बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून जत तालुक्यात जलसंधारणासोबत शेतकरी सक्षमीकरणाला चालना

शेतीसाठी पाण्याची उपलब्धता जितकी महत्त्वाची आहे, तितकाच महत्त्वाचा आहे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर. मर्यादित जलस्रोतांचा काटकसरीने वापर करून अधिक उत्पादन घेणे ही आधुनिक शेतीची गरज आहे. ‘हर खेत को पानी’पासून ‘Per Drop More Crop’पर्यंतचा हा प्रवास प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.०च्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात प्रभावीपणे सुरू आहे. पाणलोट विकासाच्या माध्यमातून जल व मृदसंधारण, भूजल पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचे नियोजन, शेतीसाठी पायाभूत सुविधा, फळबाग लागवड, कृषीपूरक रोजगार आणि महिला सक्षमीकरण अशा विविध घटकांचा समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे केवळ पाण्याची उपलब्धता वाढविण्यावर भर न देता उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दिशेने या योजनेची वाटचाल सुरू आहे. १३ गावांचा ४ पाणलोट प्रकल्पांत समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये जत तालुक्यातील चार पाणलोट विकास प्रकल्पांना वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांच्याकडून मंजुरी देण्यात आली. या चार प्रकल्पांत एकूण १३ गावांचा समावेश आहे. प्रकल्प क्रमांक १ मध्ये बाज, बेळुखी व डफळापूर; प्रकल्प क्रमांक २ मध्ये उमराणी, सिंदूर व खोजनवाडी; प्रकल्प क्रमांक ३ मध्ये जा. बोबलाद, बालगाव, उटगी, लामणतांडा व बेळोडगी; तर प्रकल्प क्रमांक ४ मध्ये साळमाळगेवाडी व बिळूर या गावांचा समावेश आहे. या चारही प्रकल्पांमध्ये आजअखेर १५ हजार ४१२.५४ हेक्टर उपचारित क्षेत्रासाठी ३३ कोटी ९० लाख ७६ हजार रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. जलसंधारणातून पाणी, पाण्यातून समृद्धी नैसर्गिक साधनसंपत्ती विकास घटकांतर्गत या १३ गावांमध्ये विविध जल व मृदसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. यामध्ये ६३ सामूहिक शेततळी, ८६ वैयक्तिक शेततळी, ११ सिमेंट बंधारे, ११ गॅबियन बंधारे, १ माती नाला बांध, १ सीसीटी, १ लूज बोल्डर संरचना, ४७७.१७ हेक्टर फळबाग लागवड आणि २ अमृत सरोवरांचा समावेश आहे. या कामांमुळे पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे आणि भूजल पुनर्भरणास चालना देणे शक्य झाले आहे. परिणामी विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होत आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या जलसुरक्षेला शेतातील काटकसरीच्या पाणीवापराची जोड दिल्यास शेती अधिक शाश्वत करण्याची संधी निर्माण झाली आहे. ४१७ हेक्टरवर ४३ हजारांहून अधिक फळझाडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये प्रकल्प क्रमांक १ ते ४ मध्ये राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड उपक्रमाला चांगले यश मिळाले. या उपक्रमातून ७९२ शेतकऱ्यांच्या ४१७.१३ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ४३ हजार ७८२ फळझाडांची लागवड करण्यात आली. द्राक्ष, डाळिंब, आंबा, सीताफळ, केळी यांसारख्या उच्च मूल्याच्या फळपिकांना चालना मिळाल्याने पारंपरिक शेतीला अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीची जोड मिळाली आहे. फळबाग लागवड ही केवळ एकदाच होणारी प्रक्रिया नसून वर्षभर विविध कामांची आवश्यकता असते. छाटणी, सिंचन, तणनियंत्रण, खत व्यवस्थापन, औषध फवारणी, काढणी, वर्गीकरण आणि बाजारपेठेपर्यंत माल पोहोचविणे अशा विविध टप्प्यांवर स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. महिलांनाही फळबागांच्या देखभाल व काढणीच्या कामातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नाला हातभार लागत आहे. गावातच रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाल्याने रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. शेती उपयोगी साहित्यामुळे उत्पादनक्षमतेला हातभार योजनेच्या उत्पादन घटकांतर्गत ९८५ वैयक्तिक शेतकरी लाभार्थींना पीव्हीसी पाईप, इलेक्ट्रिक मोटर, चाफकटर, ठिबक सिंचन आदी शेती उपयोगी साहित्याचा लाभ देण्यात आला असून त्यासाठी ३ कोटी ३२ लाख ३० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. ठिबक व तुषार सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धतींमुळे पिकांच्या गरजेनुसार पाणी देणे शक्य होते. त्यामुळे पाण्याची नासाडी कमी करून उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास मदत होते. विशेषतः फळबाग, भाजीपाला आणि उच्च मूल्याच्या पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होत आहे. महिला बचत गटांना आर्थिक बळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उपजीविकेला हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सहकार्याने गावातील कार्यरत महिला बचत गटांना विविध प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये २१३ बचत गटांना खेळते भांडवल, ५ गटांना समुदाय गुंतवणूक आणि ७१ गटांना उपजीविका निधी देण्यात आला असून, या माध्यमातून एकूण ४ कोटी ५५ लाख ९० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. शेतकरी गट आणि उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सामूहिक प्रगती योजनेतील प्रवेश प्रेरक उपक्रमांतर्गत आत्मा विभागाच्या संयुक्त विद्यमाने १३ गावांमध्ये शेतकऱ्यांच्या १०० गटांची नोंदणी करण्यात आली. तसेच पीक उत्पादन घटकांतर्गत ४ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सामूहिक खरेदी, उत्पादनाचे नियोजन, प्रक्रिया, बाजारपेठ आणि मूल्यवर्धन यांसारख्या बाबींमध्ये सामूहिकरित्या पुढे जाण्याची संधी मिळत आहे. एकूणच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जत तालुक्यातील या चार गावांत जलसंधारणाबरोबरच शेती उत्पादन, फळबाग विकास, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी संघटन या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम होऊन ग्रामविकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. (संप्रदा दत्तात्रय बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली) 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा