बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार मुंबई, दि. 9: श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागापर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग सुमारे १० हजार सार्वजनिक गणेश मंडळे, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि दात्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली असून नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमात नागरिकांना त्यांच्या परिसरात आरोग्य तपासणीची सुविधा मिळावी आणि आजारांचे वेळेत निदान व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तपासणीदरम्यान आरोग्यविषयक समस्या आढळल्यास संबंधितांना पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य आयुक्तालय, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. तपासणीनंतर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचाराचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी दि. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान आयोजित १२ हजार ६५५ आरोग्य शिबिरांमध्ये ७ लाख ४ हजार ७३ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १८ हजार ८०० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले होते. तसेच २३६ रक्तदान शिबिरांमध्ये १६ हजार ७९८ नागरिकांनी रक्तदान केले होते. या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदा उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या आजारांचा असणार समावेश हृदयरोग, किडनीविकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. गरजेनुसार पुढील तपासणी व उपचारासाठी रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम यंदा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळणार आहे. आजारांचे वेळेत निदान होऊन गरज असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य ठिकाणी संदर्भित करण्यात येणार आहे. यंदा २० लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ – २०२६ यंदा २० हजार आरोग्य शिबिरे; २० लाखांहून अधिक नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट * सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची अंमलबजावणी * सुमारे १० हजार सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग 00000

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती गठीत

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून समिती गठित केली आहे. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग (सेवा) श्रीमती व्ही. राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते, सचिव वीरेंद्र सिंह, सचिव डॉ. एन. रामास्वामी, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, संघ लोकसेवा आयोगाचे (UPSC) माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबईचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश आहे. डॉ. एन. रामास्वामी हे समितीचे सदस्य सचिव आहेत. राज्य शासनाच्या विविध विभाग, प्राधिकरणे आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या भरती परीक्षांच्या विद्यमान प्रणाली व कार्यपद्धतीचा समिती आढावा घेणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षण व मॉडरेशन, प्रश्नसंच तयार करणे, मुद्रण अथवा डिजिटल वितरण, गोपनीयता, अभिरक्षा, प्रश्नपत्रिका वाहतूक, परीक्षा संचालन, मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटणे, गोपनीयता भंग, तोतया उमेदवार, संगनमत तसेच प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर अशा अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी या समितीतर्फे उपाययोजना सुचविण्यात येतील. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबतही समिती शिफारसी करणार आहे. परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, सुरक्षा, मनुष्यबळ आणि कार्यसज्जतेसाठी किमान मानके सुचविण्यासोबतच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक, शिक्षण विभाग, परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि इतर संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयासाठी संस्थात्मक कार्यपद्धती सुचविण्यात येणार आहे. समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागास भेट देऊन विद्यार्थी व उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर हितधारकांशी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून चर्चा व सल्लामसलत करणार आहे. 0000

मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी - मतदार यादी निरीक्षक शीतल तेली - उगले

- विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत घेतला आढावा - पात्र मतदार वगळला जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश - मतदारांची गैरसोय टाळण्याच्या सूचना सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : मतदार यादी त्रृटीविरहित व अचूक होण्यासाठी संबंधित नियुक्त यंत्रणांनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे पूर्ण करावे. एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली - उगले यांनी आज येथे दिल्या. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त तथा सांगली जिल्हा नोडल अधिकारी संतोष भोर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, सर्व मतदार नोंदणी अधिकारी रघुनाथ पोटे, रणजीत भोसले, श्रीनिवास अर्जुन, डॉ. प्रकाश बांदल, विजया यादव, समाधान शेंडगे, अजयकुमार नष्टे, विशाल यादव उपस्थित होते. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दावे व हरकती 30 सप्टेंबरपर्यंत नोंदवण्यात येणार आहेत. नोटीस तसेच दावे व हरकती निकालात काढण्यासाठी 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबरचा कालावधी असून, 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक शीतल तेली - उगले प्रत्येक जिल्ह्यात तीन भेटी देणार आहेत. त्यातील पहिली भेट आज झाली असून, यावेळी त्यांनी मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही. तसेच अपात्र अथवा चुकीच्या नोंदींबाबत नियमानुसार कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणेने काटेकोरपणे काम करावे, असे सूचित करून मतदार यादी निरीक्षक शीतल तेली - उगले म्हणाल्या, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमातंर्गत मतदारसंघ निहाय नियुक्त मतदार नोंदणी अधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखावा व विहित वेळेत तो पूर्ण करावा. यासाठी जिल्हास्तरावरून आवश्यक समन्वय साधावा व नियमित आढावा घेण्यात यावा. मतदार यादीतील नोंदी अचूक व अद्ययावत राहतील, यासाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओ यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी ठेवावा, असे त्या म्हणाल्या. मतदार यादी निरीक्षक शीतल तेली - उगले म्हणाल्या, दावे व हरकती सुनावणीसाठी मतदारांच्या सोयीचे ठिकाण निवडावे. बीएलओनिहाय सुनावणी घेतली तर सर्वांना अधिक सोयीचे होईल. मतदारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दावे व हरकतींचे वेळेत निराकरण करावे. एकगठ्ठा अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हास्तरीय समितीचे गठण करावे. स्वीप उपक्रमांतर्गत अधिकाधिक जनजागृती करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले. राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबतही बैठक या बैठकीनंतर मतदार यादी निरीक्षक शीतल तेली - उगले यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी त्यांनी मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक होण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच, एकाच कुटुंबातील मतदार एकाच मतदान केंद्रावर राहावेत, या अनुषंगाने उपस्थित प्रतिनिधींनी केलेल्या मागणीला मतदार यादी निरीक्षक शीतल तेली - उगले यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, मतदारांच्या नोंदींबाबतच्या सूचना आणि क्षेत्रीय पातळीवरील बाबी मांडल्या. 00000

सांगली जिल्ह्यात विशेष महसूल लोकअदालतीचे आयोजन प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने व गतीने मार्गी लावावीत - अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील महसूल न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या आदेशान्वये जिल्हा, उपविभाग, तालुका व मंडळ स्तरावर विशेष महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घेऊन आपली प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने व गतीने मार्गी लावावीत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या (Quasi-Judicial) न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले महसुली दावे व अपिले पक्षकारांच्या परस्पर संमतीने व तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी दिनांक 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राज्यभर ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात पुढीलप्रमाणे महसूल लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी अपर जिल्हाधिकारी स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे लोकअदालत होणार आहे. उपविभागीय कार्यालय – वाळवा/कडेगाव/जत/विटा स्तरावर 28 सप्टेंबर 2026 रोजी संबंधित उपविभागीय कार्यालयात, तर उपविभागीय कार्यालय मिरज अंतर्गत 23 सप्टेंबर 2026 रोजी तहसील कार्यालय कवठेमहांकाळ, 25 सप्टेंबर 2026 रोजी तहसील कार्यालय तासगाव आणि 28 सप्टेंबर 2026 रोजी उपविभागीय कार्यालय मिरज येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 24 सप्टेंबर 2026 रोजी तहसीलदार/ अपर तहसीलदार स्तरावर संबंधित तहसील / अपर तहसीलदार कार्यालयात आणि 21 सप्टेंबर 2026 रोजी मंडळ अधिकारी स्तरावर संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयात लोकअदालत होणार आहे. संबंधित नागरिकांनी अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी केले आहे. 00000

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

भरती परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्स गठीत

उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद राज्यातील #भरती #परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील. टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६ स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६ स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६ स्थळ : अमरावती ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६ स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६ स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६ स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाचे महत्त्वाचे पाऊल!

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

• सहा विभागांना याच महिन्यात भेटी • विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद मुंबई, दि. ७ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६ स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६ स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६ स्थळ : अमरावती ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६ स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६ स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६ स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात. या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील. भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. 0000