sangmahiti
शुक्रवार, १२ जून, २०२६
मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्या मतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा - निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी
सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 अंतर्गत येत्या 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदानादरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी निता सावंत-शिंदे, उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे, विजया यादव, तहसीलदार तसेच मतदान अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मतदान केंद्रांवर गोपनीयतेला प्राधान्य
प्रशिक्षणावेळी बोलताना डॉ. अमित सैनी यांनी मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचे महत्त्व अधोरेखित केले. मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने काम करत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, असे त्यांनी सांगितले. मतदान करताना कोणत्याही मतदाराने छायाचित्र काढू नये किंवा मतदान कक्षात कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नेला जाणार नाही याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मतदारांना मतदानाची योग्य पद्धत, वैध आणि अवैध मतदान याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात यावे, यासाठी आवश्यक माहिती असलेले फलक मतदान केंद्राच्या दर्शनी भागात लावावेत, असेही त्यांनी सांगितले.
वेबकास्टिंग व्यवस्था सक्षम ठेवा
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियंत्रणासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत राहील याची खात्री करण्याच्या सूचनाही डॉ. सैनी यांनी दिल्या. मतदान केंद्रांवरील सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करा
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनीही उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मतदान प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि शांततेत पार पडण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदान प्रक्रियेबाबतची सर्व माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सविस्तर जाणून घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मतदान केंद्रांवरील कामकाज, मतदानाची प्रक्रिया, मतदारांना द्यावयाच्या सूचना आणि इतर आवश्यक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अधिकाऱ्यांकडून सविस्तर प्रशिक्षण
प्रशिक्षण कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे तसेच उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी निता शिंदे यांनीही मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे, जबाबदाऱ्या आणि घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती दिली.
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रशिक्षणामुळे मतदान प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
00000
गुरुवार, ११ जून, २०२६
‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार
· एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी
क्लीव्हलँड, ओहायो | 10 : ‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व केले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या पथकाचे नेतृत्व त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहाल्जेविक, डॉ. समीर कपाडिया (अध्यक्ष, कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन), डॉ. फाल्कोने (अध्यक्ष, इमर्जिंग मार्केट्स) आणि आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष तसेच क्लीव्हलँड क्लिनिकचे संचालक मंडळ सदस्य श्री. लक्ष्मी मित्तल यांनी केले. आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन याही क्लीव्हलँड येथे उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज झालेल्या सामंजस्य करारातून ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने महाराष्ट्रासोबत या उपक्रमात भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. मिहाल्जेविक यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्लीव्हलँड क्लिनिक नेतृत्वाचे तसेच विशेषतः डॉ. समीर कपाडिया आणि लक्ष्मी मित्तल यांचे या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले."
भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून संकल्पित करण्यात आलेली नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर विकसित केली जाणार आहे.
प्रस्तावित भागीदारीनुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा पुरविण्यातील जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल. या प्रकल्पातून सुमारे 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि 10,000 हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
एनएमआयएमसीची संकल्पना केवळ आरोग्य सेवा पुरविण्यापुरती मर्यादित नाही. या परिसंस्थेमध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे, जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य सेवा नवोन्मेष, वेलनेस पायाभूत सुविधा आणि संबंधित आरोग्य सेवा एकाच सहयोगी कॅम्पसमध्ये विकसित करण्यात येणार आहेत.
मेडिसिटीभोवती विकसित होणाऱ्या व्यापक नवोन्मेष परिसंस्थेचा भाग म्हणून, लक्ष्मी एन. मित्तल यांनी स्थापन केलेल्या एलएनएमआयआयटी, जयपूरने क्लीव्हलँड क्लिनिक आणि एनएमआयएमसीसोबत संशोधन पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान क्षमता आणि शैक्षणिक कौशल्य उपलब्ध करून अत्याधुनिक आरोग्य सेवा नवोन्मेष, ट्रान्सलेशनल रिसर्च, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रिसिजन मेडिसिन उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
क्लीव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ. टॉम मिहाल्जेविक म्हणाले, "क्लीव्हलँड क्लिनिक जगभरातील धोरणात्मक भागीदारीद्वारे रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहे. एनएमआयएमसी हा भविष्यातील रुग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि संशोधकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या दूरदर्शी आरोग्य परिसंस्थेत आमचे कौशल्य योगदान देण्याची संधी आहे. महाराष्ट्र शासन, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भारतात क्लिनिकल उत्कृष्टता, नवोन्मेष आणि शिक्षणासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उभारण्यासाठी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे."
