गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

मातीच्या पणत्यांतून उजळतेय भविष्याचे आकाश; बालगृहातील मुलांना मिळाला नवा आत्मविश्वास!

- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना - बालगृहातील मुलांना कौशल्य विकासाचे धडे - 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार कार्यशाळा सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : "शिकूया कौशल्य, घडवूया भविष्य" - हे केवळ घोषवाक्य नाही, तर सांगलीतील सुंदरबाई मालू निरीक्षणगृह/बालगृहातील मुलांच्या आयुष्यात एक नवी पहाट घेऊन आलेला हा एक आश्वासक मंत्र ठरला. निमित्त होते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, 'वर्शिप अर्थ फाऊंडेशन'च्या माध्यमातून आयोजित दिवाळीचे विविध साहित्य निर्मिती कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे. सौ. सुंदराबाई मालू मुलींचे बालगृह, सांगली येथे आयोजित कार्यशाळेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, वुई फाऊंडेशनचे दिनेश कदम, जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंहासने, मानद कार्यवाहक सुनील कोरे, सर्व संस्था अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष सर्व बालगृहातील मुले - मुली या कार्यशाळेस उपस्थित होते. ही कार्यशाळा 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, जिल्ह्यातील 8 बालगृहातही त्या त्या ठिकाणी अशी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, “कोशिश करने वालो की कभी हार नही होती!”. त्यांनी 'इसापनीती'च्या गोष्टीमधून मुलांना समजावले की, कोणतेही एक कौशल्य निवडा, पण त्यात इतके प्राविण्य मिळवा की जग तुम्हाला ओळखेल. त्यांचे हे शब्द मुलांसाठी प्रेरणास्रोत ठरले. या मुलांच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात 'सांगली पॅटर्न' नावाने एक विशेष प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. दिवाळी आणि दसऱ्याच्या मंगलमय वातावरणाच्या अनुषंगाने, या मुलांच्या हातांना पणत्या, आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीचे साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कच्च्या मालातून एक सुंदर वस्तू साकारतानाचा नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. हा केवळ एक उपक्रम नव्हता, तर त्यांच्या मनात आत्मविश्वासाची आणि स्वावलंबनाची ज्योत पेटवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता. कार्यक्रमाच्या शेवटी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती वर्षा पाटील यांनी मुलांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा