मंगळवार, ७ जुलै, २०२०

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस अटी व शर्तींच्या अधीन राहून 33 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 6 जुलै 2020 च्या आदेशानुसार राज्यातील हॉटेल्स आणि इतर आदरातिथ्य सेवा अटी शर्तींचे पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 6 जुलै रोजीच्या शासन निर्देशानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील प्रतिबंधित (कंटेनमेंट) क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस या आस्थापना अटी शर्तींच्या अधीन राहून 33 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच ज्या आस्थापनांचा जिल्हा / स्थानिक प्रशासनाकडून संस्थात्मक विलगीकरणासाठी (इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन) वापर करण्यात येत आहेत, अशा आस्थापनांचा पुढील आदेशापर्यंत संस्थात्मक विलगीकरणासाठीच वापर करण्यात येईल, असे आदेश जारी केले असून या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 8 जुलै 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून करण्याचे आदेश जारी केले आहेत.
    जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020 प्र.क्र. 58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार तसेच महाराष्ट्र शासन महसूल वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, मंत्रालय यांच्याकडील दि. 6 जुलै 2020 रोजीच्या शासन निर्देशानुसार सदर आदेश निर्गमित केले आहेत.
निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस इत्यादींच्यासाठी आवश्यक अटी सेवा शर्ती पुढीलप्रमाणे.
    (अ) सर्व निवासी व्यवस्था प्रदान करणाऱ्या आस्थापना पुढील अतिरिक्त व्यवस्था करतील -  कोविड-19 विषयी प्रतिबंधात्मक उपायांवर पोस्टर्स / स्टँडिज / एव्ही मीडिया (ऑडीओ - व्हीज्युअल) या माध्यमातून मार्गदर्शक तत्त्वे स्पष्टपणे दिसतील अशा पध्दतीने ठळक अक्षरामध्ये दर्शनी भागामध्ये लावावीत. सदर आस्थापनामध्ये त्याच्या बाहेरील आवारात जसे की पार्किंग इतर मोकळ्या जागामध्ये गर्दी होणार नाही यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. सामाजिक अंतर राखण्यासाठी बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी तसेच बाहेरील बाजूस रांगांसाठी बसण्याच्या व्यवस्थेसाठी विशिष्ट खुणा सूचनाच्या माध्यमातून व्यवस्था करावी. आस्थापनेच्या प्रवेशव्दारामध्ये थर्मल स्क्रीनिंगची तरतूद करणे. स्वागत कक्ष / ठिकाणी संरक्षक काच बसविणे आवश्यक आहे. अतिथींसाठी पेडल ऑपरेटेड डिस्पेंसर हँड सॅनिटायझर्स / ऑटोमॅटीक सेन्सर असलेले डिस्पेंसर हँड सॅनिटायझर्स, स्वागत कक्ष, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी, पार्कीग इत्यादी) विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत. फेस कव्हर्स (face cover) / मास्क, ग्लोव्ह्ज इ. वैयक्तिक संरक्षणासाठी निर्धारित केलेली योग्य साधने, आस्थापनेव्दारे अतिथींना कर्मचारी यांना उपलब्ध करुन द्यावीत. संपर्क टाळण्यासाठी आस्थापनांमध्ये चेक-इन, चेक-आउट आणि इतर सर्व सुविधांसाठी क्यूआर कोड, ऑनलाइन फॉर्म, डिजिटल पेमेंट्स, इ-वॉलेट इत्यादी सारख्या प्रणालींचा वापर करावा. सामाजिक अंतराचे योग्य निकष पाळण्यासाठी लिफ्टमधील अतिथींची संख्या मर्यादित ठेवावी. वातानुकूलन संयंत्रणांचे बाबतीमध्ये CPWD (सेंट्रल पब्लिक वर्कस डिपार्टमेंट) यांनी निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे जसे की, वातानुकूलीत यंत्रांचे तापमान हे 24-30 डिग्री सेल्सिअस या मर्यादेत ठेवावे, सापेक्ष आर्द्रता 40-70 टक्केच्या श्रेणीत असावी, शक्य तितकी हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी.
    (ब)  अतिथी/ प्रवाशांसाठी - आस्थापनांमध्ये फक्त कोरोना सदृष्य कोणतीही लक्षणे नसलेल्या अतिथींनाच प्रवेश देणे बंधनकारक असेल. आस्थापनांमध्ये केवळ फेस कव्हर (face cover) / मास्क वापरत असलेल्या अतिथींना प्रवेश देणे. तसेच वरील सर्व ठिकाणी फेस कव्हर (face cover) / मास्क नेहमीच परिधान करणे बंधनकारक असेल. स्वागत कक्षाच्या ठिकाणी अतिथीचा / प्रवाशांचा संपूर्ण तपशील जसे की प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती इ., फोटो असलेले ओळखपत्र आणि स्वयंघोषणापत्रासह सर्व माहिती नोंदवही मध्ये नोंदविणे बंधनकारक असेल. अतिथी / प्रवाशांनी आरोग्य सेतु ॲप वापरणे बंधनकारक असेल. अतिथींना आस्थापनांमधील हाऊस कीपिंग (housekeeping) सेवांचा कमीत कमी वापर करण्यास प्रोत्साहित करावे.
