बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रूग्णांची संख्या घटतेय

जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षात एचआयव्ही संसर्गित रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दहा वर्षापूर्वी सन 2006 मध्ये जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रूग्णांची संख्या 2 हजार 258 होती. ती ऑक्टोबर 2016 मध्ये 947 इतकी कमी झाली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हे एक आशादायक चित्र आहे. जिल्ह्यात सन 2007 ते 2010 या कालावधीत दर महिन्याला 250 ते 280 नवीन एचआयव्ही संसर्गित रूग्ण सापडत होते. हे प्रमाण कमी होऊन या वर्षी दर महिन्याला नवीन रूग्णांची संख्या ही 100 पेक्षा कमी  झाली आहे. तसेच गर्भवती माता या सन 2010 साली 150 पर्यंत एचआयव्ही संसर्गित सापडल्या होत्या. ती संख्या घटून सन 2016 मध्ये 30 पर्यंत खाली आली आहे. 
   एचआयव्ही संसर्गित रूणांची संख्या घटण्याचे सर्व श्रेय जिल्हा एडस् प्रतिबंध नियंत्रण कक्षास जाते. होऊन सारे एकसंघ, करूया एचआयव्हीचा प्रतिबंध हे जागतिक एडस् दिन 2016 चे घोषवाक्य आहे.  1 ते 7 डिसेंबर 2016 हा एडस् सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात एडस् विषयावर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जागतिक एडस् दिनानिमित्त जिल्हास्तरावर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे दिनांक 1 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8.45 वाजता एच.आय.व्ही. एडस् जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व तालुकास्तरावर जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. तसेच इयत्ता 9 वी च्या पुढील सर्व विद्यालय, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्याने मुख्यालयाच्या ठिकाणी जनजागृती रॅली, एचआयव्ही / एडस् विषयावर चित्रपट, ऑर्केस्ट्रा, जिल्ह्यातील 20 महाविद्यालयामध्ये जनजागृतीपर मार्गदर्शन, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
   जिल्हाधिकारी शेखर गायकवाड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एडस् प्रतिबंध नियंत्रण कक्ष, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली मार्फत कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयीन युवकामध्ये मार्गदर्शन लेक्चर पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य, वॉल पेन्टींग, टीव्ही रेडिओ जाहिरात, देह विक्री करणाऱ्या स्त्रियामध्ये, समलिंगी संभोग करणाऱ्या पुरूषामध्ये तसेच स्थलांतरीत कामगार ट्रक चालक / वाहक लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
   कोणालाही एचआयव्हीची लागण झाली आहे किंवा नाही हे रक्त नमुना तपासणी केल्याशिवाय कळत नसल्याने जिल्ह्यामध्ये जिल्हा रूग्णालय, उप जिल्हा रूग्णालय ग्रामीण रूग्णालयात 20 ठिकाणी ऐच्छिक समुपदेशन चाचणी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 59 ठिकाणी, अर्बन हेल्थ पोस्टमध्ये 10 ठिकाणी पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये 60 ठिकाणी एचआयव्ही तपासणीची सोय केली आहे. याबरोबरच रूग्ण एचआयव्ही संसर्गित सापडल्यास त्याला मोफत एआरटी औषधोपचार दिला जातो. ही सोय सिव्हील हॉस्पीटल सांगली, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज, भारती वैद्यकिय महाविद्यालय वानलेसवाडी उप जिल्हा रूग्णालय इस्लामपूर येथील एआरटी सेंटरमध्ये उपलब्ध आहे. तसेच तालुकास्तरावर औषधोपचार मिळण्यासाठी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी, विटा शिराळा येथेही लिंक एआरटी सेंटर उपलब्ध आहेत.
                   संप्रदा द. बीडकर
                   प्र. जिल्हा माहिती अधिकारी
                   सांगली



सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

मतदान : एक राष्ट्रीय कर्तव्य


        
        सांगली जिल्ह्यात इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव पलूस नगरपरिषद तसेच कवठेमहांकाळ, कडेगाव खानापूर नगरपंचायतींसाठी दिनांक 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. येत्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदार पुनर्रिक्षण मोहीम 16 सप्टेंबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2016 या कालावधीत राबवण्यात आली. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. प्रशासनाच्या या मोहिमेतून जिल्ह्यात येत्या निवडणुकीत मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढेल. देशाच्या बलशाही लोकशाहीसाठी सर्वांनीच मतदान करणे ही काळाची गरज असून प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून मतदानाचा पवित्र हक्क बजावणे देशहिताचे आहे.

जिल्ह्यात 16 सप्टेंबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2016 या कालावधीत महसूल प्रशासनाने सर्व शासकीय, निमशासकीय विभागांना बरोबर घेऊन प्रभावी आणि परिणामकारक मतदार पुनर्रिक्षण मोहीम राबविली आहे. तसेच नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, अनेक नगरपालिका कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत चांगली वाढ झाली असून या निवडणुकीतही मतदार नोंदणी मतदार जनजागृती मोहिमेमुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, यात शंका नाही.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी येत्या नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्वांनी मतदान करणे काळाची गरज असून प्रत्येक मतदाराने मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावलाच पाहिजे. निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी जागृतपणे मतदान करावे, कोणाच्याही दबावाला अथवा प्रलोभनाला बळी पडता निर्भय आणि मुक्तपणे मतदान करण्यात सक्रिय व्हावे. मतदान करणे हा नागरी हक्क असून देशहितासाठी जागरूक नागरिक होऊन अभिमानाने मतदान करावे.
जिल्ह्यात नगरपरिषद नगरपंचायत स्तरावर विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची रॅली पथनाट्याद्वारे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मतदार जनजागृती मोहिमेत रॅली, पथनाट्ये आदि विविध उपक्रमाद्वारेे मतदार जागृतीचा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्वाकांक्षी काम प्रशासनाने चालविले आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग घेतला असून विशेषत:जिल्ह्यातील तरुणाईने मतदार जागृतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. मतदार राजा जागा हो-मतदानासाठी तयार हो..  मतदान करा हमखास-विकास होईल झकास.. चला मतदार करुन-राष्ट्रीय कर्तव्याचे बीज आपण रोवूया, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, आपले मतदान अमूल्य आहे-ते व्यर्थ घालवू नका.. अशा मतदान जागृतीच्या विविध घोषणांनी सांगली जिल्हा दुमदुमून जात आहे.
जिल्ह्यात 16 सप्टेंबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2016 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मतदार पुनर्रिक्षण मोहिमेंतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीच्या नमुना क्र. 6 नुसार जिल्ह्यात 40 हजार 88 अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदार यादीतील नाव वगळण्यासाठीच्या नमुना क्र. 7 नुसार 3 हजार 207 अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदार यादीत दुरूस्तीसाठी नमुना 8 चे 5 हजार 323 तर मतदाराच्या ठिकाणात बदल करण्यासाठी नमुना 8अ चे 490 अर्ज प्राप्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव पलूस नगरपरिषद तसेच कवठेमहांकाळ, कडेगाव खानापूर नगरपंचायत निवडणूकीसाठी एकूण 1 लाख 87 हजार 106 मतदार असून 264 मतदान केंद्रावर दिनांक 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. नगरपरषिद नगरपंचायतनिहाय मतदारसंख्या कंसात मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत. इस्लामपूर - 53769 (70), विटा - 35708 (47), आष्टा - 27047 (36),  तासगाव - 26099 (37), पलूस - 18743 (23), कवठेमहांकाळ - 11853 (17), कडेगाव - 9428 (17) खानापूर - 4459 (17).
 मतदार जनजागृती मोहिमेत सर्वांनीच विशेषत: युवा पिढीने सक्रिय होवून मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे. एकंदरीत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार पुनर्रिक्षण तसेच मतदार जनजागृती मोहिमेतून येत्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढण्यास निश्चितपणे मदत होईल, यात शंका नाही. तेव्हा नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दिनांक 27 नोव्हेंबर 2016 रोजी प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून मतदानाचा पवित्र हक्क बजावणे देशहिताचे आहे.

संप्रदा द. बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी
सांगली.