ब्रुकफिल्डचे व्यवस्थापकीय भागीदार आणि आशिया पॅसिफिक विभागाचे रिअल इस्टेट प्रमुख अंकुर गुप्ता म्हणाले, "नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक परिणाम घडवून आणणारी पायाभूत सुविधा उभारण्याची एक अद्वितीय संधी आहे. महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भविष्यातील अनेक पिढ्यांना लाभदायी ठरणारे जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा केंद्र उभारण्याचा आम्हाला अभिमान आहे."
आरोधन हेल्थ सिटीच्या संस्थापक आणि संचालक डॉ. सलोनी पटवर्धन म्हणाल्या, "जगातील सर्वोत्तम संस्थांना एकत्र आणून एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आजचा हा टप्पा आम्हाला त्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन गेला असून नवी मुंबईमध्ये जागतिक आरोग्य सेवा केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे."
महाराष्ट्र शासन या भागीदारीसाठी आवश्यक सहकार्य करेल तसेच लागू असलेल्या धोरणे आणि नियमांनुसार आवश्यक मंजुरी आणि परवानग्या मिळविण्यासाठी या समूहाला मदत करेल.
नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विषयी
नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी हा महाराष्ट्र शासन विकसित करत असलेला एक परिवर्तनकारी आरोग्य आणि जीवन विज्ञान उपक्रम आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक म्हणून विकसित होणारा हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत उभारला जाणार आहे. जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा प्रदाते, संशोधक, शिक्षक, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणून क्लिनिकल उत्कृष्टता, संशोधन, नवोन्मेष आणि वैद्यकीय शिक्षणावर आधारित जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक आरोग्य सेवा केंद्र निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
००००
रविवार, २५ जानेवारी, २०२६
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
देशाला, जिल्ह्याला वैभवशाली, संपन्न
बनविण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होऊया
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
- प्रजासत्ताक दिन हा संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस
- संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : प्रजासत्ताक दिनी देशाला तसेच जिल्ह्याला वैभवशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर त्यांनी सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक सागर गवते, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्यायाची व्यवस्था देणे ही एक मोठी जबाबदारी होती. स्वातंत्र्यापूर्वी राजघराणेशाही होती. स्वातंत्र्यानंतर लोकांचे लोकांसाठी राज्य आले. या अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. महिलेला पुरूषांबरोबरीचे स्थान देणे या मूळ भारतीय गाभ्याप्रमाणे या समितीमध्ये 5 महिला सदस्य होत्या, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. तर संविधान संपूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागे एक ऐतिहासिक कारण होते. 26 जानेवारी 1930 रोजी आपण लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करूनच संविधान अंमलात आणण्याचा दिवस ठरवण्यात आला, असे ते म्हणाले.
भारतीय राज्यघटनेमध्ये अशी रचना करण्यात आली की भविष्यात त्यात बदल करावा लागणार नाही. राज्यघटना सोप्या शब्दात मांडलेली असून, देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना त्यात करण्यात आल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिन हा संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस आहे. अधिकारांसोबतच कर्तव्यांचे आणि कायद्याचे आदरपूर्वक पालन करणे, सार्वजनिक शिस्त राखणे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, त्यामुळेच आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, सांगली जिल्हा अमली पदार्थमुक्त करताना भावी पिढी नशामुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिलेले थोर क्रांतिकारक, शूरवीर, शहीद, महापुरूष, स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त, समाजसुधारक, शहीद जवान, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांना अभिवादन करून उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मुख्य शासकीय समारंभात प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. यावेळी विविध पथक प्रमुखांनी त्यांना मानवंदना दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा दल, अग्निशमन दल, पोलीस दल बँड पथक, दंगल विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जिल्ह्यामध्ये विविध शाळांमध्ये विद्यार्थीनीना कराटे प्रशिक्षण दिले जाते, याचे प्रात्यक्षिक आज सादर करण्यात आले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे, बाळासाहेब माळी यांनी केले. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. तसेच, विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हे सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे कार्यरत असताना शहीद झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री. भगत यांचे वडील शंकर भगत यांना 1 कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
दिनांक 23 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सोलापूर येथील महापुराच्या वेळी सांगली जिल्ह्यातील स्वयंस्फूर्त, स्वयंसेवक, आपदा मित्र यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल दत्ता पाटील, महेश कुमारमठ व कैलास वडर यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
शिवछत्रपती विद्यालय शिराळा शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी बालाजी पाटील, (वय वर्षे 11) याने उपवळे येथे त्याची सख्खी बहीण स्वरांजली (वय 9 वर्षे) हिला बिबट्याच्या तावडीतून वाचवल्याबद्दल तसेच परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेला विद्यार्थी प्रणव भोसले (अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी) याचा सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील निखील साळुंखे व नेहा ठोंबरे, राकेश दड्डणवार, राधिका पेंडसे, यांचा तसेच, नॅशनल इन्स्टिट्युट फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च सेंटर सांगली, युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था सांगली, या संस्थांचा सहाय्यक कृषि अधिकारी सर्वश्री गोरख जरे, गजानन अजेटराव, उमेश साळे तसेच विजया राठोड, जिल्हा संसाधन व्यक्ती राहूल ठोंबरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस विभागाकडील विविध कामगिरीमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक सर्वश्री सतीश शिंदे, संजीव झाडे व मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, संदीप शिंदे, त. अधिकारी संतोष यादव व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कोळेकर यांचाही सन्मान करण्यात आला.
00000
बुधवार, १४ जानेवारी, २०२६
श्री गुरु तेज बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या समागम निमित्त माहिती देणारी क्रमशः मालिका
(विशेष लेख मालिका भाग 3)
श्री गुरु तेज बहादूर साहिब जी
यांच्या 350 व्या समागम निमित्त माहिती देणारी क्रमशः मालिका
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमिवर नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम होत असून, नांदेड येथील कार्यक्रम येत्या दि. 24 व 25 जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमिवर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनचरित्राची क्रमशः माहिती….
गुरुगद्दीचा प्रकाश
गुरु तेज बहादुर यांचे नाव पंजाब आणि भारताच्या अनेक भागांत पसरले. जेव्हा त्यांनी 'गुरु' असल्याचा अधिकार मान्य केला, तेव्हा त्यांच्या गुरुगद्दीचा प्रकाश सर्व समुदायासाठी आनंदाचा विषय ठरला. ते नेहमी गुरूच्या भल्यासाठी वेळ घालवत आणि गुरूंचा आशीर्वाद त्यांना २२ पौर्णिमा मिळाला. ते काही काळ स्थिर राहून काम करत राहिले. पण, त्यात त्यांना लोभ आला आणि त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही व गुरूच्या आदेशांचे पालन करू शकले नाही. एका दिवशी त्यांनी महंत आत्मारामांना असे बोलले जे चांगल्या हेतूने नव्हते. गुरु तेज बहादूर यांनी प्रेमाने समजावून सांगितले की, श्री गुरु ग्रंथ साहिबकडून विचार (वाचून) मनातील मलिनता दूर करावी. "जर तुम्ही वचन दिले असेल तर का पाळत नाही? गुरूची सेवा करण्याचे वचन पूर्ण करा. गुरूंना दिलेले कधीही वाया जात नाही. ही गोष्ट त्यांना पटली, त्यांनी नम्रतेने मान्य केले कि त्यांनी गुरूचा अनादर केला.
गुरु लाहे रे,
गुरु लाहे रे |
क्षमा करणे सर्वात मोठा गुण आहे
भाई मक्खन शहा यांनी "गुरु लाहे रे" या ओव्या देऊन गुरुजींना उपहार दिला. तरीही गुरु तेज बहादुर यांनी बाबा मलिकच्या प्रामाणिकपणाला प्राधान्य दिले. पीर मलिकच्या सेवकांनी गुरु साहिबकडे मागणी केली की, त्यांची चूक माफ केली जावी. गुरु साहिबांनी सर्वांना प्रेमाने समजावले. "माझ्या मनात कोणाविषयी द्वेष नाही. मला सर्व मानव समान आहेत. "भाई मक्खन शहा यांनी हे सगळे वचन लिहून मंडपात ठेवले आणि गुरु साहेबांकडून माफी मंत्र मागितला. जे लोक घर अन् प्रदेश सोडत होते, त्यांनाही क्षमा केली आणि त्या परिवारांना श्री गुरु ग्रंथ साहिब" चे स्वरूप देऊन आदर केला. त्यांनी लोकांना गुरुची सेवा करण्याचे महत्त्व शिकवले. कृपा करणे (क्षमा करणे) हा एक गुण आहे; तो सर्वोच्च परोपकार आहे. तो जगातील द्वेष नष्ट करून प्रेमाला जन्म देतो. ही अशी प्रकाशमयता आहे, जिला अंधार दूर करतो. सर्व लोक गुरु सारखे उदार असू शकत नाहीत. क्षमा करणे हे सोपे नाही, तर महानतेचे चिन्ह आहे.
