शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

- १०० व्या नाट्य संमेलनाची मान्यवरांच्या हस्ते मुहुर्तमेढ - राज्यात ७५ अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारणार - नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी, ३३ लाख रूपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर नाट्यसंस्कृती जोपासावी. मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य तथा वने, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. १०० व्या नाट्य संमेलनाच्या मुहुर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, खासदार संजय पाटील, १०० वे नाट्य संमेलन स्वागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मराठी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, नाट्य परिषद सांगली शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शुभेच्छा व्यक्त करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला प्रगल्भ नाट्यपरंपरा आहे. ही नाट्यसंस्कृती रसिकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावी, हा नाट्यसंमेलनाचा उद्देश आहे. मराठी रंगभूमी, नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयाच्या सिंहासनापर्यंत पूर्ण शक्तीने पोहोचवावी. शासन नाट्यकर्मींच्या पाठीशी आहे. दर्दी रसिकांच्या पाठिंब्यावर मराठी रंगभूमी एक हजाराव्या नाट्यसंमेलनाचा टप्पा गाठेल. याच विचाराने संबंधित सर्वांनी कृती करावी, असे ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाटक हृदयापर्यंत आशयभाव पोहोचवते. नाटकामध्ये मेडिटेशन म्हणजेच एकाग्रता करण्याची ताकद आहे. २१ व्या शतकात विविध आव्हानांवर मात करून नाटककार, कलावंत आणि रसिकांनी नाट्यसंस्कृती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंमेलनामध्ये रंगभूमीपुढील आव्हाने व त्यावर मात करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ८६ नाट्यगृहे असून त्यापैकी ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. नगर विकास विभागाकडून सदर ५२ नाट्यगृहांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्याचबरोबर राज्यात नवीन ७५ सौर ऊर्जा वापरणारी अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारण्यासाठी मंजुरी प्राप्त असून, नाट्यगृहांमध्ये कलाकार व रसिक प्रेक्षकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ही नाट्यगृहे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून राज्यातील सर्व जिल्ह्यात त्यांच्या जीवनावरील महानाट्य दाखवण्यात येणार आहे. तसेच, महासंस्कृती अभियानातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, याअंतर्गत नाटके प्रायोजित करावीत, असे त्यांनी सूचित केले. तसेच नाट्यप्रयोगांसाठी अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीची नाट्यपंढरी अशी ओळख असून, १०० व्या नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ असल्याबद्दल स्वागत व शुभेच्छा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सध्या रंगभूमीसमोर इलेक्ट्रॉनिक व अन्य माध्यमांचे आव्हान उभे आहे. मात्र, नाटकांची क्रेझ पुन्हा निर्माण होणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नाट्य संमेलनासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपणही सांगलीचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तसेच, विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिरास सी.एस.आर. मधून वातानुकुलित यंत्रणेची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. प्रेमानंद गज्वी यांनी मार्गदर्शन केले. १०० व्या नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ सांगलीत होत असल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त करून स्वागत समिती अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, समस्त सांगलीकर आणि नाट्यप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर यांच्यामुळे सांगलीची ओळख नाट्यपंढरी म्हणून निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. सध्या नाटकांच्या प्रयोगांमुळे सर्व कलाकारांना एकत्र येणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्र यायला मिळते, असे सांगून ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी नाट्यगृहांची देखभाल, अद्ययावत नाट्यगृहांमध्ये सोलर सिस्टीम व नवोदित कलाकारांची मुंबईत निवास व्यवस्था व्हावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच, कलाकार म्हणून आम्हीही आमची जबाबदारी पार पाडू, असे ते म्हणाले. अजित भुरे यांनी मनोगत व्यक्त केले मुकुंद पटवर्धन म्हणाले, दिग्गज कलावंत सांगलीत घडले. सांगलीत हे पाचवे नाट्य संमेलन होत आहे. १०० वे नाट्य संमेलन विभागवार ६ ठिकाणी होणार आहे. या माध्यमातून विविध सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख एकच व्यासपीठावर आले आहेत. यातून रंगभूमीला नवी दिशा, विचार व नजर मिळेल. सांगलीची आलौकिक नाट्यपरंपरा पुन्हा प्रकाशमय होत असल्याचे ते म्हणाले. नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, संमेलन समिती प्रमुख विजय चौगुले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह नाट्यकर्मी, नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नांदी सादर करण्यात आली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शमी, आंबा व उंबराच्या फांद्यांना मुहुर्तमेढ बांधण्यात आली. तसेच संहितापूजन करण्यात आले. प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून मुहुर्तमेढ करण्यात आली. सदर घंटा ६ विभागीय संमेलनात वाजवली जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार राजेंद्र पोळ यांच्या १० नाट्यकृतींच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध पुरस्कारप्राप्त डॉ. तारा भवाळकर, सदानंद कदम, पंडित हृषिकेश बोडस, शाहीर देवानंद माळी यांचा श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 00000

शारीरिक तंदुरूस्तीसाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश गरजेचा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

जिल्हास्तरीय कृषि महोत्सव उत्साहात संपन्न सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : शारीरिक तंदुरूस्तीसाठी व आरोग्याचे सौख्य राखण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करावा, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ॲग्री मॉल परिसर (फळरोपवाटिका कुपवाड प्रक्षेत्र), विजयनगर सांगली येथे आयोजित या कृषि महोत्सव उद्‌घाटन प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, प्रकल्प संचालक (आत्मा) जांबूवंत घोडके, उपविभागीय कृषि अधिकारी जत मनोज वेताळ, उपविभागीय कृषि अधिकारी विटा प्रकाश कुंभार, उपविभागीय कृषि अधिकारी मिरज रमाकांत भजनावळे, प्रकल्प उपसंचालक श्री. खरात, सर्व तालुका कृषि अधिकारी यांच्यासह क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी नागरिक उपस्थित होते. जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे उद्‌घाटन करून व या महोत्सवास शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आपला देश जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे. बदलत्या व धकाधकीच्या जीवनात तंदुरूस्त राहण्यासाठी तृणधान्यांचा उपयोग मोठा आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा अशा तृणधान्यांचा आपल्या आहारातील समावेश वाढविणे आवश्यक आहे. तृणधान्यांचे सेवन केल्याने शारीरिक व मानसिक तंदुरूस्ती मिळते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच, तृणधान्यांवर प्रक्रिया करून युवा पिढीला आवडतील असे विविध पदार्थ केले जात आहेत. त्यामुळे सशक्त पिढीसाठी व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दैनंदिन आहारात तृणधान्यांच्या पदार्थांचा समावेश करण्याची गरज करून त्यांनी याबाबत जनजागृती करण्याचे मत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2023-24 महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियानांतर्गत हा एकदिवसीय जिल्हास्तरीय कृषि महोत्सव घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय व उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय मिरज यांच्या समन्वयाने याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख, आहारातील महत्त्व याबाबत प्रचार प्रसिध्दी, व्याख्यान, विविध नमुने, विविध पदार्थांचे 35 स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ व प्रक्रिया संयत्र स्टॉलचा समावेश होता. पौष्टिक तृणधान्य रॅली दरम्यान, कृषि महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शेतकरी व नागरिक यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली. ही रॅली विलिंग्डन कॉलेज ते विजयनगर चौक मार्गे ॲग्री मॉल परिसर अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, तालुका कृषि अधिकारी, कृषि विभागाचे कर्मचारी, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली व राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि व्यवसाय व्यवस्थापन व्यवस्थापन महाविद्यालय सांगली महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या महोत्सवास शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट व स्थानिक नागरिक यांनी भेट देवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 00000

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी 22 जानेवारीला

सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक 5 जानेवारी 2024 असा होता. मात्र शिल्लक असलेल्या प्रलंबित अर्जावर निर्णय घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमात सुधारणा केली असून आता मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती निकाली काढण्याचा सध्याचा दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत असून सुधारित दिनांक 12 जानेवारी 2024 असा आहे. मतदार यादीचे Health Parameter तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे तसेच डेटा बेस अद्ययावत करणे व पुरवणी छपाई करण्याचा सध्याचा कालावधी 1 जानेवारी 2024 पर्यंत असून सुधारित कालावधी 17 जानेवारी 2024 असा आहे. तर अंतिम प्रसिध्दीचा सध्याचा दिनांक 5 जानेवारी 2024 असून सुधारित दिनांक 22 जानेवारी 2024 असा असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांचा 24 डिसेंबरला सन्मान सोहळा व कार्यशाळा

सांगली, दि. 21 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील दिव्यांग सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई-३२, शाखा सांगली यांच्या वतीने दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान सोहळा व कार्यशाळेचे आयोजन दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता पाटबंधारे भवन, सांगली येथे केले आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आहेत. महानगरपालिका उपायुक्त सुनिल पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष साईनाथ पवार व राज्य समन्वयक महादेव शिंदे हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष इलियास बागवान व जिल्हा सचिव अंकुर यादव यांनी केले आहे. 00000

पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. पीकस्पर्धेतील ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस ही पाच रब्बी पिके आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत. स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रूपये प्रवेश शुल्क राहील. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी स्पर्धा पातळीनुसार पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे पुढीलप्रमाणे. तालुका पातळी- 5 हजार रूपये, 3 हजार रूपये व 2 हजार रूपये. जिल्हा पातळी - 10 हजार रूपये, 7 हजार रूपये व 5 हजार रूपये. राज्य पातळी - 50 हजार रूपये, 40 हजार रूपये व 30 हजार रूपये. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहनही श्री. कुंभार यांनी केले आहे. 00000

विकसित भारत संकल्प यात्रेचा आगामी मार्ग

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. या रथयात्रेचा दि. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंतचा मार्ग पुढीलप्रमाणे. शिराळा तालुका - दि. 22 डिसेंबर - सोनवडे व आरळा, पाचगणी व शिरसटवाडी, दि. 23 डिसेंबर - करूंगली व मराठेवाडी, सावंतवाडी व रांजणवाडी, दि. 24 डिसेंबर – पणुंब्रे तर्फ वारूण व काळुंद्रे, मेणी व येळापूर, दि. 25 डिसेंबर - कुसळेवाडी व किनरेवाडी, गवळेवाडी व हातेगाव, दि. 26 डिसेंबर – कदमवाडी व वाकाईवाडी, खिरवडे व खुजगाव, दि. 27 डिसेंबर - खराळे व चिंचेवाडी, मोरेवाडी व चिंचोली, दि. 28 डिसेंबर - चरण व मोहरे, कोकरूड व माळेवाडी, दि. 2‍9 डिसेंबर - नाठवडे व शेडगेवाडी, बिळाशी व कुसाईवाडी, 30 डिसेंबर - गुढे व मानेवाडी, धसवाडी. मिरज तालुका - दि. 22 डिसेंबर - ढवळी व बेडग, दि. 23 डिसेंबर - नरवाड व आरग, दि. 24 डिसेंबर - लक्ष्मीवाडी व शिंदेवाडी, दि. 25 डिसेंबर - लिंगनूर व खटाव, 5 जानेवारी 2024 - कवलापूर. जत तालुका - दि. 22 डिसेंबर – सुसलाद व सोनलगी, अंत्राळ व बनाळी, दि. 23 डिसेंबर – उमदी व निगडी बु., आवंढी व लोहगाव, दि. 24 डिसेंबर – उटगी व लमाणतांडा उ., सिंगनहळ्ळी व बागलवाडी, दि. 25 डिसेंबर – अंकलगी व संख, शेगाव व रेवनाळ, दि. 26 डिसेंबर – खंडनाळ व लमाणतांडा द.,‍ तिपेहळ्ळी व अचकनहळ्ळी, दि. 27 डिसेंबर – गोंधळेवाडी व आसंगी जत, कंठी व बागेवाडी, दि. 28 डिसेंबर – दरीबडची व तिल्याळ, बिरनाळ व कुंभारी, दि. 2‍9 डिसेंबर – कुलाळवाडी व सोन्याळ, हिवरे व धावडवाडी, 30 डिसेंबर – जाडरबोबलाद व लकडेवाडी, प्रतापूर व गुळवंची, 31 डिसेंबर – माडग्याळ व कुणीकोणूर, बेवनूर व नवाळवाडी, दि. 1 जानेवारी 2024 – खैराव व टोणेवाडी, वाळेखिंडी व कोसारी दि. 2 जानेवारी 2024 – येळवी व घोलेश्वर, कासलिंगवाडी व मोकाशेवाडी, 3 जानेवारी – सनमडी व कोळगिरी, व्हसपेठ व गुलगुंजनाळ. विटा (खानापूर) तालुका – दि. 22 डिसेंबर – तांदळगांव व बलवडी भा., दि. 23 डिसेंबर – जाधवनगर व कमळापूर, दि. 24 डिसेंबर – भाळवणी व पंचलिंगनगर, दि. 25 डिसेंबर – कळंबी व ढवळेश्वर. कवठेमहांकाळ तालुका – दि. 22 डिसेंबर – झुरेवाडी व विठुरायाचीवाडी, दि. 23 डिसेंबर – आगळगाव. वाळवा तालुका - दि. 22 डिसेंबर – बागणी व शिगाव, जक्राईवाडी व शिवपुरी, दि. 23 डिसेंबर – पोखर्णी व फार्णेवाडी, वाघवाडी व जांभुळवाडी, दि. 24 डिसेंबर – ढवळी व नागांव, फाळकेवाडी व नायकलवाडी, दि. 25 डिसेंबर – भडकंबे व कोरेगाव, ओझर्डे व सुरूल, दि. 26 डिसेंबर – बहादूरवाडी व तांदूळवाडी, महादेववाडी व घबकवाडी, दि. 27 डिसेंबर – मालेवाडी व इटकरे, माणिकवाडी व काळामवाडी, दि. 28 डिसेंबर – येडेनिपाणी व कामेरी, मरळनाथपूर व रेठरेधरण, दि. 2‍9 डिसेंबर – कणेगाव व भरतवाडी, भाटवाडी व शेणे, 30 डिसेंबर – येलूर व विठ्ठलवाडी, वाटेगाव व कासेगाव, 31 डिसेंबर – वशी व लाडेगाव, केदारवाडी व येवलेवाडी, दि. 1 जानेवारी 2024 – कुरळप व कुंडलवाडी, तांबवे व धोत्रेवाडी, दि. 2 जानेवारी 2024 – ऐतवडे खुर्द व देवर्डे, नेर्ले व कापूसखेड, 3 जानेवारी –चिकुर्डे व ठाणापुडे, साखराळे व हुबालवाडी, 4 जानेवारी – डोंगरवाडी व करंजवडे, बहे व खरातवाडी, 5 जानेवारी – ऐतवडे बु. व शेखरवाडी. आटपाडी तालुका – दि. 22 डिसेंबर – झरे व पडळकरवाडी, दि. 23 डिसेंबर – पिंपरी बु. व घरनिकी, दि. 24 डिसेंबर – जांभुळणी व घाणंद, दि. 25 डिसेंबर – कामथ व मुढेवाडी, दि. 26 डिसेंबर – वाक्षेवाडी व निंबवडे, दि. 27 डिसेंबर – गळवेवाडी व आवळाई, दि. 28 डिसेंबर – पळसखेल व दिघंची, दि. 29 डिसेंबर – लिंगीवरे व राजेवाडी, दि. 30 डिसेंबर – पुजारवाडी (दि.) व उंबरगांव, 31 डिसेंबर – विठलापूर. तासगाव तालुका – दि. 22 डिसेंबर – हातनूर व हातनोली, दि. 23 डिसेंबर – वासुंबे व वंजारवाडी, दि. 24 डिसेंबर – शिरगाव क. व बेंद्री, नेहरूनगर व जुळेवाडी, दि. 25 डिसेंबर – पाडळी व धामणी, नागाव नि. व निमणी, दि. 26 डिसेंबर – विजयनगर व किंदरवाडी, चिंचणी व सावर्डे, दि. 27 डिसेंबर – नरसेवाडी व कचरेवाडी, पुणदी व भैरववाडी, दि. 28 डिसेंबर – तुरची व ढवळी, आळते व पानमळेवाडी, दि. 29 डिसेंबर – राजापूर व येळावी, बोरगाव व लिंब, दि. 30 डिसेंबर – विसापूर व शिरगाव वि., गोटेवाडी व धोंडेवाडी, दि. 31 डिसेंबर – निंबळक व चिखलगोठण. 00000

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली 413 गावात, 83 हजाराहून अधिक व्यक्तिंचा सहभाग

सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत दि. 18 डिसेंबरपर्यंत सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यात 413 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. या रथयात्रेत 83 हजार 712 व्यक्तिंनी सहभाग घेतला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत कवठेमहांकाळ तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 3 हजार 598, कडेगाव तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 502, पलूस तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 5 हजार 885, तासगाव तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 609, वाळवा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 2 हजार 576, जत तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीमधील 9 हजार 584, आटपाडी तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 3 हजार 213, मिरज तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीमधील 18 हजार 768, शिराळा तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 7 हजार 312, खानापूर तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 29 हजार 665 व्यक्तिंनी या रथयात्रेत सहभाग घेतला. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती होऊन, त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत होत आहे. ही रथयात्रा जिल्ह्यातील ग्रामीण भागात 8 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, किसान सन्मान, सुरक्षित मातृत्त्व, मातृवंदना, सुकन्या समृद्धी अशा केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन पात्र वंचित गरजू व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीत व्हॅनच्या माध्यमातून उपस्थितांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. गरजू पात्र लाभार्थींनी नोंदणी करून, योजनांचा लाभ घेणे अपेक्षित आहे. 00000

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रा : शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी जीवनमान उंचवावे - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले. विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याचे प्रसारण मिरज तालुक्यातील बेळंकी येथे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ग्रामपंचायत कार्यालय आवारात झालेल्या या कार्यक्रमास सरपंचा सारिका शिंदे, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरज तहसीलदार अर्चना मोरे-धुमाळ, मिरजच्या गटविकास अधिकारी डॉ. संध्या जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सुशांत खाडे, मोहन व्हनखंडे, सहायक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके आदि उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संबोधन प्रसारित यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रसारित करण्यात आले. या संबोधनात त्यांनी केंद्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य, पोषण, दर्जेदार प्राथमिक सोयी सुविधा यासह अन्य बाबींसाठी केंद्र शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांतून युवा व महिला वर्गाचे सबलीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी इतरांपर्यंत या योजनांचा प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा हे देशव्यापी अभियान जिल्ह्यात 24 नोव्हेंबरपासून सुरू असून, ग्रामीण भागात 8 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. या माध्यमातून गावागावात शासन व प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक योजनांबाबत जागृती व प्रबोधन या माध्यमातून केले जात आहे. या योजनांसाठी पात्र वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा व इतरांनीही त्यासाठी प्रेरित करावे, असे ते म्हणाले. कामगार विभागाच्याही इमारत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आहेत. त्याचा लाभ कामगारांना दिला जात असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 354 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून 70 हजारहून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत व वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत 20 हजारपेक्षा अधिक आयुष्मान कार्ड वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत ऋणनिर्देश व्यक्त केले. स्वागत डॉ. शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी या अभियानाचा हेतू व माहिती विषद केली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रथयात्रेंतर्गत विविध विभागांच्या स्टॉलना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीत रथयात्रा बेळंकीसह आज जिल्ह्यातील भाटशिरगाव, कांदे (ता. शिराळा), ताडाचीवाडी, बाणुरगड (ता. विटा खानापूर), जानराववाडी (ता. मिरज), भिवर्गी, पांडोझरी (ता. जत), मोहिते वडगाव, अंबक (ता. कडेगाव), कुकटोळी, म्हैसाळ एम. (ता. कवठेमहांकाळ), पडवळवाडी, अहिरवाडी (ता. वाळवा), धावडवाडी, नेलकरजी (ता. आटपाडी), पुणदी (वा), रामानंदनगर (ता. पलूस) आणि कवठेएकंद, नागाव क. (ता. तासगाव) येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत रथयात्रा पार पडली. 00000

ग्रामसेवकांनी गावाच्या विकासासाठी गतीने काम करावे - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 16 (जि.मा.का.) : ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय प्रशासनाचा महत्वाचा खांब असतो. शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. त्यांचे सांगली जिल्ह्यात उत्कृष्ट काम सुरू आहे. ग्रामसेवकांनी सर्वांच्या बरोबर राहून गावाच्या विकासासाठी गतीने काम करून प्राप्त निधी विहीत मुदतीत खर्च करावा, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालय येथे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, सहायक गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करावा त्यामध्ये विविध प्रकारच्या पुरस्कारांचा समावेश करावा, असे सूचित करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसीत भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी एक वाहन असून या माध्यमातून प्रत्येक गावागावात शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. याचा लाभ तळागाळातील व्यक्तिपर्यंत पोहोचवावा. ग्रामसेवकांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत, त्यांना काही अडचणी असतील तर त्या मांडाव्यात, शासन दरबारी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी जिल्हा परिषदेचा कणा आहे. त्यांनी तळागाळापर्यंत काम केले तरच पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच शासनाच्या ग्राम विकासाच्या योजनांची योग्य अंमलबावणी होण्यासाठी मदत होवू शकते. शासनाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करणे हे प्राथमिक कर्तव्य असून ग्राम विकास अधिकारी मोठ्या उत्साहाने पुढेही काम करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली व पुरस्कारार्थीं व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय गायकवाड, प्रविण देसाई व धनश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामसेवकांच्या जबाबदाऱ्या व ते करत असलेली विविध प्रकारची कामे याबद्दल विवेचन केले. यावेळी सन 2010-11 ते 2022-23 या पुरस्कार वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन वृषभ आकिवाटे यांनी केले. 00000

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १०५ बालकांची मोफत नेत्ररोग तपासणी

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थींपैकी नेत्ररोग संदर्भित लाभार्थींकरिता डीईआयसी विभागांतर्गत आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी शिबीरात 105 लाभार्थ्यांची मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी ही माहिती दिली. शिबिरांतर्गत ० ते १८ वयोगटातील महानगरपालिका कार्यक्षेत्र, आष्टा - इस्लामपूर - तासगाव - विटा नगरपालिका कार्यक्षेत्र, मिरज, कडेगाव, शिराळा, वाळवा या तालुक्यांतील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित 105लाभार्थींच्या नेत्र तपासण्या डॉ. मिलिंद किल्लेदार व त्यांच्या अधिनस्त पथकांमार्फत पूर्ण करण्यात आल्या. पैकी 41 लाभार्थी हे पुढील शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरले असून त्यांच्या शस्त्रक्रियेचे नियोजन सुरु आहे. शस्त्रक्रिया अनुराधा आय हॉस्पिटल, सांगली यांच्यामार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच संदर्भित लाभार्थींच्या आवश्यक लॅब तपासण्या महालॅब सांगली यांच्यामार्फत मोफत करण्यात आल्या. उर्वरित तालुक्यांकरिता नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन हे लवकरच करण्यात येणार असून ० ते 18 वयोगटातील लाभार्थींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे वेळोवेळी कार्यक्रमाकरिता मार्गदर्शन लाभत आहे. शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, बालरोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष भोसले, व्यवस्थापक कविता पाटील, ऑप्टोमेट्रिस्ट रोहित चौगुले व डीईआयसी अंतर्गत इतर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले. 00000

अभय योजनेचा लाभ घ्यावा - प्र. मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना २०२३ दोन टप्प्यात लागू केलेली आहे. या योजनेमध्ये १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीत नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्ताबाबतीत शासनास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सुट तथा सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी केले आहे. प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी म्हणाले, योजनेच्या पहिल्या टप्यात १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्क रक्कम १ लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेस माफी, मुद्रांक शुल्क १ लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात ५० टक्के व दंडाची संपूर्ण सूट देण्यात आली आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २५ टक्के माफी व दंडामध्ये ९० टक्के सुट, मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपेक्षा जास्त असल्यास २० टक्के माफी तसेच १ कोटी रूपये रक्कम दंड स्वीकारुन उर्वरित दंडाच्या रकमेत सूट देण्यात आली आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये ८० टक्के सूट, तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात ४० टक्के व दंडामध्ये ७० टक्के माफी, तसेच मुद्रांक शुल्काची २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्के माफी व दंडामध्ये ८० टक्के सूट, मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात १० टक्के माफी तसेच २ कोटी रूपये रक्कम दंड म्हणून स्वीकारुन उर्वरित दंडाच्या रकमेची सूट असेल. ज्यांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी अभय योजना २०२३ योजनेचा लाभ घेण्याकरिता आपला अर्ज सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, सांगली यांचे कार्यालय राजवाडा कंपौंड सांगली या कार्यालयास सादर करावा अथवा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी केले आहे. 00000

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा - प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून दि. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी आज येथे केले. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पोलिस उपअधीक्षक श्री. बेन, तहसिलदार लीना खरात, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे नोडल अधिकारी सलिम नदाफ आदि उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील व महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणिव तथा माहिती होण्याच्या दृष्टीने तसेच, अल्पसंख्याक नागरिकांचे हक्क व त्यांच्या संरक्षणासाठी असणारे कायदे, त्यांच्यासाठी असणाऱ्या ‍विविध योजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखण्याच्या सूचना केल्या. दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत माहिती देताना सहायक आयुक्त जयंत चाचरकर म्हणाले, दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सकाळी 11.30 ते 2 या वेळेत अल्पसंख्याक समाजाची स्थिती, गती व प्रगती या विषयावर सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख, अल्पसंख्याक नागरिकांचे हक्क व त्यांच्या संरक्षणासाठीचे कायदे या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनेल विधीज्ञ ॲड. मोहन कुलकर्णी, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडील योजनांबाबत नोडल अधिकारी सलिम नदाफ, अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या भारतीय संविधानातील तरतुदी व त्यांचे फायदे या विषयावर डॉ. अजित पाटील माहिती तथा मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर विविध शासकीय विभागामार्फत अल्पसंख्याक समुदायाकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा आढावाही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 00000

जिल्ह्यात आतापर्यंत सव्वासात लाख आयुष्मान कार्ड तयार - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : देशातील सामान्य नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत 1356 उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. 5 लाखांचे वैद्यकीय संरक्षण दिले जाते. या योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख, 27 हजार 352 आयुष्मान कार्ड काढले आहेत. ही माहिती योजनेचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली. डॉ. कदम म्हणाले, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड (ई-कार्ड ), फोटो ओळखपत्र (आधार कार्ड) ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याची संपूर्ण कार्यवाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा अथकपणे करत आहे. या योजनेंतर्गत फक्त गोल्डन कार्डसाठी 2011 च्या सर्वेक्षणानुसार सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय (SECC) जनगणनेनुसार जिल्ह्यात एकूण 18 लाख 44 हजार 24 कार्ड काढणे अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत 7,27,352 कार्ड काढली आहेत. डॉ. कदम म्हणाले, आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माणाची व वितरणाची गती वाढविण्याकरिता सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील 1331 आशांना लॉगिन आय डी दिले आहेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्या आतापर्यंत 1000 लॉगिन आय डी मिळाल्या आहेत. शहरी भागातील 263 लॉगिन आय डी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. डॉ. कदम म्हणाले, दि. 23 जुलै 2023 च्या राज्य शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांना प्रति कुटुंब 5 लक्ष रुपये विमा संरक्षण देण्यात आले आहे. आता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये एकूण 1357 आजार समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याचा लाभ घेण्याकरिता आयुष्मान कार्ड (गोल्डन कार्ड) असणे आवश्यक आहे. अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्यमित्र आयुष्मान कार्ड काढून देतात. तसेच आशा व सर्व आपले सरकार सेवा केंद्रात विनामूल्य कार्ड काढून देण्याचे काम चालू आहे. आयुष्मान कार्ड प्राप्त करण्यासाठी शिधापत्रिका / मा. प्रधानमंत्री महोदयांचे पत्र व आधार कार्ड घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, आशा वर्कर्स आणि योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयास भेट द्यावी. तिथे आपली EKYC करून आयुष्मान-कार्ड निर्माण केले जाईल. त्यानंतर हे कार्ड आशा वर्कर मार्फत आपल्या घरी पोहोच केले जाईल. हे कार्ड मिळाल्यानंतर आपण योजनेच्या मान्यता प्राप्त रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकता. योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे काम पाहत आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 39 रूग्णालये सूचिबद्ध करण्यात आली आहेत. त्यापैकी दोन शासकीय रूग्णालये आहेत. या योजनेंतर्गत कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, जळीत, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्रशस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), कृत्रिम अवयव, फुफ्फुस, आजारावरील उपचार, सांधे प्रत्यारोपण (गुडघा व खुबा), मूत्रपिंड विकार, मानसिक आजार इत्यादी 1356 उपचारांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच, आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी आहात कि नाही हे जाणून घेण्यासाठी beneficiary.nha.gov.in या संकेत स्थळावर भेट द्या किंवा प्ले स्टोअर मधून Ayushman ॲप डाउनलोड करावे. रुग्णालयात कोणतीही समस्या असल्यास आरोग्यमित्रास भेट द्यावी किंवा निःशुल्क दूरध्वनी क्रमांक - 155388/18002332200 वर संपर्क साधू शकता. एकूणच गरजू कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही उपयुक्त अशी योजना आहे. 00000

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रम

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून दि. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असून, यामध्ये अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काबाबत जाणिव, माहिती करून देण्यात येणार आहे. तसेच, केंद्र व राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रधानमंत्री यांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील व समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. 00000

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत 26 हजार व्यक्तिंची आरोग्य तपासणी - प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती होऊन, त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत होत आहे. या रथयात्रेमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तपासणी, मोफत औषधोपचार व संदर्भ सेवा यासह आयुष्मान कार्ड व आभा कार्ड वाटपही केले जात आहे. मोफत आरोग्य तपासणी ‍शिबिरामध्ये 14 डिसेंबरअखेर 26051 व्यक्तिंची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली. डॉ. मिलिंद पोरे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आयुष्मान भारत, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियान यासह आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. मोफत आरोग्य तपासणी ‍शिबिरामध्ये दि. 14 डिसेंबरअखेर 26051 व्यक्तिंची आरोग्य तपासणी करण्यात येवून मोफत औषधोपचार व संदर्भ सेवा देण्यात आली. यामध्ये 1100 व्यक्तिंची उच्च रक्तदाब, 1943 व्यक्तिंची मधुमेह, 1331 व्यक्तिंची क्षयरूग्ण तपासणी करण्यात आलेली आहे. 517 रुग्णांना फुड बास्केट देण्यात आलेले आहे व क्षयरूग्णांसाठी 102 जण हे निक्षय मित्र म्हणून नोंदणी केलेली आहे. आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढण्यात येत असून, सदर कालावधीमध्ये 16307 लाभार्थींचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. याबद्दल ठिकठिकाणचे लाभार्थी आभार व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान, विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती होऊन, त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत होत आहे. या यात्रेंतर्गत दि. 24 नोव्हेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 302 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली आहे. 00000

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रभावी कामकाज करावे - विभागीय आयुक्त सौरभ राव सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची मतदार यादी अचूक, निर्दोष होण्यासाठी सजगतेने प्रभावी काम करावे, तसेच युवा नवमतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्या दृष्टीने मोहीम आखावी, असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज येथे दिले. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, विभागीय कार्यालय, पुणेच्या उपायुक्त (पुरवठा) समीक्षा चंद्राकार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे, सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार उपस्थित होते. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी पर्यंत चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्‌याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मतदानासाठी पात्र लोकसंख्येची जास्तीत जास्त अचूक नोंद होण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे सूचित करून विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करण्याची प्रक्रिया राबवावी. मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्ती करुन ती कटाक्षाने अद्ययावत करावी, असे त्यांनी सांगितले. मतदार यादीत नवमतदारांचा समावेश व्हावा, यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट करून श्री. राव म्हणाले, महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के मतदार नोंदणी करण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. जिल्ह्याचे ब्रँड अँम्बॅसिडर, युथ आयकॉन यांच्यामार्फत नवमतदारांना लोकशाही बळकटीकरणामध्ये त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी. मतदार यादीमध्ये नावनोंदणीसाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी सांगली जिल्ह्याचे सादरीकरण केले. यामध्ये प्राप्त अर्ज, कार्यवाही केलेले अर्ज, स्वीकृत व नाकारण्यात आलेले अर्ज, प्रलंबित अर्ज, कार्यवाहीमध्ये येणाऱ्या अडचणी, घर ते घर सर्वेक्षण, नवमतदार नोंदणीसाठी केलेले प्रयत्न यांची माहिती त्यांनी सादर केली. 00000
पंचशीलनगर रेल्वे गेट दुरुस्तीसाठी 23 डिसेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल सांगली, दि. 13 ‍(जि. मा. का.) : पंचशीलनगर रेल्वे गेट क्र. 129 च्या दुरुस्तीच्या कामासाठी दि. 14 ते 23 डिसेंबर 2023 या कालावधीत बंद ठेवले जाणार असल्याने मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 115 व 116 अन्वये पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निर्गमित केले आहेत. सदर वाहतूक पुढील मार्गावरून वळविण्यात येत आहे. तासगांवकडून सांगली शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठीचा मार्ग पुढीलप्रमाणे - माधवनगर रोड साखर कारखाना चौक, संपत चौकामधून डावीकडे (पूर्वेकडे) वळण घेऊन औद्यो गिक वसाहत मार्गे संजयनगर 100 फुटी रोड, अहिल्यादेवी होळकर चौकातून उजवीकडे पश्चिमेकडे शिंदे मळा रेल्वे ब्रिज खालून सांगली शहरात येता व जाता येईल. अहिल्यादेवी होळकर चौकातून डावीकडे पूर्वेस वळण घेऊन कुपवाड रोड - मंगळवार बाजार चौक - गांधी कॉलनी - सह्याद्रीनगर ओव्हर ब्रिज मार्गे शहरात जाता व येता येईल. शिवशंभो चौक - बायपास रोड - कर्नाळ रोड – भोरा म्हसोबा – रजपूत मंगल कार्यालय मार्गे उजवीकडे वळण घेवून रेल्वे गेट क्रमांक 128 माधवनगर जकात नाका मार्गे शहरात जाता व येता येईल. 00000

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत 15 हजारहून अधिक लाभार्थींचा सहभाग – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे - प्रधानमंत्री यांचे मार्गदर्शन 10 ग्रामपंचायतींमध्ये प्रसारित - जिल्ह्यात लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याचा सांगली जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम नांद्रे येथे झाला. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे होते. तसेच, जिल्ह्यातील अस्वलवाडी (ता. शिराळा), बलवडी (खा.) (ता. खानापूर), नांद्रे (ता. मिरज), सिद्धनाथ (ता. जत), कान्हरवाडी (ता. कडेगाव), इरली (ता. कवठेमहांकाळ), रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा), माडगुळे (ता. आटपाडी), हजारवाडी (ता. पलूस) आणि वडगाव (ता. तासगाव) या ग्रामपंचायतींमध्येही प्रधानमंत्री यांचे संबोधन दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रसारित करण्यात आले. या कार्यक्रमास लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विकसित भारत संकल्प यात्रेला देशभरात मिळत असलेल्या अद्भूत व उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रशंसा व्यक्त करत दूरदृष्य प्रणालीद्वारे केलेल्या मार्गदर्शनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य, पोषण यासह अन्य बाबींसाठी केंद्र शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांतून लाभ देण्यात येत आहे. हा लाभ घेण्यासाठी या यात्रेमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे लागत नाही. या माध्यमातून जनतेमध्ये विश्वास निर्माण होत आहे. त्यांना जीवन जगण्यासाठी नवे बळ, नवी उमेद मिळत आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी विकसित भारताकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगून त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा देशभरातील आढावा व आगामी संकल्प व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात 15 दिवस सुरू असून, 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. आतापर्यंत 216 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून 15 हजारहून अधिक लाभार्थींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत व वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये घरकुल, उज्ज्वला गॅस, मुद्रा, किसान सन्मान, सुरक्षित मातृत्त्व, मातृवंदना, सुकन्या समृद्धी अशा केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत 3 तास ही व्हॅन थांबेल. योजनांची माहिती उपस्थितांना देईल. त्यासाठी गरजू पात्र लाभार्थींनी नोंदणी करावी. योजनांचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवावा, तसेच इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत ऋणनिर्देश व्यक्त केले. नांद्रे येथील मुख्य कार्यक्रमास सरपंचा पूजा भोरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरजच्या गटविकास अधिकारी संध्या जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार अर्चना पाटील, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सय्यद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, निशिकांत भोसले - पाटील, दीपक शिंदे म्हैसाळकर, स्वाती शिंदे, शेखर इनामदार, उपसरपंच अमित पाटील, यांच्यासह विविध यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी व लाभार्थी, ग्रामस्थ, महिला आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित लाभार्थींना दिली. लाभार्थींनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमानंतर प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना लाभ वाटप करण्यात आले. ०००००

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत आज प्रधानमंत्री करणार लाभार्थींना मार्गदर्शन

सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे पहिल्या टप्प्यात आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. याचा सांगली जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम मिरज तालुक्यातील नांद्रे येथे होणार असून, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेचा वंचित नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले. नांद्रे येथील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात दि. 24 नोव्हेंबरपासून ही संकल्प यात्रा सुरू आहे. या मोहिमेंतर्गत 7 डिसेंबरपर्यंत 10 व्हॅनद्वारे 194 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. 14 हजार 197 लाभार्थींपर्यंत ही यात्रा पोहोचली आहे. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत. दि. ९ डिसेंबर रोजी पुढील गावात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. अस्वलवाडी (ता. शिराळा), बलवडी (खा.) (ता. खानापूर), नांद्रे (ता. मिरज), सिद्धनाथ व माडग्याळ (ता. जत), कान्हरवाडी (ता. कडेगाव), इरली (ता. कवठेमहांकाळ), रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा), माडगुळे (ता . आटपाडी), हजारवाडी (ता. पलूस), वडगाव (ता. तासगाव) 00000

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान राबवा - विभागीय आयुक्त सौरभ राव

सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी पर्यंत चालणार आहे. 18-19 वर्षे वयोगटातील मतदानासाठी पात्र झालेल्या युवकांची मतदार नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान घ्यावे. यामध्ये प्रसार माध्यमे व राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग घ्यावा. युथ आयकॉन यांचे कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये घ्यावेत, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज येथे दिल्या. दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे, सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष / प्रतिनिधी उपस्थित होते. विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, राजकीय पक्षांसोबत समन्वय साधून त्यांच्या सूचना, काही आक्षेप असतील तर ते विचारात घ्यावेत. मतदार यादीमध्ये नावे जोडणे, कमी करणे व सुधारणा करत असताना पारदर्शकता व निष्पक्षपणे काम करावे. कोणत्याही यंत्रणेविरूध्द तक्रार येवू नये याची काळजी घ्यावी. या अनुषंगाने एक मोठी जबाबदारी ERO व त्यांच्या अधिनस्त यंत्रणांची आहे. त्यासोबत राजकीय पक्षांचेही दायित्व महत्वाचे असून, कामाला गती देण्यासाठी व पारदर्शकतेसाठी त्यांनी बुथ लेव्हल असिस्टंटची नियुक्ती अपेक्षित संख्येमध्ये तात्काळ करावी. बुथ लेव्हल असिस्टंट बरेचसे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांचे काही प्रश्न मांडले. यावर अनुषंगिक कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आुयक्त सौरभ राव यांनी दिल्या. खासदार संजय पाटील यांनी नवमतदार नोंदणीसाठी सेलिब्रेटी किंवा क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंकडून आवाहन करावे, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीबाबत तसेच नवमतदार नोंदणीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात 24 लाख 12 हजार 811 मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 38 हजार 450, स्त्री मतदार 11 लाख 74 हजार 250 व तृतीयपंथी 111 आहेत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 421 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांनी बुथ लेव्हल एजंट नियुक्त करावा. काही मदत हवी असल्यास बीएलओ यांच्याशी संपर्क साधावा. दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी अखेर जिल्ह्यात 38 हजार 984 मतदारांची नोंदणी व 48 हजार 881 मतदारांची वगळणी झाली असल्याचे सांगून नवमतदार नोंदणीसाठी आवश्यक प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी आभार मानले. 00000

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका तृतीय वर्षात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत. शैक्षणिक संस्थांनाही विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून समितीकडे मुदतीत अर्ज सादर करण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी जयंत चाचरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारसपत्र, 15A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतींसह समितीकडे सादर करावी. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार / पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी पात्र उमेदवारांना नावनोंदणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होत असते. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील सर्व 23 वर्षांखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा, ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित होणार आहे. तरी या स्पर्धेकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in / या लिंकवर भेट देवून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टरमधून 50 देशातील एक हजार उमेदवार सहभागी झालेले असून ही स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यांसाठी आयोजित करण्यात आलेली होती. सन 2024 मध्ये आयोजित जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, Sector Skill Council, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक स्पर्धेच्या नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2002 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Industrial Design Technology, Industry ४.०, Information Network Cabling, Mechatronics, Robot System Integration & Water Technology या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2024 मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उप सचिव दे. वि. तावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक अनुक्रमे परीक्षा, संवर्ग, परीक्षेचे स्वरूप, जाहिरात, पूर्व परीक्षा दिनांक व मुख्य परीक्षा दिनांक व कंसात निकालाचा अंदाजित महिना पुढीलप्रमाणे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2024 - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-2024, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2024, पूर्व परीक्षा 17 मार्च 2024 (मे 2024). दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2024, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 27 जुलै 2024 (ऑक्टोबर 2024). महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2024 - महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, कर सहायक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, फेब्रुवारी 2024, पूर्व परीक्षा 16 जून 2024 (ऑगस्ट 2024). महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2024 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 29 सप्टेंबर 2024 (जानेवारी 2025). सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2024, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट-क, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 26 ऑक्टोबर 2024 (जानेवारी 2025). महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2024 - कर सहायक, दुय्यक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्या परीक्षा 17 नोव्हेंबर 2024 (फेब्रुवारी 2025). महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2024 - महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-2024, राज्य सेवा-33 संवर्ग, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषि सेवा, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वनसेवा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2024, पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 (जुलै 2024). अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2024 - सहायक आयुक्त अनन तथा पदनिर्देशन अधिकारी व अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब - पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 9 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता विद्युत व यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 10 नोव्हेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2024, कृषि अधिकारी गट अ, कृषि अधिकारी गट ब, कृषि अधिकारी गट ब कनिष्ठ, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक १, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक अभियंता विद्युत गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक कार्यकारी अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-ब (स्थापत्य) श्रेणी-2, उप विभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-अ, जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (फेब्रुवारी 2025). निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा-2024, निरीक्षक वैधमापन शास्त्र गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 1 डिसेंबर 2024, सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (मार्च 2025). राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024, एकूण 33 संवर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 14 डिसेंबर 2024, सकाळ भाषा पेपर-1 मराठी, दुपार भाषा पेपर-2, 15 डिसेंबर 2024, सकाळ सामान्य अध्ययन-2, दुपार सामान्य अध्ययन-1, 16 डिसेंबर 2024 - सकाळ सामान्य अध्ययन-4, दुपार सामान्य अध्ययन-3 (मार्च 2025). महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2024, सहायक वनसंरक्षक गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 28 डिसेंबर 2024, सकाळ कृषि अभियांत्रिकी/रासायनिक अभियांत्रिकी/स्थापत्य अभियांत्रिकी/यांत्रिकी अभियांत्रिकी, दुपार कृषि/पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, 29 ‍डिसेंबर 2024, सकाळ वनस्पति शास्त्र / प्राणिशास्त्र, दुपार रसायनशास्त्र (मार्च 2025). 30 डिसेंबर 2024 सकाळ गणित/सांख्यिकी, दुपार वनशास्त्र, 31 डिसेंबर 2024 सकाळ भूशास्त्र, दुपार भौतिकशास्त्र (मार्च 2025). शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे / येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेव्दारे उपलब्ध करून देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सर्वच एचआयव्ही संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार

सर्वच एचआयव्ही संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम जागतिक एड्स दिन व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : यावर्षी जागतिक एड्स दिन दि. 1 डिसेंबर व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर प्रभातफेरींचे आयोजन करण्यात आले आहे. एचआयव्ही संसर्गित लोकांना उद्योगाच्या संधी मिळवून देण्यासाठी स्किल इंडिया उपक्रमातून प्रशिक्षण व पतपुरवठा करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध अशासकीय संस्था व देणगीदार यांच्या मदतीने एचआयव्ही संसर्गित 18 वर्षे पेक्षा कमी वयोगटातील मुला मुलींना व HB कमी असलेल्या रूग्णांना पोषण आहार देणे व मुला मुलींच्यासाठी वधु वर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर YRG Care संस्थेच्या मदतीने एचआयव्ही संसर्गित लोकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचे छोटे माहितीपुस्तक QR code सहीत तयार करून रूग्णांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम यांनी दिली. जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमिवर माहिती देताना डॉ. ‍विक्रमसिंह कदम म्हणाले, सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 17 ICTC, 1 Mobile ICTC व 1 PPP-ICTC च्या माध्यमातुन HIV समुपदेशन व चाचणी सेवा दिली जाते. तसेच HIV शोध मोहिमेसाठी 2 गुप्तरोग तपासणी केंद्रे व 18 रक्तपेढ्यांचे सहकार्य मिळते. जिल्ह्यातील 4 ART सेंटर व 11 लिंक ART सेंटरच्या माध्यमातून 10 हजार 705 HIV संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार दिला जातो. ART औषधोपचारमुळे HIV विषाणूंची संख्या नियंत्रणात राहून होणाऱ्या संधीसाधु आजारांना अटकाव केला जातो, असे ते म्हणाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम म्हणाले, Treat all Policy अंतर्गत सर्वच HIV संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत. तसेच ज्या रूग्णांच्या तपासणीमध्ये HIV संसर्ग असल्याचे आढळून आले आहे, परंतु अद्याप ते उपचारासाठी ART सेंटर पर्यंत गेले नाहीत अशा सर्वांना गृहभेटी घेऊन त्यांना ART औषधोपचाराचे महत्व पटवून दिले जात आहे व या सर्वांना ART औषधोपचारावरती घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. HIV संसर्गित रूग्णांकरिता वेगळी डायलेसीस मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी कार्यान्वीत झाली आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व रूग्णांना पुरेल एवढा औषधसाठा आपणाकडे उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व HIV संसर्गित रूग्णांनी या औषधप्रणालीचा लाभ घेऊन आपले आयुष्य सुखकर करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी केले आहे. 00000

