मंगळवार, २१ जुलै, २०२६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. या योजनेअंतर्गत आधुनिक सिंचन सुविधा, शेतीपूरक साधने आणि कृषी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरीसाठी 4 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 90 टक्के अनुदान अथवा कमाल 2 लाख रुपये (आकारमानानुसार अनुदान देय), इनवेल बोअरिंग व पंप संच 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत 90 टक्के अनुदान अथवा 40 हजार रुपये, पीव्हीसी/एचडीपीई पाईप व सोलर पंपासाठी 100 टक्के अनुदान अथवा 50 हजार रुपये, ठिबक व तुषार सिंचन संचासाठी 90 टक्के अनुदान किंवा 47 हजार रूपये व 97 हजार रूपये (पूरक अनुदान), कृषी यंत्रसामग्रीसाठी 50 हजार रूपये व परसबाग विकासासाठी 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (www.mahadbt.maharashtra.gov.in) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर जमीनधारणा असावी. दारिद्र्यरेषेखालील (BPL) लाभार्थ्यांना जमीन मर्यादेची अट लागू राहणार नाही. निवड प्रक्रिया "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" (FCFS) या तत्त्वावर होणार असून महिला, दिव्यांग व बीपीएल शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. मंजूर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे. 00000

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 22 जुलैला सांगलीत

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 22 जुलैला सांगलीत - नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' आयोजित करण्यात येत आहे. 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी हे विशेष शिबीर दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 पर्यंत मल्हार हॉल, बालाजी मिल रोड, शिवाजीनगर, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव आणि सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. या अभियानास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर उपस्थित राहणार आहेत. या अभियानाचा उद्देश महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. या अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण, भूसंपादन प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून दप्तर अद्ययावत करणे, सातबारा मधील त्रुटींची दुरूस्ती करून दूरूस्त सातबारा देणे, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत वारस नोंदी, पात्र अ.पा.क. नोंदी कमी करणे, ए.कु.में. नोंदी कमी करणे, नजर गहाण इत्यादी नोंदीबाबत कार्यवाही, डिजीटल सातबाऱ्याच्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती करणे, अकृषक तरतुदीतील सुधारणांबाबत मार्गदर्शन करणे, ई-मोजणी सेवा, ॲग्रीस्टॅक नोंदणी, पी. एम. योजनेशी संबंधित कामे इत्यादी विविध विभागांकडून लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि सेवा हमी कायद्यानुसार देय असलेल्या सेवांचा लाभ नागरिकांना घेता येईल. मिरज तालुक्यातील प्रत्येक विभागाचा एक स्टॉल लावण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार असून 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव आणि सांगली अप्पर तहसिलदार अश्विनी वरूटे यांनी केले आहे. 00000

सोमवार, २० जुलै, २०२६

शिराळा तालुक्यात 7.4 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 7.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.5 (199.2), जत 0.1 (157.8), खानापूर 0.9 (207.8), वाळवा 1.4 (273), तासगाव 0.6 (209.6), शिराळा 7.4 (537.9), आटपाडी 0.0 (166.1), कवठेमहांकाळ 0.0 (130.5), पलूस 2.0 (196.7), कडेगाव 1.5 (213.8). 00000

वारणा धरणात 23.88 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 23.88 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 61.31 (105.25), धोम 6.69 (13.50), कन्हेर 8.91 (10.10), धोम बलकवडी 3.48 (4.08), उरमोडी 6.50 (9.97), तारळी 3.46 (5.85), वारणा 23.88 (34.40), राधानगरी 6.49 (8.36), दूधगंगा 10.78 (25.40), तुळशी 2.19 (3.47), कासारी 1.78 (2.77), पाटगांव 2.04 (3.72), अलमट्टी 97.28 (123). सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे - कण्हेर धरणातून 340, धोम बलकवडी 300, तारळी 185 व अलमट्टी धरणातून 12 हजार 500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 10.6 (40) व अंकली पूल हरिपूर 13.05 (45.11). 00000

रविवार, १९ जुलै, २०२६

शिराळा तालुक्यात 18.9 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 18.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 14.3 (198.7), जत 4.0 (157.7), खानापूर 12.9 (206.9), वाळवा 9.0 (271.6), तासगाव 6.4 (209), शिराळा 18.9 (530.5), आटपाडी 3.0 (166.1), कवठेमहांकाळ 7.2 (130.5), पलूस 9.8 (194.7), कडेगाव 3.8 (212.3). 00000

वारणा धरणात 23.03 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 23.03 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 58.89 (105.25), धोम 8.54 (13.50), कन्हेर 8.85 (10.10), धोम बलकवडी 3.37 (4.08), उरमोडी 6.38 (9.97), तारळी 3.35 (5.85), वारणा 23.03 (34.40), राधानगरी 6.12 (8.36), दूधगंगा 10.12 (25.40), तुळशी 2.12 (3.47), कासारी 1.73 (2.77), पाटगांव 1.98 (3.72), अलमट्टी 94.64 (123). सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे - कण्हेर धरणातून 340, धोम बलकवडी 150, तारळी 185, दुधगंगा 100 व अलमट्टी धरणातून 16 हजार 458 क्युसेक विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 8 (40) व अंकली पूल हरिपूर 8.10 (45.11). 00000

शनिवार, १८ जुलै, २०२६

कर्जमुक्तीसाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी करावी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांचे आवाहन

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयाद्वारे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर केली असून दि. १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे योजनेच्या निकषात बदल केला असून काही अटी वगळल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅकची नोंदणी केलेली नाही त्यांनी अॅग्रिस्टॅकची नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., सांगली मार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज देत असून जिल्ह्यातील या बँकेची 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत 50,060 सभासदांची 56,962 कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. वारसा पूर्तता न झाल्याने 129, आधार क्रमांक नसल्याने 12 व 1 हजार रूपये चे आतील 9 अशी एकूण 150 कर्ज खाती प्रलंबित आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असून कर्जमुक्तीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील पात्र लाभार्थ्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांकासह आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅक नोंदणी झालेली नसेल त्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त होताच गावातील तलाठी, ग्रामसेवक व संस्थेच्या सचिवामार्फत गावामध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच बँकांच्या शाखेमध्ये सुद्धा यादी प्रसिद्ध केली जाईल. शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये विसंगती असल्यास पडताळणी केंद्रावर तसेच पोर्टलवर विसंगतीबाबत नोंद करणे आवश्यक आहे. विसंगती दुरुस्ती करून झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 00000