शीखांना बळकट करणे
गुरु तेज बहादूर यांनी गुरु हरिगोविंद यांच्या प्रेरणेद्वारे १६६४ मध्ये शीख संघटना स्थापन केली. त्यांनी नानोलाची संपूर्ण जबाबदारी दूरदूरच्या भागातील शीखांना आणि त्याच्या माळी (सेवक) ला देऊन शीखांच्या सेवेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले होते. त्यांनी शीख संघटनांना (समाजाला) मजबूत करण्यासाठी वेगवेगळे धर्मप्रचारक सर्व दिशांना पाठवले आणि आपल्या दयाळू स्वभावाने सर्व लोकांना एकजूट केले. धार्मिक आणि सामाजिक विधींचे योग्य स्वरूपात रूपांतर करून, संदेश दुर्गम भागात पोहोचवला गेला. अनुयायांनी अथक परिश्रमपूर्वक सेवा केली आणि गुरुसाहेबांना अनेक मौल्यवान संदेश आणि अहवाल पाठवले गेले.
(माहितीस्त्रोत - https://gurutegbahadurshahidi.com/)
00000
मंगळवार, १३ जानेवारी, २०२६
(विशेष लेख मालिका भाग 2) श्री गुरु तेज बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या समागम निमित्त माहिती देणारी क्रमशः मालिका
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमिवर नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम होत असून, नांदेड येथील कार्यक्रम येत्या दि. 24 व 25 जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमिवर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनचरित्राची क्रमशः माहिती….
तेज के धनी
१६२८ मध्ये दिल्लीमध्ये त्या वेळच्या सरकारशी तणाव निर्माण झाला. अमृतसर देखील या तणावाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला. अमृतसरची परिस्थिती खराब होताच गुरु हरिगोविंद जी यांनी पंजाबमध्ये करतारपूर साहिब नावाचे एक नवीन केंद्र स्थापन केले आणि पुन्हा तिथे तीन दशके राज्य केले. १६३५ मध्ये करतारपूर युद्धात गुरु हरिगोविंद जी आणि त्यांचे पुत्र शूरतेने लढले. त्यात गुरु तेज बहादूर (त्या वेळी त्यागमल) यांनीही अत्यंत रोमांचक साहस दाखवले. त्यांनी स्वतःच्या तगड्या हातात तलवार धरून शत्रूंशी लढा दिला. त्यांनी गंभीर जखमा देखील घेतल्या. त्यांचे शौर्य पाहून गुरु हरिगोविंद यांनी त्यांना 'तेज बहादूर' (तलवारधारी) असा सन्मान दिला.
बाबा बकाला येथे वास्तव्य
करतारपूर युद्धानंतर गुरु हरिगोविंद यांनी परिवारासोबत कीरतपूर साहिब येथे वास्तव्य केले. गुरु तेज बहादूर आणि माता गुजरीही देखील तिथे आले. गुरु हरिगोविंद यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी गुरु तेज बहादूर आणि माता नानकी यांनी घेतली.
१६४४ मध्ये गुरु हरिगोविंद साहिब यांचे देहावसान झाल्यानंतर गुरु तेज बहादूर आणि त्यांच्या पत्नी यांनी करतारपूर सोडून आपले ननिहाल (आजोळ) असलेले गाव “बाबा बकाला” (अमृतसर जिल्हा) गावात वास्तव्य केले व तिथे ते तपस्या व भक्तीत लीन झाले.
गुरु-रूपात
दिल्ली येथे गुरु हरिगोविंद साहिब यांचे देहावसान झाल्याची बातमी येताच गुरु तेज बहादूर म्हणाले -
"बाबा बकाला,
बाबा बकाला,
बाबा बकाला,
घर बैठ गुरसिख आप मिलाए।"
यानंतर त्यांनी कोणताही जाहीरनामा किंवा घोषणा केली नाही; घरातच साधना करत राहिले. बाबा बकाला गावात अनेक दावेदार तयार झाले. जेथे लोकांना वाटले की आता त्यांना गुरु घोषित करतील. पण खरी अनुभूती गुरु तेज बहादूर यांच्यावरच आली. त्यांची नम्रता, शांत स्वभाव आणि तपस्या यांनी शीख समाजात त्यांना आदर प्राप्त झाला.