   (क) सुविधांचा वापर - रेस्टॉरंटस साठी निर्गमित केलेल्या पुढील तपशीलवार मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल -    सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी आसन व्यवस्थेची पुनर्रचना करावी.मेनू कार्ड ऐवजी ई-मेनू आणि डिस्पोजेबल पेपर, नॅपकिन्स यांचा वापर जास्तीत जास्त करावा. जेवणासाठी एकत्र बसणेएवजी रूम सर्व्हिस (room service) किंवा टेक-अवे (takeaway) यांचा वापर करावा. रेस्टॉरंटस् फक्त निवासी अतिथींसाठी उपलब्ध राहील. आस्थापनांमधील गेमिंग आर्केड / मुले खेळण्याचे क्षेत्र / जलतरण तलाव / व्यायामशाळा (जेथे लागू असेल त्या ठिकाणी) बंद ठेवणे बंधनकारक असेल. आस्थापनांच्या आवारामध्ये मोठी संमेलने / एकत्र येणे हे कायमच निषिद्ध राहील. तथापि, मीटिंग हॉलचा वापर 33 टक्के क्षमतेने, परंतु कमाल 15 व्यक्तींच्या मर्यादेपर्यंत करण्यास परवानगी असेल.
  (ड) साफसफाई, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण - आस्थापनांमध्ये प्रत्येक वेळी अतिथी / प्रवासी यांनी खोली सोडल्यानंतर त्यांनी वापर केलेल्या खोली आणि इतर सेवा / जागांची स्वच्छता निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. अतिथी / प्रवासी / ग्राहक यांचा मुक्काम संपल्यानंतर सदर खोली किमान 24 तास कोणत्याही इतर अतिथी / प्रवासी / ग्राहक यांना देता रिकामी ठेवावी. अतिथी / प्रवासी / ग्राहक यांनी खोली सोडल्यानंतर सर्व प्रकारची कपडे, टॉवेल्स, बेडशीट, पिलो कव्हर बदलणे बंधनकारक असेल. आस्थापनांमधील स्वागत कक्ष, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी, पार्कीग इत्यादी) आवारात प्रभावी आणि वारंवार स्वच्छता निर्जंतुकीकरण करणे प्रामुख्याने शौचालये, स्वच्छतागृहे आणि हात धुण्यासाठी असलेली ठिकाणे / क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करणे बंधनकारक असेल. आस्थापनांमधील स्वागत कक्ष, अतिथी खोल्या आणि सार्वजनिक जागांवर (लॉबी, पार्कीग इत्यादी) सर्व अतिथी सेवा क्षेत्रात आणि सामान्य भागात वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागाची जसे की दरवाजाचे हॅण्डल, लिफ्ट मधील बटण, रेलिंग, बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या, टेबल, स्वच्छतागृहातील सर्व ठिकाणी यांची साफसफाई आणि नियमित निर्जंतुकीकरण 1 टक्के सोडियम हायपोक्लोराइट वापरून करणे बंधनकारक असेल. सर्व वॉशरूमची नियमितपणे साफसफाई, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. आस्थापनांमध्ये अतिथीं / प्रवासी / ग्राहक यांनी वापरलेली तसेच कर्मचाऱ्यांनी वापरलेली चेहरा कव्हर / मास्क / ग्लोव्हजची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक असेल.
    (इ) आस्थापनांच्या आवारामध्ये संशयित / Confirmed Covid-19 Case आढळून आल्यास करावयाची कार्यवाही - आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीचे आस्थांपनांमधील इतरांपासून विलगिकरण करण्यात यावे. अशा परिस्थितीमध्ये जवळचे शासकीय रुग्णालय / क्लिनिक, अथवा जिल्हा तसेच राज्य हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ माहिती कळविण्यात यावी. नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे (जिल्हा आरआरटी / उपचार करणारे चिकित्सक) यांच्याकडून जोखीम मूल्यांकन केले जाईल आणि त्यानुसार सदर प्रकरणामध्ये संबंधिताचे उपचार, contact tracing आणि निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करण्यात येईल.जर व्यक्ती कोरोना +ve आढळली तर संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करावा.
    जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत सदरचा आदेश लागू राहणार नाही. तथापि अशा क्षेत्रापुरते यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार, गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

