शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

लोकसंवाद उपक्रमातून शासकीय योजनांचा जागर

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम दि. 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, सांगली यांच्या वतीने सांगली येथील श्रीलक्ष्मीनारायण गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने शासकीय योजनांबाबत लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक व भाविक एकत्र येत असल्याने त्यांच्यापर्यंत शासकीय योजना व लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष माने यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी तसेच रोजगाराच्या उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन केले. युवक-युवतींनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत कार्यरत जिल्हा चाईल्ड लाईन, सांगलीच्या आरती निडसोसे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये चाईल्ड हेल्पलाईन 1098, महिला हेल्पलाईन 181, बालसंगोपन योजना, अनाथ प्रमाणपत्र, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या विविध यंत्रणा, हेल्पलाईन क्रमांक आणि शासकीय योजनांचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती केवळ ऐकविण्याबरोबरच संबंधित योजनांसाठी पात्रता, उपलब्ध सुविधा आणि लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्रत्यक्ष संवादातून उत्तरे मिळण्यास मदत झाली. या कार्यक्रमास श्रीलक्ष्मीनारायण गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोहर सारडा, मंडळाचे पदाधिकारी, मॉडेल करिअर सेंटरचे यंग प्रोफेशनल प्रविण बनकर तसेच मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि शासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणे, हा ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. 00000

गणेशोत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांचा ‘लोकसंवाद’

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना, सांगलीत याच उत्सवाच्या मंचाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात १६ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान राबवल्या जाणाऱ्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष उपक्रमांतर्गत, सांगलीतील नामांकित 'खोकी संघटना गणेश मंडळ' येथे शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने आणि खोकी संघटना गणेश मंडळाचे अध्यक्ष पत्रकार दीपक चव्हाण यांच्या सहकार्याने या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. शासकीय योजनांच्या माहितीबरोबरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या नशामुक्त सांगली करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत खोकी संघटना गणेश मंडळाचे अध्यक्ष पत्रकार दीपक चव्हाण यांनी सामाजिक भान जपणारा त्यांच्या मंडळाच्या वतीने सादर केलेला ‘नशामुक्त सांगली’ हा सजीव देखावा शासकीय उपक्रमास उपयुक्त व प्रेरणादायी ठरला. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष माने यांनी तरुणांसाठी असणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना आणि आगामी रोजगार मेळाव्यांची सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महानगरपालिकेच्या प्रतिनिधी अश्विनी माने व तेजस्विनी वाघमारे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित 'आभा कार्ड', 'आयुष्मान भारत कार्ड', 'जननी सुरक्षा योजना' आणि व्यसनमुक्ती मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा चाईल्ड लाईनच्या आरती निडसोसे यांनी महिला व बालकांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'लेक लाडकी', 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', 'बालसंगोपन योजना' आणि 'अनाथ प्रमाणपत्र' याविषयी मोलाची माहिती दिली. तसेच आपत्कालीन मदतीसाठी चाईल्ड लाईन (१०९८) आणि महिला हेल्पलाईन (१८१) या क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन केले. या माहितीपूर्ण आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाला मॉडेल करिअर सेंटरचे यंग प्रोफेशनल प्रवीण बनकर, जिल्हा चाईल्ड लाईनचे शानूर दानवडे, खोकी संघटना गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

