sangmahiti
गुरुवार, ३० जुलै, २०२६
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी व आधार प्रमाणीकरण बंधनकारक
सांगली, दि. 30,(जि.मा.का.): - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे. ती संबंधित बँकांच्या शाखांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळण्यासाठी यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असल्याचे शिराळा तहसीलदार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे:-
१) शेतकऱ्यांनी केंद्र चालकास आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील त्यांच्या नावासमोरचा विशिष्ट क्रमांक सादर करावा.
२) शेतकऱ्याची अॅग्रीस्टॅक नोंदणी झाली नसल्यास प्रथम अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्यात यावी.
३) आधार प्रमाणीकरण करतेवेळी संगणक पटलावर दिसत असलेला आपला आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक, कर्ज थकीत रक्कमेबाबत खात्री करण्यात यावी.
४) दिसत असलेली माहिती बरोबर असल्यास Agree व Submit ही प्रक्रीया पूर्ण करुन बायोमेट्रीक पध्दतीने प्रमाणीकरण पूर्ण करावे व पावती प्राप्त करुन घ्यावी.
५) आधार क्रमांक चुकीचा दर्शविला असल्यास बरोबर आधार क्रमांक टाकून प्रमाणीकरण करुन पावती घ्यावी. म्हणजे आधार क्रमांकात दुरुस्तीबाबतची तक्रार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाखल होईल.
६) कर्ज रक्कम किंवा कर्ज क्रमांकाबाबत चुकीची माहिती दर्शविण्यात येत असल्यास प्रथम बायोमेट्रीक पध्दतीन प्रमाणीकरण पूर्ण करावे, कर्ज खात्याचे माहितीबाबत असहमती नोंद करुन पावती घ्यावी, म्हणजे याबाबतची तक्रार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाखल होईल.
७) बोटांचा ठसा वापरुन आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) नोंद होत नसल्यास Unable to authenticate हा पर्याय वापरुन केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरण करावे व पावती द्यावी. म्हणजे याबाबतची तक्रार तहसिलदार यांच्याकडे होईल.
याबाबत काही अडचण आल्यास तहसिलदार शिराळा व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार, शिराळा व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
०००००००
'इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट' वाहनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण
- मलवाहिनी स्वच्छतेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला मिळणार बळ
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : मलवाहिन्या व मलसंकलन केंद्रांच्या स्वच्छतेदरम्यान उद्भवणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट (Emergency Response Sanitation Unit - ERSU) चे अत्याधुनिक वाहन सांगली जिल्ह्यात दाखल झाले असून, या वाहनाचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) दत्तात्रय लांघी आदि उपस्थित होते.
सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट (ERSU) ची स्थापना करण्यात येणार आहे. या युनिटच्या माध्यमातून मलनिःस्सारण प्रकल्पांतील मलवाहिन्या तसेच मलसंकलन टाक्या (Sewer आणि Septic Tank) यांच्या देखभाल, दुरुस्ती व स्वच्छतेचे काम अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने करता येणार आहे. या कक्षामार्फत संबंधित काम करणाऱ्या मनुष्यबळाला अत्याधुनिक सुरक्षा साधने, आवश्यक उपकरणे तसेच विशेष प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांना होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये घट होण्यास मदत होईल.
तसेच, मलवाहिन्या व मलसंकलन टाक्यांच्या साफसफाईदरम्यान घडणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार असून, सुरक्षित व मानवीय पद्धतीने स्वच्छता सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
00000
घरपट्टीसंदर्भात प्राप्त प्रत्येक हरकतीचे निरसन करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- महापालिका विकासकामांच्या आढावा बैठकीत सूचना
- प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
- नागरिकाभिमुख सेवांवर भर
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : महापालिका क्षेत्रातील घरपट्टी अनुषंगाने नागरिकांची बाजू ऐकून घ्यावी. घरपट्टीसंदर्भात प्राप्त प्रत्येक हरकतीचे निरसन करावे. नागरिकांचे योग्य समाधान करावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामे आणि नागरी सुविधांच्या सविस्तर आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानवरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचा बैठक कक्षात आयोजित या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापौर धीरज सूर्यवंशी, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, उपमहापौर गजानन मगदूम, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपायुक्त राहुल रोकडे आणि अश्विनी पाटील, स्थायी समिती सभापती अतुल माने, महापालिका गटनेते संदीप आवटी आदि उपस्थित होते.