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

संविधान ‍दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : संविधान ‍दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालत आहे. आपण सर्वांनीही संविधानाचा आदर करून पुढे वाटचाल करूया, असे ते म्हणाले. यावेळी मकरंद देशपांडे, महादेव कुरणे, गजेंद्र कुल्लोळी, मोहन वनखंडे, पांडुरंग कोरे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 00000
संविधान दिनानिमित्त बाईक रॅलीस प्रतिसाद सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : संविधान ‍दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे एस. टी. स्टँड सांगली जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सामाजिक न्याय पुरस्कार प्राप्त अशोक पवार, नितीन जोंधळे, अरुण परसुळे, विठ्ठल काळे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर संविधानाचा जागर करणारा समता चित्ररथ व बाईक रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, एस. टी. स्टँड मार्गापासून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा, महानगरपालिका इमारत मार्ग - सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक - राम मंदिर मार्गे पुष्कराज चौकात रॅलीची सांगता झाली. संविधानाचा जागर करून या माध्मयातून घराघरात समता पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 00000

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचतील - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

- विकसित भारत संकल्प यात्रेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ - 26 जानेवारीपर्यंत चालणार मोहीम - जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांचा जागर सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या यात्रेंतर्गत जिल्हा परिषद आवारात त्यांच्या हस्ते या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रमोद काळे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यासाठी 6 व्हॅन आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी एक व्हॅन असून, ती जिथे जिथे जाईल, तिथे तिथे शासकीय योजनांचे प्रबोधन करेल, योजनांची माहिती देईल. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पूर्वी लाभ मिळालेले लाभार्थी यांच्या उपस्थितीत या व्हॅनचे स्वागत केले जाईल. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाईल, वंचित लाभार्थींची नोंदणी केली जाईल व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे या यात्रेचा हेतू आहे. तरी सदर शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्र वंचित लाभार्थींनी नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देता येईल, असे ते म्हणाले. विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत. यात्रेंतर्गत पहिल्या टप्प्यात 6 तालुक्यांमध्ये व्हॅन फिरणार असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 4 तालुक्यामध्ये व्हॅन फिरणार आहेत. पहिल्या टप्प्यांतर्गत आज दि. 24 व उद्या 25 नोव्हेंबर रोजी सदर व्हॅनचे तालुकानिहाय मार्गक्रमण पुढीलप्रमाणे – शिराळा – दि. 24 नोव्हेंबर – रेड, बेलदारवाडी, दि. 25 नोव्हेंबर – खेड, भटवाडी मिरज – दि. 24 नोव्हेंबर – सावळी, कानडवाडी, दि. 25 नोव्हेंबर – मानमोडी, रसूलवाडी कडेगाव – दि. 24 नोव्हेंबर – कोतवडे, नेर्ली, दि. 25 नोव्हेंबर – अपशिंगे, खंबाळे औंध जत – दि. 24 नोव्हेंबर –अंकले, डोर्ली, दि. 25 नोव्हेंबर – बाज, बेळुंखी विटा – दि. 24 नोव्हेंबर –गार्डी, घानवड, दि. 25 नोव्हेंबर – हिंगणगादे, नागेवाडी कवठेमहांकाळ – दि. 24 नोव्हेंबर –अलकूड एम, बोरगाव दि. 25 नोव्हेंबर – जायगव्हाण, मळणगाव 00000

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

एच. आय. व्ही संसर्गित रूग्णांना शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 23 ‍(जि. मा. का.) : एच. आय. व्ही सह जगणाऱ्या रूग्णांना शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा. आयुष्मान कार्ड मिळवून देण्यासाठी, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत समावेशासाठी त्याचबरोबर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाच्या समावेशासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे दिल्या. जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात एचआयव्ही बधितांची संख्या घटत आहे ही समाधानाची बाब असल्याचे स्पष्ट करून डॉ. राजा दयानिधी म्हणाले, एच. आय. व्ही. संसर्गिताचे आरोग्य, शिक्षण, रोजगार व आर्थिक मदत यावर भर द्यावा. त्यासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची छोटी माहिती पुस्तिका क्यू आर कोडसह तयार करावी. सर्व बाधितांना आयुष्मान कार्ड द्यावे. तसेच, पारंपरिक कारागिरांची नोंदणी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये करावी. मागणीनुसार कौशल्य विकास विभागाकडून व्यवसाय प्रशिक्षण द्यावे. त्याचबरोबर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाच्या समावेशासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सूचित केले. डॉ. राजा दयानिधी म्हणाले, औषधोपचारांबरोबर पोषक आहार देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना, आर्थिक निकड दूर करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, १८ वर्षांखालील निराधार मुलांना शैक्षणिक मदतीसाठी बालसंगोपन योजना, औषधोपचारासाठी प्रवासासाठी बस सवलत योजना यांचा लाभ देण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. तसेच, साखर कारखानदारांना एच. आय. व्ही. संसर्गित रूग्णांना पोषक आहारासाठी देणगी देण्याचे आवाहन करावे. तसेच, ज्यांनी देणगी दिली आहे, त्यांचा सत्कार एड्स दिनाच्या कार्यक्रमात करावा, अशा सूचना दिल्या. गर्भवती मातांची पहिल्या तिमाहीत तपासणी करावी जेणेकरून सर्व संसर्गित मातांना वेळेत उपचार मिळतील व मातेपासून बाळाला होणारा एच. आय. व्ही. संसर्ग थांबविण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात. यासाठी शहरी व ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, एचआयव्ही संसर्गित रूग्णांना ए. आर. टी. सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच, अनिच्छुक रूग्णांचे विशेष समुपदेशन करावे. माहिती, शिक्षण व संवाद कार्यक्रमाद्वारे व तपासणीद्वारे संबंधित रूग्णांवर उपचार करावेत, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण रूग्णांची तपासणी व त्यामध्ये संसर्गितांचे प्रमाण, तालुकानिहाय एच. आय. व्ही. बाधित रूग्णसंख्या, ए. आर. टी. सेंटरमधील उपचार, सुरक्षा क्लिनिक, रक्तसुरक्षा कार्यक्रम, लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प, अतिजोखमीचे गट, स्थलांतरीत कामगार, एच. आय. व्ही – टी. बी. समन्वय, गर्भवती मातांची तपासणी व संसर्गाचे प्रमाण आदिंचा आढावा घेण्यात आला. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी एड्स नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची सादरीकरणातून माहिती दिली. 00000

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

बेरोजगारांसाठी 30 नोव्हेंबरला प्लेसमेंट ड्राईव्ह

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे उद्योजक, कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय प्लेसमेट ड्राईव्हचे आयोजन गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करावा. मुलाखतीसाठी 30 नोव्हेंबर रोजी कार्यालयात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एकूण 4 विविध खाजगी नामवंत कंपन्या व हॉस्पीटल सहभागी होणार असून त्यामध्ये प्रामुख्याने विरेशा कास्टिंग प्रा. लि. एमआयडीसी कुपवाड, सुपरक्राफ्ट फौन्ड्री नं. 2, एमआयडीसी मिरज, बालाजी ॲटो सर्व्हीसेस कुपवाड व कुसुंभ कल्याण निधी लिमीटेड वसंतनगर सांगली भाग घेणार असून त्यांच्याकडील एकूण 101 जागा भरण्यात येणार असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

रब्बी हंगाम 2023 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

सांगली, दि. 22 ‍(जि. मा. का.) : प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात गहू बागायत, ज्वारी बागायत, ज्वारी जिरायत व हरभरा या पिकासाठी अनुक्रमे ६८, १७, ५० व ५९ महसूल मंडळामध्ये विमा क्षेत्र घटक धरुन भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. या योजनेंतर्गत नैर्सगिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या आकस्मिक प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास योजनेतील अटी-शर्तीनुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेवू शकतात. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाचे मागील ५ वर्षाचे पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पन्न गुणीले जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित करण्यात येते. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रक्कमेतून वजावाट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना बँकेला देण्याची अंतीम मुदत, नोंदणीच्या अंतीम मुदतीच्या ७ दिवसआधी द्यावी. जे कर्जदार शेतकरी विहीत मुदतीत सहभागी होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहीत धरुन, शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहीत पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता प्रति हेक्टरी 1 रूपया असून पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर व कंसात विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख पुढीलप्रमाणे आहे. गहू बागायत - 30 हजार रूपये (15 डिसेंबर 2023), ज्वारी बागायत - 35 हजार रूपये (30 नोव्हेंबर 2023), ज्वारी जिरायत - 25 हजार रूपये (30 नोव्हेंबर 2023), हरभरा - 35 हजार रूपये (15‍ डिसेंबर 2023), उन्हाळी भुईमुग - 40 हजार रूपये (31 मार्च 2024). प्रतिकुल हवामान घटकामुळे अपूरा पाऊस, किंवा हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकाची अधिसूचित विमाक्षेत्र घटकातील पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर उगवण अथवा पेरणी / लावणी न झाल्यास ही तरतूद लागू आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादीमुळे अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के मर्यादेपर्यत आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देय राहील. हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करणे. स्थानिक नैर्सगिक आपत्ती अंतर्गत पडलेल्या पावसामुळे विमासंरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्ख्लन, गारपीठ, ढगफूटी अथवा विज कोसळल्यामुळे नैर्सगिक आगयामुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे अधिसूचित पिकाचे नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. काढणीपश्चात नुकसान भरपाई हे अधिसूचित क्षेत्रातील, पिक शेतात कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकासाठीच, कापणी पासून जास्तीत जास्त १४ दिवसापर्यंत गारपिट, चक्रिवादळ व त्यामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. स्थानिक नैर्सगिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान भरपाईसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबरनुसार, बाधीत पिक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत संबधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. यासाठी प्राधान्याने कृषि व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित मोबाईल क्रॉप इन्शुरन्स अँपद्वारे तक्रार नोंदविणे अभिप्रेत आहे. त्यानंतर केंद्रिय टोल फ्रि क्रमांक १८००४१९५००४ चा वापर शेतकऱ्यांनी करावा. केंद्रिय टोल फ्रि क्रमांक उपलब्ध न झाल्यास आपत्तीबाबतची माहिती भारतीय कृषि विमा कंपनीच्या तालुका/ जिल्हास्तरीय कार्यालयास द्यावी किंवा हेही उपलब्ध न झाल्यास बँक/कृषि व महसूल विभाग यांना तात्काळ द्यावी. स्थानिक आपत्ती अथवा काढणी पश्चात पिक नुकसानीची तक्रार नोंदवल्याशिवाय शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार नाही. या योजनेंतर्गत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँका / बँक शाखा /प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था (नोडल बँकमार्फत), व बिगर कर्जदार शेतकरी प्राधिकृत बँका, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), जवळच्या तसेच संबधित विमा कंपनीची कार्यालये, www.pmfby.gov.in या वेब पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरु शकतील. अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधारकार्ड /आधार नोंदणीची प्रत, ७/१२ उतारा, भाडेपट्टाकरार असेल तर नोंदणीकृत करारनामा/ सहमतीपत्र, पेरणी घोषणापत्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स्, मोबाईल क्रमांक इ. जोडणे/ ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