सांगली जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 9 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयामध्ये दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. समिती कार्यालयास प्राप्त होणाऱ्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अधिनियम 2000 व नियम 2012 नुसार कार्यवाही करून परिपूर्ण प्रकरणात विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते. त्रुटी असलेल्या प्रकरणांमध्ये अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर त्रुटी अवगत करून देण्यात येतात. ज्या प्रकरणात अभिलेख तपासणी आवश्यक आहे, अशा प्रकरणांमध्ये संबंधित शाळा, तहसीलदार व आस्थापना यांना पत्र देऊन सत्यता पडताळणी अहवाल सादर करण्याबाबत अवगत करण्यात येते. त्रुटी असलेल्या प्रकरणांकरिता ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रयोजननिहाय त्रुटी पूर्तता विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संबंधित सर्व विद्यार्थी, अर्जदार व उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात समक्ष उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगलीचे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चव्हाण यांनी केले आहे. विशेष मोहिमेचे प्रयोजननिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे : शैक्षणिक प्रयोजनासाठी त्रुटी पूर्तता करण्याची विशेष मोहीम 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक प्रयोजनासाठी अभिलेख सत्यता पडताळणी मोहीम 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणार आहे. सेवा प्रयोजनासाठी त्रुटी पूर्तता व अभिलेख सत्यता पडताळणी मोहीम 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत, तर निवडणूक प्रयोजनासाठी त्रुटी पूर्तता व अभिलेख सत्यता पडताळणी मोहीमही 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 00000

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६

लोकसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

- महिला व बाल विकास विभागाच्या योजनांची माहिती; - ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सांगली येथील शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ येथे महिलांसाठीच्या विविध शासकीय योजनांबाबत लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयांतर्गत कार्यरत जिल्हा चाईल्ड लाईन सांगलीच्या आरती निडसोसे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. चाईल्ड लाईन 1098, महिला हेल्पलाईन 181, बालसंगोपन, अनाथ प्रमाणपत्र, लेक लाडकी, लाडकी बहीण आदी योजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती देत महिलांशी संवाद साधला. उपस्थित महिलांनी विविध योजनांबाबत विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच महिलांना विभागाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ घेताना काही अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिनस्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान-2026 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ येथे आयोजित आरोग्य शिबिराचा भाविक व नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. या कार्यक्रमास शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राहुल डूबल व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा चाईल्ड लाईनचे शानुर दानवडे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000000

सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारी

‘सेवा परमो धर्मः’ ही केवळ एक उक्ती नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची भावना आहे. शासनाच्या योजना तयार होतात, निर्णय घेतले जातात; मात्र त्यांचा खरा अर्थ तेव्हा अधोरेखित होतो, जेव्हा त्या योजनांचा लाभ गावातील सामान्य कुटुंबापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, महिलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचतो. प्रशासन १७ सप्टेंबरपासून अशाच एका लोकाभिमुख अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे, त्यांच्या सहभागाचे कौतुक करणे आणि शासन नागरिकांच्या पाठीशी असल्याची भावना दृढ करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध सेवा उपक्रम राबविले जात आहेत. याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.हे अभियान म्हणजे केवळ कार्यक्रमांची मालिका नाही. सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यालयाच्या फेऱ्या कमी होणार गावातील एखाद्या नागरिकाला प्रमाणपत्र हवे असते, शेतकऱ्याला जमिनीची नोंद अद्ययावत करायची असते किंवा एखाद्या कुटुंबाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असतो. अशा वेळी अनेकदा विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. सेवा संकल्प अभियानात ही प्रक्रिया शक्य तितकी सोपी करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरे आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजेच अनेक सेवा एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा निर्माण होणार आहे. शिबिरांच्या माध्यमातून कामांना गती या शिबिरांमध्ये फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद, शेतपाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, नळजोडणी, वीज जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधार, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच ७/१२ आणि ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर—ज्या सेवेसाठी नागरिकाला वारंवार कार्यालयात जावे लागते, ती सेवा शक्य तितकी त्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे. गावात सेवा, गावातच समाधान सेवा संकल्प अभियानाचा विशेष भर ग्रामीण भागावरही आहे. प्रत्येक गावात आणि वॉर्डात स्थानिक गरजेनुसार ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. गाव स्वच्छ ठेवणे, नदीघाट आणि बारवांची स्वच्छता करणे, वृक्षारोपण करणे, रक्तदान करणे, आरोग्य तपासणी शिबिर घेणे, प्लास्टिकमुक्तीची जनजागृती करणे, जलसंधारण करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, रस्ते सुरक्षेबाबत जागृती करणे अशा अनेक उपक्रमांना या माध्यमातून चालना मिळणार आहे. शासनाची सेवा, समाजाचा सहभाग याचा अर्थ एकच—शासनाची सेवा आणि समाजाचा सहभाग एकत्र आला, तर गावाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जमीन आणि महसूल विषयक कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. फेरफार नोंदी, ७/१२, ८-अ, स्वामित्व सनद, वनहक्क दावे यांसारख्या बाबी अनेकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या आहेत. वनहक्क दाव्यांच्या बाबतीत नवीन दावे स्वीकारणे, जुन्या दाव्यांमधील दुरुस्ती करणे आणि पात्र दावे निकाली काढण्याची प्रक्रिया अभियानाच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.म्हणूनच सेवा संकल्प अभियानाचा लाभ गावातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन गरजांशी जोडून पाहणे महत्त्वाचे आहे. अंगणवाडीतही सेवा उत्सव लहान मुले आणि त्यांच्या मातांसाठीही या अभियानांतर्गत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘अंगणवाडी उत्सव’ अंतर्गत अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांना आमंत्रित करून महिलांना आरोग्य आणि पोषणविषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, फळे व मिठाईचे वाटप आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची तरतूद आहे. ग्रामीण कुटुंबाच्या आरोग्याचा पाया मजबूत करण्यासाठी आई आणि बालकाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे अंगणवाडी उत्सव हा केवळ एक कार्यक्रम न राहता आई, बालक आणि पोषण यांना जोडणारा उपक्रम ठरतो. गावातील तरुणांच्या कल्पनांना नवे व्यासपीठ आज ग्रामीण भागातील तरुणांकडे अनेक चांगल्या कल्पना आहेत. शेती, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत ते नवे प्रयोग करू शकतात. योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले, तर या कल्पना मोठ्या बदलाचे कारण ठरू शकतात.सेवा संकल्प अभियानात राज्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक, कॉर्पोरेट इनोव्हेटर्स आणि ग्रामीण भागात नवे प्रभावी उपाय विकसित करणाऱ्या व्यक्तींना जोडण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. निवडलेल्या उत्कृष्ट कल्पनांना तज्ज्ञांसमोर सादरीकरणाची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देशाचे भविष्य वर्गखोल्यांमध्ये घडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या अभियानाशी जोडण्यात आले आहे. ‘विकसित भारत’ आणि ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ या विषयांवर चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि स्वप्नांना व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे.आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे. त्यामुळे विकसित भारताची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासोबतच त्यांच्या कल्पना आणि स्वप्नांना भविष्यातील भारताच्या उभारणीशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ‘आशीर्वादाचा दिवा ’ शासकीय योजनेचा लाभ मिळालेल्या नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा उपक्रमही या अभियानात आहे. विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दीप प्रज्वलित करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.सरकारची योजना कागदावर असते; पण तिचा लाभ जेव्हा एखाद्या कुटुंबाच्या घरात पोहोचतो, तेव्हा त्या योजनेला खरा अर्थ प्राप्त होतो. त्या समाधानाच्या क्षणाला जोडणारा हा उपक्रम आहे. बदलाची गोष्ट आता गावागावातून एखाद्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळाल्याने शेतीत बदल झाला, एखाद्या महिलेला बचत गटामुळे आर्थिक आधार मिळाला, एखाद्या विद्यार्थ्याला संधी मिळाली किंवा एखाद्या कुटुंबाचे जीवनमान सुधारले, तर ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट राहत नाही. ती इतरांसाठीही प्रेरणा बनते. म्हणूनच ‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमातून विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल त्यांच्या स्वतःच्या शब्दांत समाजासमोर आणला जाणार आहे. त्यांच्या अनुभवांचे व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून संकलन करण्यात येणार आहे. सेवा संकल्पाची खरी दिशा सेवा संकल्प अभियानातील प्रत्येक उपक्रमामागे वेगवेगळी उद्दिष्टे असली, तरी त्यामागची भावना एकच आहे—सामान्य नागरिकाला सेवा मिळविण्यासाठी अधिक सोपे, सुलभ आणि जवळचे वातावरण निर्माण करणे.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद व लोकसहभाग वाढविणारा ठरणार आहे. योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना मिळावा, शासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ‘माहितीअभावी पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये’, ही या उपक्रमामागील प्रमुख भूमिका आहे. या अभियानाला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद त्याच्या यशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रवीण टाके उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ९७०२८५८७७७ ****

रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र 2026 युवकांच्या स्वप्नांना रोजगाराची नवी दिशा; एकाच दिवशी राज्यभर संधींचा महाकुंभ..!

मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, “युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधींचे व्यापक दालन खुले करण्यात येत आहे. दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, राज्यभरातील युवकांना त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांसमोर अनेकदा योग्य संधी, योग्य रोजगारदाता आणि योग्य कौशल्य यांचा मेळ घालण्याचे आव्हान असते. दुसरीकडे उद्योग-व्यवसाय क्षेत्रालाही आवश्यक कौशल्य असलेले मनुष्यबळ शोधताना अडचणी येतात. याच रोजगारदाता आणि रोजगार इच्छुक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी रोजगार महाकुंभाची संकल्पना आकाराला आली आहे. एकाच दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करून रोजगाराची संधी युवकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राज्यभर १००० ठिकाणी एकाच दिवशी रोजगार मेळावे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. औद्योगिक आस्थापना, MSME, उद्योग संघटना, महाविद्यालये, विद्यापीठे, कौशल्य विद्यापीठे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पॉलिटेक्निक तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. “१००० रोजगार मेळावे, एकाच दिवशी” हा केवळ विक्रमी आकडा नसून, महाराष्ट्रातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन, उद्योग आणि कौशल्य यंत्रणा यांना एकत्र आणणारा व्यापक उपक्रम आहे”. राज्याच्या प्रत्येक भागातील युवकांना रोजगाराच्या संधींच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे, उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करणे आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांना प्रत्यक्ष संधीशी जोडणे, ही या उपक्रमामागील प्रमुख संकल्पना आहे. या उपक्रमाला उद्योग क्षेत्राकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उपलब्ध माहितीनुसार राज्यभर 1,080 रोजगारदात्यांनी नोंदणी केली असून त्यांच्याकडून 60,657 रिक्तपदे उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर 57,648 रोजगार इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे रोजगार महाकुंभ हा केवळ एक दिवसाचा रोजगार मेळावा न राहता, मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी आणि उमेदवार यांना जोडणारा राज्यव्यापी उपक्रम ठरण्याची क्षमता बाळगतो. या महाकुंभाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे “रोजगारासाठी उमेदवाराची तयारी”. रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात येत आहे. करिअरविषयक मार्गदर्शन, स्वतःची ओळख प्रभावीपणे करून देणे, मुलाखत व मॉक इंटरव्ह्यू, व्यक्तिमत्त्व विकास व ग्रूमिंग, कार्यस्थळावरील कौशल्ये, संवाद कौशल्ये तसेच संबंधित क्षेत्रातील रोजगारासाठी आवश्यक तयारी अशा विविध बाबींवर प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष सरावाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. म्हणजेच रोजगार महाकुंभाची वाटचाल “नोंदणी → कौशल्य व मुलाखत तयारी → रोजगार मेळावा → निवड → प्रत्यक्ष नियुक्ती” अशा सर्वसमावेशक प्रक्रियेतून होत आहे. उमेदवाराला केवळ नोकरीची माहिती देणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, त्याला मुलाखतीसाठी सक्षम करणे आणि योग्य रोजगाराशी जोडणे हा त्यामागील व्यापक दृष्टिकोन आहे. विशेष म्हणजे रोजगार मेळाव्यानंतरही प्रक्रिया थांबणार नाही. उमेदवारांच्या निवडीचा आणि प्रत्यक्ष नियुक्तीचा मागोवा घेण्यासाठी Post-Drive Tracking ची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक निवडीनंतर प्रत्यक्ष नियुक्तीमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी पुढील कालावधीत पाठपुरावा व आढावा घेण्याची यंत्रणा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे रोजगार महाकुंभाचा भर केवळ उपस्थिती आणि निवडीच्या आकडेवारीवर नसून प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीच्या परिणामावर राहणार आहे. आजच्या स्पर्धात्मक रोजगार बाजारात शिक्षणसोबत