00000

शनिवार, ४ जुलै, २०२०

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही अफवांवर विश्वास ठेवू नका स्वयंशिस्त मात्र पाळा - जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी

सांगली दि. ४ (जि.मा.का.) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याच्या अफवा काही समाज विघातक प्रवृत्तींकडून पसरविल्या जात आहेत. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत  चौधरी यांनी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा सध्या कोणताही विचार नसून याबद्दल प्रशासन स्तरावर कोणतीही चर्चा नाही. प्रशासन सर्व परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण पॅनिक होऊ नये. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा अनावश्यक साठा करू नये, असे सांगितले आहे. लॉकडाऊन वाढविण्याच्या पसरविण्यात येत असणाऱ्या चर्चांवर अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तर स्वयंशिस्त मात्र पाळावी. सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत, वैयक्तिक स्वच्छता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे .
अनलॉकच्या काळात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे‌. त्याच वेळी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. वारंवार आपले हात धुवावेत. डोळे, नाक, तोंड यांना स्पर्श करू नये. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. विनाकारण घराबाहेर पडू नये. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, श्वसनाचा त्रास, मळमळ आदी कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर केंद्रांशी, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. मधुमेह, रक्तदाब, हृदयाशी संबंधित, श्वसनाची संबंधित विकार असणाऱ्यांनी, 65 वर्षावरील नागरिक, दहा वर्षाखालील मुले, गरोदर स्त्रिया यांची अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

00000

गुरुवार, २ जुलै, २०२०

आपत्ती निवारणार्थ उपाययोजनांना आवश्यक निधी कमी पडू देणार नाही - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

गतवर्षीच्या नुकसानीचे उर्वरीत अनुदानही लवकरच देणार
कंटेनमेंट झोनचा कालावधीही कमी होणार

 सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : गतवर्षी 15 जुलै ते 15 ऑगस्ट या काळात जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थिती गंभीर होती. या पार्श्वभूमीवर सद्य मान्सून काळात संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन संभाव्य आपत्ती निवारणार्थ उपाययोजनांना निधी कमी पडू देणार नाही. गतवर्षी झालेल्या नुकसानीचे उर्वरीत अनुदानही लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मान्सूनपुर्व करावयाचे नियोजन संदर्भात आयोजित आढावा बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
एनडीआरएफचे पथक जिल्ह्यात दाखल झाले असून अतिरिक्त आणखी एक पथक महिना अखेर पर्यंत सांगली जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, प्रशासनाने राज्य सरकारकडे 20 बोटींची मागणी केली असून या बोटी जिल्ह्याला महिनाअखेर पर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील. गतवर्षीच्या अतिवृष्टी व महापूराने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त बाधितांना मदत वाटपासाठी वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले होते. सुधारीत पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या, शेतकरी संख्या वाढल्याने तहसिलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, जिल्हा कृषि अधिक्षक सांगली यांच्याकडून अनुदान मागणी प्राप्त झाली आहे. यामध्ये सानुग्रह अनुदानासाठी 7 लाख 40 हजार, गोठा पडझडीसाठी 11 लाख 46 हजार, शेती पीक नुकसानीसाठी 14 कोटी 25 लाख, छोटे व्यावसायिकांच्या नुकसानीपोटी 5 कोटी 55 लाख, घर पडझड अनुदानापोटी सुमारे 5 कोटी अशी अतिरिक्त अनुदान मागणी शासनाकडे केली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या कृषि नुकसानीचीही अनुदान मागणी करण्यात आली आहे. तसेच सन 2018-19 मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. यामध्ये माहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2019 या दोन महिन्यांसाठी 5 कोटी 88 लाख इतकी अनुदान मागणी करण्यात आलेली आहे. सदर सर्व बाबतीत जिल्ह्याला लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल. कोणीही नुकसानग्रस्त अनुदानापासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.  चालू वर्षी जून अखेर 163.5 मि.मी. पाऊस झाला असून यावर्षीही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे 31 हजार कुटुंबांना व 63 हजार जनावरांना आवश्यकता पडल्यास सुरक्षित स्थलांतरणासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. याची माहिती घेऊन नदीकाठच्या व पूरप्रवण क्षेत्रातील गावांना पाणी पातळी निहाय स्थिती तात्काळ कळविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाने चांगली कामगिरी बजावल्याबद्दल कौतुक केले. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेने जास्त आहे याबाबतची कारणमिमांसा जाणून घेतली. सद्यस्थितीत कंटेनमेंट झोनचा कालावधी 28 दिवस असून सदर कालावधी कमी करण्याबाबत सरकार विचारविनिमय करत असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी होम क्वारंटाईन अत्यंत परिणामकारकरित्या राबवावे. ग्रामीण भागातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना अधिक काटेकोर कराव्यात, असेही सांगितले.
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी या बैठकीत शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या बोटी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करून गत महापूरात लोकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अद्यापही जे बाधीत अनुदानापासून वंचित आहेत त्यांचे अनुदान लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. मदतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी यंत्रणांनीही संवेदनशिल रहावे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील पूरप्रवण 105 गावे असल्याचे सांगून गतवर्षी सुमारे 87 हजार 800 कुटुंबे बाधीत झालेली होती. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केल्याचे सांगून जिल्ह्यात सद्यस्थितीत 51 बोटी उपलब्ध असून महसूल विभागाकरिता 8 नव्या मोटर बोटी, जिल्हा परिषद विभागाकरिता 22 फायबर बोटी, पूरप्रवण गावांमध्ये अनुषांगिक साहित्य उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावातील पाणीपातळी निहाय होणारा परिणाम याबाबतचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. 104 गावांमध्ये आपत्ती प्रतिसाद दल, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. एनडीआरएफतर्फे 4 तालुक्यातील स्वयंसेवकांना बोटी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. स्थलांतराचा तयार करण्यात आलेला आराखडा आदिबांबत त्यांनी यावेळी माहिती दिली.
00000


रविवार, २८ जून, २०२०

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील कोविड योध्‌यांचा सत्कार पालकमंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले कौतुक

सांगली, दि. २८, (जि. मा. का.) : गत तीन महिन्यापासून पोलीस विभाग, आरोग्य विभाग, संपूर्ण प्रशासन अविरत कार्यरत आहेत. कोरोनाच्या महामारीत संक्रमण रोखण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून अनलॉक काळात संक्रमणाचा धोका अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे गाफील राहू नका. संक्रमण वाढू नये यासाठी अधिक सतर्क रहा, असे प्रतिपादन                  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
कृष्णा मॅरेज हॉल सांगली येथे महाराष्ट्र पोलीस कोविड-१९ अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दल अधिकारी, कर्मचारी संवाद व सत्कार कार्यक्रमात आपत्ती काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोविड योध्‌यांचा सत्कार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल व अशोक वीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लॉकडाऊन काळ संपून अनलॉकचा काळ सुरू झाला आहे. परगावी, परराज्यात गेलेले श्रमिक, मजूर उद्योगधंदे सुरू होऊ लागल्याने पुन्हा येत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज ठेवा, असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या विविधांगी कामामुळे पोलीसांची प्रतिमा सर्वाधिक उंचावली आहे. या काळात अनेक कर्मचारीही राज्यभरात कोरोना बाधीत झाले आहेत. त्यांना चांगल्या उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या असून एखाद्या कर्मचाऱ्याचा यामध्ये दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला ६५ लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत त्यांचे कुटुंबिय शासकीय निवासस्थानामध्ये राहू शकेल, असाही निर्णय घेण्यात आल्याचे सांगून कोरोना काळात चांगली सेवा बजावणाऱ्यांना आपत्ती सेवा पदक देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार पालकमंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला.  यावेळी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते सत्कार होत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. पोलीस दल सक्षम करण्याचे, पोलीस दलात सरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास निर्माण करण्याचे काम गृहमंत्री अनिल देशमुख करत आहेत, याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्तीच्या काळात रात्रंदिवस तैनात आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी, अत्यावश्यक सेवांचा पुरवठा यामध्ये महत्वपूर्ण योगदान जिल्हा पोलीस दलाने दिले आहे. गृह मंत्रालयाकडून मास्क, सॅनिटायझर, संरक्षक सामग्रीचा पुरवठा जिल्ह्याला झाल्याबद्दल आभारही व्यक्त केले.
यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणारे डॉक्टर्स तसेच कोविड काळात पोलीसांना मदत करणाऱ्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शहीद जवान यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी मानले.
00000