजा व जिल्ह्याचा सर्वंकष विकासाचे लक्ष ठेवून कामे प्रस्तावित करावीत. तसेच, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित सांगली जिल्हा 2047 साठी निधी राखीव ठेवून कामांचे नियोजन करावे. जिल्हा नियोजन विभागाशी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आपल्या विभागाच्या प्रस्तावित कामांची मंजुरी प्रक्रिया सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घ्यावी. मंजूर कामे सुरू करण्यामध्ये पावसाळ्यानंतर अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दुबार कामे टाळण्यासाठी प्रत्येक स्थायी कामास एमएचयुआयडी क्रमांक द्यावा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मंजूर निधीचा वापर शासनाच्या उद्दिष्टांनुसार व पात्र लाभार्थ्यांच्या हितासाठी प्राधान्याने करावा. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखत लाभ वेळेत मिळेल याची काळजी घ्यावी. प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढून निधी खर्चाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, नगरपालिका स्तरीय यंत्रणा तसेच राज्यस्तरीय यंत्रणांकडून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा विभाग व योजनानिहाय आढावा घेण्यात आला. मंजूर कामांची सद्यस्थिती, निधी खर्च, प्रलंबित कामे, अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती सादर केली. यावेळी जिल्हा वार्षिक योजना व अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सुरू असलेली कामे आणि निधी खर्चाचा आढावा सादर केला. विविध विभागांकडून प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. 00000

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सांगलीत कौशल्य, रोजगार व उद्योजकतेचा प्रेरणादायी सोहळा

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली, CYDA, युथ एड फाउंडेशन (Skill4Change Program) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि LIAD Institute of Art & Design यांच्या विशेष सहकार्याने कौशल्य विकास, रोजगार आणि सर्वसमावेशक उद्योजकतेला चालना देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, समाजकल्याण निरीक्षक शीतल जाधव तसेच यशस्वी महिला उद्योजिका स्वप्नाली खांडेकर उपस्थित होत्या. यावेळी सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून जागतिक युवा कौशल्य दिवस १५ जुलै २०२६ च्या यावर्षीच्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने एकत्रित विकास, शास्वत प्रगती आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी युवा वर्गाला सक्षम करण्यासाठी सामायिक भविष्याकरिता कौशल्य या आधारावर आजच्या कार्यक्रमातील सहभागी महिलांनी सातत्य ठेऊन एकत्रित विकास व शास्वत प्रगती या मार्गाने उंच भरारी घेण्याचे आवाहन केले. युथ एड फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रवीण पारसे यांनी संस्थेच्या Skill4Change उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, संस्थेमार्फत विविध हार्ड स्किल प्रशिक्षणांद्वारे ८४ महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण पूर्ण करून देण्यात आले आहे, तसेच १० महिलांचे रिक्षा चालक प्रशिक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमात कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी बदलत्या रोजगार बाजारपेठेतील संधी, कौशल्यांचे महत्त्व आणि उद्योजकतेचे वाढते महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक उद्योजकतेच्या दिशेने जिल्हा प्रशासन, CYDA आणि युथ एड फाउंडेशन यांचे संयुक्त प्रयत्न भविष्यातही अशाच प्रकारे सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षणामुळे महिलांना पारंपरिक व्यवसायांच्या चौकटीबाहेर पडून स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. घर, कुटुंब आणि समाजातील पारंपरिक विचारसरणी व विरोधावर मात करत या महिला आज नवीन क्षेत्रात यशस्वीपणे पाऊल टाकत आहेत. त्यांनी आत्मविश्वास, कौशल्य आणि जिद्दीच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून इतर महिलांसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या धाडसी वाटचालीचे कौतुक करून अशा उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे CYDA संस्थेमार्फत LGBTQI समुदायासाठी उद्योजकता बीज भांडवल (Entrepreneurship Seed Fund) वितरण करण्यात आले. या माध्यमातून १० LGBTQI उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाबरोबरच मिळालेल्या सहाय्यामुळे व्यवसाय उभारणीस मिळालेल्या बळाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी आणि लाभार्थ्यांनी आपल्या यशोगाथा सांगताना कौशल्य प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींना हार्ड स्किल प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विशेषतः विविध कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या महिला प्रशिक्षणार्थींचा तसेच यशोदा भालेराव, स्वाती आवळे, अंबिका इंगळे, प्रज्ञा साबळे, रेश्मा सरोदे, ज्योती कांबळे, कांचन सरोदे, मनीषा कांबळे,रोहिणी सरोदे,अधिका फाळके या १० महिला रिक्षा चालक प्रशिक्षणार्थींचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यशस्वी उद्योजिका म्हणून नाव कमावलेल्या शमीम मुल्ला यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासाचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन वासंती कांबळे यांनी केले, तर आभार राजश्री व्हनकडे यांनी मानले. कार्यक्रमास CYDA व यूथएड फाउंडेशनचे इम्तियाज हकीम (LGBTQI+), प्लेसमेंट ऑफिसर अच्युतराव सनगर, अश्विनी जाधव, प्रशिक्षणार्थी, सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 00000