कौशल्य, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि मुलाखतीची तयारी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे दहावी-बारावीपासून पदवी, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी शोधण्याची ही महत्त्वाची संधी आहे. सांगली जिल्ह्यात 16 ठिकाणी रोजगाराच्या संधी - रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र 2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यातही व्यापक नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील १६ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागांतील युवकांना त्यांच्या परिसरातच नामांकित उद्योग व आस्थापनांमधील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या रोजगार महाकुंभाची तयारी म्हणून सध्या जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) क्षेत्रनिहाय रोजगारक्षम प्रशिक्षण सुरू आहे. उमेदवारांच्या गरजा आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विविध क्षेत्रांशी संबंधित प्रशिक्षण, मुलाखतीची तयारी, स्वयं-परिचय, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास तसेच रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याला येणारा उमेदवार केवळ नोकरीच्या शोधात नसून, नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक तयारी करूनच रोजगारदात्यांसमोर आत्मविश्वासाने उभा राहणार आहे. रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र 2026 हा केवळ रोजगार मेळावा नसून युवकांच्या आकांक्षा, उद्योगांच्या गरजा आणि शासनाच्या कौशल्य विकासाच्या प्रयत्नांना एका व्यासपीठावर आणणारा व्यापक उपक्रम आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील युवकांनी या संधीचा लाभ घेत स्वतःची नोंदणी करावी, पूर्व-रोजगार प्रशिक्षणात सहभागी व्हावे आणि आपल्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधींचा शोध घ्यावा. 29 सप्टेंबर 2026 हा दिवस महाराष्ट्रातील हजारो युवकांसाठी “नोकरीच्या शोधाचा दिवस” न राहता “नव्या करिअरची सुरुवात करण्याचा दिवस” ठरावा, हीच रोजगार महाकुंभामागील खरी अपेक्षा आहे. संधी मोठी आहे-व्यासपीठ राज्यव्यापी आहे- आता गरज आहे ती युवकांनी एक पाऊल पुढे टाकण्याची! श्रीमती इनुजा शेख सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली 000000

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. विविध विभागांच्या योजनांची माहिती प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व मानाच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ‘लोकसंवाद-२०२६’मध्ये कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण आदी विभागांसह सर्वच विभागांचा सहभाग असणार आहे. शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे, कृषी औजारांसाठी अनुदान, महिला बचत गट तसेच महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शिक्षण, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती योजना सवलती यासह विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह मोफत तपासणी, औषधोपचार व शिष्यवृत्तीशी संबंधित सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती आदी संस्थांच्या योजनांबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे. आंतरविभागीय समन्वयावर भर ‘लोकसंवाद-२०२६’ प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, पणन, कौशल्य विकास, सामाजिक न्याय तसेच पोलीस विभागासह संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ प्रत्यक्ष गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांना थेट आणि अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी शक्य असेल तेथे कार्यक्रमांचे फेसबुक किंवा युट्यूब लाईव्ह करण्यात येणार असून, सोशल मीडियावर #गणेशोत्सव२०२६ आणि #लोकसंवाद२०२६ हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंतही योजनांची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्या गणेश मंडळांना या कार्यक्रमात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच मुंबई शहर व उपनगर गणेश मंडळानी माहिती व जनसंपर्क विभाग,मंत्रालय मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे. 000000