अमृतसरचे भक्त भाई मक्खन शहा लबाना बाबा बकाला येथे आले. त्यांनी मनापासून प्रार्थना करत त्या खोलीत प्रवेश केला, जिथे गुरु तेज बहादूर ध्यानात होते. मक्खन शहा लबाना यांना प्रथम त्यांची ओळख पटली नाही, पण नंतर मनापासून बघितल्यावर त्यांना दिव्य संकेतांनी त्यांची खरी ओळख कळाली. त्यांना गुरु म्हणून मान्य करून त्यांनी गुरु तेज बहादूर यांना संपूर्ण सन्मान व विश्वसनीयतेने शीख जगतात नववे गुरु म्हणून घोषित केले.
(माहितीस्त्रोत - https://gurutegbahadurshahidi.com/)
00000
सांगली पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मादी गव्याचे वाचवले प्राण
सांगली पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी
मादी गव्याचे वाचवले प्राण
सांगली, दि. 13 (जि.मा.का.) : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे वाहन अपघातात इजा झालेल्या मादी रानगव्यावर वनखाते कोल्हापूरकरिता सांगली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांनी सिझेरीन ऑपरेशन करून तिचा जीव वाचविला.
वाहन अपघातात इजा झालेल्या मादी रानगव्यावर कडगाव येथे डॉ. संतोष वाळवेकर यांच्या कॉलवरुन मिळालेल्या माहितीनुसार उपचार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातून पशुसंवर्धन विभागाची टीम तेथे हजर झाली. तपासणीदरम्यान मादी गाभण असल्याचे जाणवले. पण वासराची हालचाल मंदावली होती. अंतर्गत इजा व रक्तस्त्राव झाला असल्याने गव्याचा जीव वाचवण्यासाठी सिझर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन विभाग वाळवा व वनविभाग कोल्हापूर यांच्या टीमने हे ऑपरेशन यशस्वी पार पाडले. त्यासाठी डॉ. सचिन वंजारी, डॉ संतोष वाळवेकर, डॉ. अंबादास माडकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. प्रविण निमसे, मुकुंद वाटेगावकर या सर्वांनी मिळून गव्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. सिझरनंतर आज गव्याच्या स्थितीमधे सुधारणा झाली आहे. तिचा प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अजून उपचार सुरु असल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले.
00000
अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाच्या कारवाईत सव्वा कोटींचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त, १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाच्या कारवाईत
सव्वा कोटींचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त, १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करण्यासाठी स्थापन विशेष भरारी पथकाने सांगली जिल्ह्यात तीन दिवसात केलेल्या धडक कारवायामध्ये रु. १ कोटी, २३ लाख, ८५ हजार ,६४० रूपयांचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त करून १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे कि, अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनात राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात स्वतंत्र विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे प्रमुख भंडारा जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) यदुराज दहातोंडे यांनी पथकातील इतर अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर व मंगेश लवटे यांच्यासह सांगली जिल्ह्यामध्ये दि. 9 ते 12 जानेवारी 2026 या 3 दिवसात कारवाया केल्या. सांगली जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री. समुद्रे व नि. सु. मसारे तसेच स्थानिक अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासमवेत नियोजनबद्ध कारवायात त्यांनी प्रतिबंधित अन्न वाहतूकदार व विक्रेत्यांवर धडक कारवाया करून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला.
मगरमच्छ कॉलनी येथे वाहन क्र. एम एच १० सी आर ६४६० या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला किंमत २४,९०,४४०/-रु चा साठा व रु. ६,००,०००/-असा एकूण रु. ३०,९०,४४०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखु, पानमसाला व वाहन इत्यादी साठा सील करण्यात आला आहे व ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिरज म्हैसाळ रोड येथे वाहन क्र. के ए १३ सी ८०७४ या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला किंमत ७६,९५,२००/- रु. चा साठा व रु. १६,००,०००/- असा एकूण रु. ९२,९५,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पानमसाला व वाहन इत्यादी साठा सील करण्यात आला आहे व ७ आरोपींविरुद्ध ( खरेदीदार, वाहतूकदार, पुरवठादार, उत्पादक) गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन दिवसात केलेल्या धडक कारवायामध्ये रु. १ कोटी, २३ लाख, ८५ हजार ,६४० रूपयांचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त करून १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन, सांगली येथील अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, धनंजय आघाव, सुमित खांडेकर, तुषार घुमरे, प्रणव जिनगर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)