बैठकीत प्रामुख्याने घरपट्टीच्या अनुषंगाने आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात घरपट्टीबाबत सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घ्यावे. हरकतीबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने प्राप्त निवेदनाची दखल घ्यावी. प्राप्त प्रत्येक हरकतीची दखल घेऊन प्रत्यक्ष घरभेटी देऊन घरपट्टी आकारणीची पडताळणी करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भांडवली पध्दतीने कर आकारणीनुसार कर कमी झालेल्या मालमत्ता 36 हजार 539 व कराच्या मागणीमध्ये कोणताही बदल न केलेल्या मालमत्ता (500 चौ. फुट) 44 हजार 210 अशा एकूण 80 हजार 749 मालमत्ता आहेत. या अनुषंगाने ज्यांची घरपट्टी कमी झाली किंवा आहे तेवढीच आहे, त्यांचा दाखला देऊन सामान्य नागरिकांना याची माहिती द्यावी. त्यामुळे नागरिकांचे याबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रलंबित विकासकामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मालमत्ता कर वसुली, थकीत महसूल, जन्म-मृत्यू दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी येणारे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी पाठपुरावा करावा, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवा अधिक सक्षम करणे, तसेच विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे गतिमान करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तसेच, पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रत्येक विकासकामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देत नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत शहरातील क्रीडा सुविधा विकासासह नदीकाठ विकास (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट) प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध विकासकामांसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया आणि निधी उपलब्धतेबाबतही चर्चा करण्यात आली.
00000
'इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट' वाहनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण
- मलवाहिनी स्वच्छतेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला मिळणार बळ
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : मलवाहिन्या व मलसंकलन केंद्रांच्या स्वच्छतेदरम्यान उद्भवणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट (Emergency Response Sanitation Unit - ERSU) चे अत्याधुनिक वाहन सांगली जिल्ह्यात दाखल झाले असून, या वाहनाचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) दत्तात्रय लांघी आदि उपस्थित होते.
सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे इमर्जन्सी रिस्पॉन्स सॅनिटेशन युनिट (ERSU) ची स्थापना करण्यात येणार आहे. या युनिटच्या माध्यमातून मलनिःस्सारण प्रकल्पांतील मलवाहिन्या तसेच मलसंकलन टाक्या (Sewer आणि Septic Tank) यांच्या देखभाल, दुरुस्ती व स्वच्छतेचे काम अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने करता येणार आहे. या कक्षामार्फत संबंधित काम करणाऱ्या मनुष्यबळाला अत्याधुनिक सुरक्षा साधने, आवश्यक उपकरणे तसेच विशेष प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांना होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये घट होण्यास मदत होईल.
तसेच, मलवाहिन्या व मलसंकलन टाक्यांच्या साफसफाईदरम्यान घडणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार असून, सुरक्षित व मानवीय पद्धतीने स्वच्छता सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
00000
कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-2026 चा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) नोंदणी, आधार प्रमाणीकरण तसेच बँकेकडून आवश्यक असलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रवीण शिंदे यांच्यासह राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, योजनेच्या संगणकीय प्रणालीवर बँकांकडून थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली असून त्याचे संगणकीय संस्करण सुरू आहे. या प्रक्रियेनंतर योजना निकषानुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी 25 जुलै 2026 रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा, विकास सोसायट्या, ग्रामपंचायती आणि गाव चावडीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 38 हजार 410 शेतकरी पात्र ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 56 हजार 962 आणि राष्ट्रीयकृत व इतर बँकांची 12 हजार 99 अशी एकूण 68 हजार 981 कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 34 हजार 547 आणि राष्ट्रीयकृत व इतर बँकांचे 3 हजार 863 असे एकूण 38 हजार 410 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी पोर्टलवर प्राप्त झाली आहे
या पात्र शेतकऱ्यांपैकी 23 हजार 512 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 21842 आणि राष्ट्रीयकृत व इतर बँकांचे 1670 शेतकरी आहेत. मात्र, अद्याप 14898 पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असल्याने संबंधितांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील 12 हजार 385 शेतकऱ्यांकडे अद्याप फार्मर आयडी उपलब्ध नाही. यामध्ये आटपाडी तालुक्यातील 687, खानापूर 358, मिरज 1 हजार 692, वाळवा 1 हजार 133, तासगाव 1 हजार 103, कवठेमहांकाळ 1 हजार 679, जत 3 हजार 865, पलूस 520, शिराळा 750 आणि कडेगाव 595 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक असल्यास संबंधित बँक, महा-ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र, ग्रामपंचायत तसेच कृषी व सहकार विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार प्रमाणीकरण आणि इतर आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
000000
बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी ही काळाची गरज - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
- पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
- 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड
- 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग; 813 रिक्त पदांसाठी 2000 पेक्षा अधिक उमेदवारांची उपस्थिती
सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : भारतातील रोजगार क्षेत्र झपाट्याने बदलत असून असंघटित क्षेत्राचे संघटित क्षेत्रात रूपांतर करण्यासाठी शासन विविध धोरणांद्वारे प्रयत्नशील आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे उद्योग, बँकिंग, उत्पादन, सेवा तसेच शासकीय क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे केवळ पदवी किंवा परीक्षेतील गुणांवर भर न देता बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा 2026 च्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली येथे आयोजित या रोजगार मेळाव्यास पुणे विभागीय रोजगार मेळावे समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश चितळे, रोजगार मेळावा जिल्हा समन्वय समितीच्या अध्यक्षा काव्यश्री नलावडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, विमन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. लता देशपांडे, उपाध्यक्ष स्मिता केळकर, सचिव यशश्री आपटे, प्राचार्य अनिल सुगते, शिवाजी विद्यापीठ IQAC गुणवत्ता अधिकारी प्रा. सुभाष माने आदि उपस्थित होते. दुपारपर्यंत चाललेल्या या रोजगार मेळाव्यास आमदार सुधीर गाडगीळ यांनीही भेट देऊन मार्गदर्शन केले. रोजगार मेळाव्यात 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांकडून करण्यात आली.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने आयोजित या रोजगार मेळाव्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग-6, ऑटोमोबाईल-4, अभियांत्रिकी-4, बँकिंग व फायनान्स सर्व्हिसेस-4, सेल्स अँड सर्व्हिस-5, हॉस्पिटल-2, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स-3, इलेक्ट्रिकल्स-1 आणि फूड्स-2 अशा विविध क्षेत्रांतील एकूण 30 नामांकित आस्थापना/कंपन्यांनी सहभाग नोंदविला. या सर्व कंपन्यांमार्फत एकूण 813 रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, आजचा रोजगार मेळावा हा केवळ नोकरी मिळविण्याचे व्यासपीठ नसून उद्योगविश्व समजून घेण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी आहे. उमेदवारांनी केवळ आपल्या आवडीच्या कंपन्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विविध क्षेत्रातील संधी, आवश्यक कौशल्ये आणि उद्योगांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात. सुरुवातीच्या काळातील प्रशिक्षण, इंटर्नशिप किंवा प्रोबेशन हा करिअर घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा असून त्या काळात मिळणारा अनुभव भविष्यात मोठी संधी निर्माण करतो, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. घोष म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात विशेष कौशल्य (Specialization) विकसित करणे अत्यावश्यक आहे. बाजारपेठेच्या गरजेनुसार स्वतःमध्ये सातत्याने बदल स्वीकारणारे आणि नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे युवक-युवतीच भविष्यात यशस्वी ठरणार आहेत. बदलाला स्वीकारून स्वतःच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करणाऱ्यांसाठी देशात रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. भारतातील युवा शक्ती ही देशाची मोठी ताकद असून तिचे कौशल्यात रूपांतर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
गिरीश चितळे यांनी युवकांना प्रेरणा देताना सांगितले की, आजच्या काळात केवळ रोजगार शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे बना. कौशल्य, आत्मविश्वास, नवकल्पना आणि उद्योजकीय वृत्ती यांच्या बळावर स्वतःबरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता प्रत्येक युवकामध्ये आहे. शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार आणि उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्या. रोजगार देणारे युवकच विकसित भारताच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावतील.
यावेळी रोजगार मेळावा समन्वय समितीच्या अध्यक्ष काव्यश्री नलावडे यांनी मेळाव्याची माहिती दिली. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संस्थांमधील रोजगार संधींची माहिती उमेदवारांना दिली. मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या मोठ्या संख्येने युवक-युवतींनी सहभाग घेतला. उमेदवारांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून थेट मुलाखती दिल्या. रोजगार मेळाव्यास एकूण 2 हजाराहून अधिक उमेदवारांनी उपस्थित राहून विविध कंपन्यांच्या मुलाखती दिल्या.
प्रास्ताविकात सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश, युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच उद्योग-शिक्षण समन्वयाचे महत्त्व विशद केले.
सूत्रसंचालन डॉ. वैशाली जोशी यांनी केले, तर आभार कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरज देबाजे यांनी मानले.
कार्यक्रमास विविध शासकीय अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.
00000
बुधवार, २९ जुलै, २०२६
सांगलीत गुरूवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा
- 19 पेक्षा अधिक नामांकित आस्थापना; 500 हून अधिक पदांसाठी थेट भरती
सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा 2026 चे आयोजन गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, सांगली येथे सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह थेट मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. सांगली जिल्हा व परिसरातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार मेळावा समन्वय समितीच्या अध्यक्ष काव्यश्री नलावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
या रोजगार मेळाव्यात 19 पेक्षा अधिक नामांकित आस्थापना व कंपन्या सहभागी होणार असून 500 हून अधिक रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, आयटी/बीपीओ, बँकिंग व फायनान्स सर्व्हिसेस, सेल्स अँड मार्केटिंग तसेच इतर विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी या मेळाव्यात उपलब्ध होणार आहेत.
दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांसाठी थेट वॉक-इन मुलाखती देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांना नियोक्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून जागेवरच प्राथमिक निवड होण्याची संधी मिळणार आहे.
रोजगार मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी रेझ्युम/बायोडाटा (तीन प्रती), शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती, आधार कार्ड तसेच पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावे. मेळाव्यात सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी (0233) 2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)