जिल्हा परिषद गट-क पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 पद्मभूषण वसंतरावदादा पाटील ‍ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली-तासगाव रोड बुधगाव, टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधमनी, सांगली व वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, वान्लेसवाडी सांगली या परीक्षा केंद्रावर घेण्यात सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 22 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा एकूण चार परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस,डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. ही परीक्षा नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पेठ या परीक्षा केंद्रावर दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 4, टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधमनी सांगली या परीक्षा केंद्रावर दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 4 व दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, वान्लेसवाडी सांगली व आदर्श इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च सेंटर विटा खंबाळे भा., एमआयडीसी विटा या परीक्षा केंद्रावर दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा शुभारंभ

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत महारेशीम अभियान दि. 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महारेशीम अभियानाच्या रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज करण्यात आला. यावेळी रेशीम विकास अधिकारी बी. बी. कुलकर्णी, वरिष्ठ तांत्रिक सहायक डॉ. बी. एम. खंडागळे, वरिष्ठ क्षेत्र सहायक सुनिल पाटील, क्षेत्र सहायक बी. डी. माने, श्री. कदम, श्री. शेख तसेच रेशीम शेतकरी उपस्थित होते. हा रेशीम रथ जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर, तासगाव, आटपाडी, पलूस इत्यादी तालुक्यामधून फिरवण्यात येणार आहे. या माध्यमातून रेशीम शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच, सन 2024-25 साठी रेशीम शेती नोंदणी करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त व शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 00000

मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार रस्त्यांसाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : औद्योगिक विकास घडल्यास परिसराचा आर्थिक विकास होतो. नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना मिळते. त्यासाठी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यामुळे मिरज एमआयडीसीमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्ते होण्यासाठी औद्योगिक पायाभूत सुविधा धोरण अंतर्गत शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली. सांगली मिरज एमआयडीसीमधील रस्ते कामासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, महानगरपालिकेचे अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वित्त अधिकारी सुशील केंबळे, सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद पाटील, संचालक संजय अराणके आणि अतुल पाटील, व्यवस्थापक गणेश निकम तसेच अन्य पदाधिकारी आदि उपस्थित होते. मिरज एमआयडीसी महानगरपालिका क्षेत्रात आहे. या क्षेत्रात एकूण 11.53 कि.मी.चे रस्ते असून यामध्ये 8.75 किमी मुख्य रस्ता व 2.78 किमी अंतर्गत रस्ते आहेत. सद्यस्थितीत या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमिवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज एमआयडीसीमधील रस्ते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक संबंधित विभागांनी प्राधान्याने आणि तात्काळ करावे. तसेच समांतरपणे अन्य प्रशासकीय प्रक्रिया प्राथम्याने आठवड्याच्या कालमर्यादेत पूर्ण करावी. रस्त्यांसाठी आवश्यक एकूण निधीच्या २५ टक्केअंतर्गत रक्कम स्वनिधीमधून एमआयडीसीतील उद्योजकांनी करापोटीचा महसूल म्हणून महानगपालिकेकडे जमा करावी. उर्वरित निधी नगरोत्थानमधून देण्यात येईल. उर्वरित ७५ टक्के रकमेसाठी औद्योगिक पायाभूत सुविधा धोरण अंतर्गत शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, असे त्यांनी यावेळी सांगितले. हे रस्ते काम होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे उद्योजकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम दर्जेदारपणे करावे, अशा सूचना डॉ. खाडे यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व आयुक्त सुनील पवार यांनी आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीसंदर्भात विचार मांडले. उद्योजकांनी त्यांचे मत मांडले. 00000

जिल्हा परिषद गट-क पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 पद्मभूषण वसंतरावदादा पाटील ‍ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगली-तासगाव रोड बुधगाव, टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधमनी, सांगली व वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, वान्लेसवाडी सांगली या परीक्षा केंद्रावर घेण्यात सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा : परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

सांगली दि. 20 ‍(जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 22 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा एकूण चार परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस,डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे. ही परीक्षा नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पेठ या परीक्षा केंद्रावर दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 4, टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधमनी सांगली या परीक्षा केंद्रावर दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 4 व दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड, वान्लेसवाडी सांगली व आदर्श इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च सेंटर विटा खंबाळे भा., एमआयडीसी विटा या परीक्षा केंद्रावर दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत घेण्यात येणार आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

तृतीयपंथीयांना ओळखपत्र, प्रमाणपत्रासाठी आज शिबिर

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : तृतीयपंथीय व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दि. २१ व २४ नोव्हेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्ति यांनी घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण जयंत चाचरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. शिबिरावेळी तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्ड/ मतदानकार्ड/ पॅनकार्ड/ जन्माचा दाखला/ रेशनकार्ड/ पासपोर्ट/ पासबुक/ जातीचा दाखला/ मनरेगा कार्ड या नमूद दस्तऐवजांपैकी कोणतेही एक सोबत घेवून येणे आवश्यक असेल. पत्रकात म्हटले आहे, तृतीयपंथीय व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी National Portal for Transgender Persons हे पोर्टल दि. 25 नोव्हेंबर 2020 पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सुरू करण्यात आलेले आहे. transgender.dosje.gov.in या लिंकद्वारे तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून अर्ज करू शकतात. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सांगली - पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांवरोड, घाटगे हॉस्पिटल मागे, सांगली, या कार्यालयाकडून जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तिंना राष्ट्रीय पोर्टलवरून ओळखपत्र व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 21 व 24 नोव्हेंबर रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर शिबिरामधून ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळणेकामी जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्ती यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. 00000

सांगलीत 26 डिसेंबरला डाक अदालत

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील डाक अदालत दि. 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर सांगली यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे. तक्रारी स्विकारण्याचा अंतिम दि. 11 डिसेंबर 2023 आहे, असे प्रवर डाक अधिक्षक सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे. संबंधितांनी आपली तक्रार तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा याचा सपष्ट उल्लेख करून मूळ अर्जाच्या प्रतीसह दि. 11 डिसेंबर 2023 पर्यंत प्रवर अधिक्षक डाकघर सांगली विभाग सांगली यांच्या पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा महोत्सव आयोजनाची बैठक संपन्न

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : सन २०२३ – २४ च्या जिल्हा स्तरावरील युवा महोत्सवाच्या आयोजनाची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकऱ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, नेहरू युवा केंद्राचे सागर व्हनमाने यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 30 नोव्हेंबरपूर्वी आयोजन करावे. महोत्सव आयोजनाबाबतची सर्व प्रक्रिया शासन नियमानुसार पार पाडावी. महोत्सवाची व्यापक प्रसिद्धी करावी. तसेच अंमली पदार्थ विरोधी पथनाट्यांना महोत्सवात सहभाग द्यावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केल्या. बैठकीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे स्वरूप व बाबी, स्पर्धेचे ठिकाण व दिनांक, तज्ज्ञ परीक्षक नियुक्ती यासह अन्य अनुषंगिक विषयांवर चर्चा करण्यात आली. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी दर वर्षी जिल्हास्तरावर युवा महोत्सव आयोजित केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असल्याने युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिली आहे. या महोत्सवामध्ये समूह व वैयक्तिक लोकनृत्य, लोकगीत कथा लेखन, पोस्टर लेखन, वक्तृत्त्व स्पर्धा, फोटोग्राफी, संकल्पना आधारीत स्पर्धा तसेच हस्त कला, ॲग्रो प्रॉडक्ट आदि प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागासाठी १५ ते २९ वयोगट राहील. जिल्ह्यातील कृषि महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवा स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र राहतील. 00000

विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवणे, वंचित लाभार्थींची नोंदणी करणे व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाणार आहे. तरी संबंधित सर्व विभागांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपसंचालक नगररचना ज्ञानेश्वर ढेरे तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्राकडून नियुक्त पर्यवेक्षक तथा जिल्हा प्रभारी अधिकारी श्री. शुक्ला तसेच, जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. या मोहिमेत सर्व विभागांनी सक्रिय योगदान द्यावे, असे सूचित करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, या मोहिमेंतर्गत ग्रामविकास, नगरविकास आणि अन्य महत्त्वाचे विभाग असे ३ प्रकारे वर्गीकरण करून पात्र वंचित लाभार्थींना लाभ द्यायचा आहे. प्रत्येक विभागासाठी त्यांच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी ही एक सुसंधी आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी ६ व्हॅन प्राप्त होणार आहेत. प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने २६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. तरी प्रत्येक शासकीय विभागाने आपापल्या केंद्र पुरस्कृत योजनांची प्रचार-प्रसिध्दी, या मोहिमेचे सखोल नियोजन करावे. डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्या लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. सांगली जिल्ह्यात या आठवड्यामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्याच्या अनुषंगाने सर्वांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. श्री. शुक्ला म्हणाले, शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश असून, जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य ते नियोजन करून ही मोहीम यशस्वी करावी, मोहिमेच्या आधीच्या परिस्थितीची आणि नंतर झालेल्या बदलाची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी त्यांच्या कल्याणकारी योजना अधिकाधिक लाभार्थींपर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती केंद्र शासनाकडून राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने, "विकसित भारत संकल्प यात्रा" या नावाची देशव्यापी मोहीम राबविली जात आहे. “जनजाती गौरव दिनी म्हणजे दि. १५ नोव्हेंबर रोजी या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला असून, सुरुवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या ११० जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून दि २६ जानेवारी २०२४ पर्यंत उर्वरित जिल्ह्यांना ही यात्रा भेट देईल. या मोहिमेंतर्गत ग्राम/शहरी/नगरपालिका स्तरावर भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थींपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत. 00000

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) :- कालवा सल्लागार बैठकीत नियोजन केल्यानुसार आज म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा म्हैसाळ प्रकल्पाच्या पंप गृह क्र.१ येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे व श्री. पवार उपस्थित होते. रब्बी आवर्तनामध्ये म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये पुच्छ भाग ते शीर्ष भाग (Tail to Head) धोरणाअन्वये पाणी देण्यात येणार आहे. 10 डिसेंबर पर्यंत केवळ जत कालव्याच्या लाभक्षेत्राला जत, सांगोला, मंगळवेढा भागाला पाणी देण्यात येणार असून तदनंतर 10 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी पर्यंत लाभ क्षेत्रातील विविध कालव्यांना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 00000

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे पुरावे 24 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत कार्यपध्दतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. या समितीचा विभागनिहाय दौरा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे समितीस संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतचा शासन निर्णय ३० ऑक्टोबर २०२३ रोजी निर्गमित झाला आहे. या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा आढावा घेणारा लेख... उद्दिष्टे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन, मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी लेक लाडकी योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. मिळणारा लाभ या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. अटी व शर्ती ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील, पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच दुसऱ्या प्रसूतिच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र, त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे तसेच लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लाख पेक्षा जास्त नसावे. आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसीलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील), पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत), मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला), संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied), कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक २ येथील अटीनुसार) १०) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र आवश्यक आहे.) थेट लाभार्थी हस्तांतरण शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजेच डीबीटी द्वारे लाभाची रक्कम लाभार्थींना अदा करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करण्याकरिता पोर्टल तयार करून लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालय स्तरावर एक कक्ष निर्माण करण्यात येईल. लेक लाडकी’ योजनेत लाभार्थींची ग्रामीण भागात पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, सबंधित पर्यवेक्षिका, तर नागरी भागात मुख्यसेविका यांची राहील. (संकलन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली) 00000

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तिंना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. व्याज परतावा योजनेमध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज १२ टक्क्यांपर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका तसेच सहकारी बँकाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांच्या लाभासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गामधील गरजू व्यक्तिंनी ऑनलाईन कर्ज अर्ज www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेत स्थळावर दाखल करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रविंद्र दरेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - बँकेमार्फत लाभार्थीस व्यवसायासाठी 10 लाख रूपये पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाकडून (१२ टक्केच्या मर्यादेत ) अनुदान स्वरुपात देण्यात येते. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना - बँकेमार्फत विद्यार्थ्यास उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लाख रूपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लाख रूपये इतके कर्ज वितरीत करण्यात येते. कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाकडून (१२ टक्केच्या मर्यादेत ) अनुदान स्वरुपात देण्यात येते. गट कर्ज व्याज परतावा योजना - बँकेमार्फत बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, इत्यादींना व्यवसायासाठी 15 लाख रूपये पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व कर्जावरील व्याजाची रक्कम (१२ टक्केच्या मर्यादित) महामंडळाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येते. थेट कर्ज योजना - महामंडळाकडून लाभार्थीस व्यवसायासाठी 1 लाख रूपये पर्यंत कर्ज वितरीत करण्यात येते व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. अधिक माहितीसाठी महामंडळाचे सांगली जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली दूरध्वनी 02332321513 येथे संपर्क करावा, असे आवाहन श्री. दरेकर यांनी केले आहे. 00000

अंगणवाडी मदतनीस पदासाठी 8 डिसेंबरपर्यंत अर्जमागणी

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सांगली शहर या प्रकल्पांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील कार्यरत अंगणवाडी मधील 8 रिक्त मदतनीस पदे सरळ नियुक्तीने भरावयाची आहेत. स्थानिक रहिवासी असलेल्या 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, वय वर्षे किमान 18 ते कमाल 35 वर्षे पर्यंत (विधवा उमेदवारासाठी ही मर्यादा कमाल 40)असणाऱ्या महिला उमेदवाराकडून 16 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 सायंकाळी 6.15 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सांगली शहर विजयमाला माने-खरात यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता व अटी व शर्तीबाबत http://sangli.nic.in या संकेतस्थळावर पदभरती अर्ज व जाहिरात प्रसिध्द करण्यात आल्याचे श्रीमती माने-खरात यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 67 लाखांवर अभिलेखे तपासणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

आतापर्यंत 12 हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 15 नोव्हेंबरअखेर एकूण 67 लाखांवर अभिलेखे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 12 हजारहून अधिक कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले. कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अजय पवार काम पाहात आहेत. जिल्हा व तालुका स्तरावरील विशेष कक्षांमार्फत 15 नोव्हेंबरअखेर एकूण 67 लाख 46 हजार 270 नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 12 हजार 803 मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा कारागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, मुद्रांक कार्यालय, भूमिअभिलेख, सैनिक कल्याण कार्यालय, महापालिका जन्म मृत्यू रजिस्टर, नगरपालिका प्रशासन, उपवनसंरक्षक कार्यालय अशी 11 शासकीय कार्यालयातील विविध अभिलेखे, तसेच 1967 पूर्वीचे अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापुस्तक-सेवा अभिलेखे तपासण्यात आले. यामध्ये महसूल विभागांतर्गत 10 तहसील कार्यालये व 1 अप्पर तहसील कार्यालयाचे 22 लाख 43 हजार 918 नोंदी तपासण्यात आल्या. यामध्ये 9 हजार 731 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या. अन्य कार्यालयांतून 45 लाख, 2 हजार, 352 नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये 3 हजार 72 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या. 00000

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मिरज, कवलापूरला ‘आनंदाचा शिधा’ वाटप

सांगली, दि. 10 ( जि. मा. का.) : राज्य शासनाने ‘आनंदाचा शिधा’ देऊन सामान्य माणसाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे, अशी भावना कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केली. सोमवार पेठ मिरज आणि कवलापूर येथे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात पात्र लाभार्थ्यांना 'आनंदाचा शिधा’ चे वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मीना निंबाळकर यांच्यासह परिसरातील मान्यवर पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, आनंदाचा शिधा संचात केवळ १०० रूपयात सहा जिन्नस प्रति लाभार्थी देण्यात येत असल्याने गरजवंतांना सणामध्ये दिलासा मिळाला आहे. आनंदाचा शिधा वितरणात जिल्ह्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. शिधा वितरणामध्ये जिल्हा राज्यात तिसरा आहे. राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात सुमारे 4 लाख 6 हजार 760 कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये सांगली 53392, मिरज 46826, कवठेमहांकाळ 23639, जत 51047, आटपाडी 22893, कडेगांव 24890, खानापूर विटा 27088, तासगाव 41612, पलूस 27753, वाळवा 61628 आणि शिराळा तालुक्यात 25992 कुटुंबांना आनंदाचा शिधा संच वाटप करण्यात येत आहे. आनंदाचा शिधा संचात साखर, खाद्यतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येत आहे. मिरज तालुक्यात प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील 46 हजार 826 लाभार्थी आनंदाचा शिधा संचासाठी पात्र असून आतापर्यंत मिरज तालुक्यात ६२ टक्के कुटुंबांना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आल्याचे तहसीलदार अपर्णा धुमाळ यांनी सांगितले. कवलापूर येथील आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कवलापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विकास सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ०००००

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज 8 डिसेंबर 2023 पर्यंत दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://ah.mahabms.com हे संकेतस्थळ असून अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव AH.MAHABMS (Google play स्टोरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध) आहे. टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. सन २०२१-२२ पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सुद्धा सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२३-२४ या वर्षात राबविली जाणार आहे.. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्यची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. 000000