बुधवार, १५ जुलै, २०२६

इंडिया स्किल्स कॉम्पिटिशनसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : देशातील युवक-युवतींना विविध व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य क्षेत्रात आपले प्राविण्य सिद्ध करण्यासाठी इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय निवड प्रक्रियेनंतर जागतिक कौशल्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली च्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ही स्पर्धा जगातील २३ वर्षांखालील तरुणांसाठी कौशल्य क्षेत्रातील ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाते. २०२७ मध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौन्सिल आणि विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ आयोजित करण्यात येणार आहे. या स्तरांवरील निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष असून ५६ कौशल्य क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच Cyber Security, Industry 4.0, Mechatronics आणि Robot Systems Integration या टीम स्किल्ससाठीही हीच वयोमर्यादा लागू आहे. Autonomous Mobile Robotics, Concrete Construction Work आणि Landscape Gardening या टीम स्किल्ससाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नोंदणी केलेल्या उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येणार असून अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक अमोल बोळाज (मो. ८५५४९९२५२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 20 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक स्वरूपाचे तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

दिवंगत वारकरी भोसलेंच्या मुलीच्या शिक्षणासाठी दरमहा 5 हजारांची वैयक्तिक मदत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा संवेदनशील निर्णय

- ⁠तिन्ही वारकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून दिला धीर - दुःखाच्या प्रसंगी शासन कुटुंबियांच्या पाठीशी सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : पंढरपूर वारीदरम्यान दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांच्या कुटुंबीयांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. शासन या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत त्यांनी शासन नियमानुसार मिळणाऱ्या शासकीय मदतीबरोबरच कसबे डिग्रज येथील दिवंगत राजश्री भोसले यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी वैयक्तिक स्तरावर दरमहा पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी राजश्री शंकर भोसले (कसबे डिग्रज), नंदा बाबासो पवार (कवलापूर) आणि माधवी राजेंद्र सलगरे (मालगाव) यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या दुःखद प्रसंगामुळे कुटुंबांवर कोसळलेल्या आघाताची दखल घेत त्यांनी त्यांच्या भावना समजून घेत धीर दिला. यावेळी खासदार विशाल पाटील, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरूटे, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रशासनाला दिवंगत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून उपलब्ध असलेली सर्व मदत तत्परतेने मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे सांगितले. अशा कठीण प्रसंगी शासन संवेदनशीलतेने नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेंतर्गत 4 लाख रूपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून 1 लाख रूपये असे एकूण 5 लाख रूपये त्वरीत मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी राजश्री भोसले यांची बारावीत शिक्षण घेणारी मुलगी पुढे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होण्याचे स्वप्न पाहत असल्याचा उल्लेख करत, तिच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तिच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे दरमहा पाच हजार रुपये वैयक्तिक स्वरूपात जमा करण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. भेटीदरम्यान उपस्थित लोकप्रतिनिधींनीही दिवंगत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी संबंधित गावांचे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. 0000000