गुरुवार, ३१ मे, २०१८

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून सामाजिक परिवर्तन सांगली जिल्ह्यात 53 हजार 130 गॅस जोडण्या

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत 53 हजार 130 गॅस जोडण्या करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील गरीबातील गरीब कुटुंबांचे सामाजिक परिवर्तन या माध्यमातून घडून आले आहे. या योजनेतून देशभरात 3 कोटी 80 लाख महिलांना घरगुती गॅस जोडणी देण्यात आली आहे. देशातील प्रत्येक 100 कुटुंबांपैकी 81 कुटुंबामध्ये गॅस आहे, याबद्दल या योजनेच्या लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच समाधान व्यक्त केले.
    स्वच्छ इंधन, बेहतर जीवन असा नारा देत चुलीत जळणाऱ्या इंधनातून निर्माण होणाऱ्या धुरापासून ग्रामीण भागातील गरीब महिलांची मुक्तता झाली आहे. त्यातून महिलांच्या आरोग्याचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण अशा दोन्ही बाबी घडून आल्या आहेत. याबाबत योजनेचे सांगली जिल्हा नोडल अधिकारी राहुल पाटील म्हणाले, गेल्या आठवड्यापर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कंपनीमार्फत एकूण 13 हजार 585 गॅसजोडण्या देण्यात आल्या आहेत. या कंपनीचे जिल्ह्यात 20 वितरक असून, 423 गॅस जोडण्या थकित आहेत. तर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीमार्फत 30 हजार 293 गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. या कंपनीचे जिल्ह्यात 39 वितरक असून, 1280 गॅस जोडण्या थकित आहेत. इंडियन ऑइल कंपनीमार्फत 9 हजार 261 गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. या कंपनीचे जिल्ह्यात 8 वितरक असून, 377 गॅस जोडण्या थकित आहेत. जिल्ह्यात तिन्ही कंपन्यांच्या माध्यमातून एकूण 53 हजार 139 गॅस जोडण्या देण्यात आल्या असून जवळपास 2 हजार 80 गॅस जोडण्या देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
    प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांच्या वेळेत बचत झाली असून, हा वेळ कुटुंबासाठी सत्कारणी लावता येणे शक्य झाले आहे. स्वच्छ इंधनापासून पर्यावरणाची सुरक्षा झाली असून, निसर्गाची सेवा झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होऊ लागले आहे. या योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घेणे गरजेचे आहे.
    महिलांचे सक्षमीकरण त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाक करताना लाकडी जळण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम दूर करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे, घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीला केवळ एक अर्ज आपल्या जवळच्या एलपीजी वितरण केंद्रावर जावून भरावा लागतो. त्यासाठी 100 रूपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. अर्ज सादर करताना अर्जदाराला दोन व्यक्तींचा आधार कार्ड क्रमांक तसेच बँक खात्याचा नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो देणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत भरलेले अर्ज एसईसीसी 2011 या डाटासोबत जोडून तपासण्यात येतात. त्या आधारावर लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्याकरीता पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येतात. विस्तारीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना आणी अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. अर्ज सादर करताना अर्जदार वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला असावा. प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्याला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन खरेदी करण्याकरिता 1600 रूपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात येते. त्याबरोबरच सिलेंडर रिफिल आणी एलपीजी स्टोव्ह कर्जाव्दारे उपलब्ध आहे.   
00000



अतिसार नियंत्रण

अर्भक मृत्यूदर बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक उद्दिष्ट आहे. 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि या बालक मृत्यूचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते. याकरिता दिनांक 28 मेपासून जिल्ह्यात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त अतिसाराची लक्षणे उपाययोजनांचा घेतलेला हा विशेष आढावा...
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा या मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 5 वर्षाखालील एकूण 1 लाख 95 हजार 268 लाभार्थीकरिता आशांमार्फत गृह भेटी बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. 5 वर्षाखालील बालके असलेल्या प्रत्येक घरी प्रतिबंधात्मक स्वरूपात एका ओआरएस पाकीटाचे वाटप करण्यात येणार आहे. दर दिवशी 4 ते 5 घरातील पालकांना एकत्रित करून ओआरएसचे घोळ तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. बालकांचे स्तनपान, पूरक आहार, स्वच्छता बाबत माताचे समुपदेशन करण्यात येणार आहे. 9 जून 2018 पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.               
लक्षणे - बाळाची हालचाल मंदावणे किंवा बाळ बेशुध्द होणे. डोळे खोल जाणे, द्रव पदार्थ पिण्यास त्रास होणे किंवा अजिबात पिता येणे. त्वचा चिमटीत घेऊन सोडल्यावर तिथली त्वचा खूपच हळूहळू पुर्ववत होणे. अस्वस्थ / चिडचिड करणारे बाळ, तहानलेले खूप भरभर पाणी पिणे. 14 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जुलाब होत असल्यास. संडासावाटे रक्त पडत असल्यास.
काय करावे  - बाळाला ताबडतोब दवाखान्यात दाखवले पाहिजे. त्यादरम्यान आईला वारंवार जलसंजीवनीचे द्रावण पाजायला सांगावे. द्रव पदार्थ तसेच झिंकची मात्रा तसेच आराखड्यामध्ये दिल्याप्रमाणे अन्न पदार्थ द्यावेत. अतिसारासाठीची औषधे द्यावीत. 2 दिवसांनी परत तपासावे पाठपुरावा करावा. 
उपयुक्त पदार्थ - स्तनपान, लिंबूपाणी, ताक / दह्याचे पाणी, तांदळाचे पाणी, डाळीचे पाणी, भाज्यांचे सूप, ताज्या फळांचा रस (साखर घालता), साधे स्वच्छ पाणी. अपायकारक पदार्थ - सॉफ्ट ड्रींक्स, साखर घातलेला फळांचा रस, कॉफी.
बालकास अतिसार सुरू असताना एकाच वेळी झिंक आणि ओआरएस देऊ शकता. झिंक दिवसातून एक वेळ 14 दिवसापर्यंत ओआरएससह ओआरएस अतिसार बरा होईपर्यंत देऊ शकता. झिंक हे ओआरएसमध्ये मिसळू शकते. मात्र 2 ते 6 महिने बालकांसाठी 1/2 गोळी आईच्या एक चमचा दुधामध्ये (5 मिली) विरघळून द्यावे 6 महिने ते 5 वर्षे वयाच्या बालकांमध्ये एक गोळी 5 ते 10 मिली ओआरएस द्रावणांमध्ये मिसळून द्यावी. जास्त प्रमाणातील ओआरएस द्रावणांमध्ये झिंक मिसळू नये कारण एका दिवसात घ्यावयाचा झिंकचा डोस पूर्ण होऊ शकणार नाही.
जरी झिंक देत असाल तरी पुष्कळ प्रमाणामध्ये ओआरएस नियमितपणे देणे गरजेचे आहे. ओआरएस हे अतिसारामुळे झालेली जलशुष्कता भरून काढण्याचे काम करते. झिंक हे लवकर बरे होण्यासाठी कामी येते त्याने बालकाचा पुढे 2 ते 3 महिन्यांपर्यंत अतिसारापासून बचाव होऊ शकतो. झिंक हे भूक वाढविते बाळाची वाढ होण्यास मदत करते. ओआरएस झिंक हे दोन्ही देणे आवश्यक आहे. झिंक हे अतिसाराच्या उपचारासाठी पूरक आहे. पण ओआरएसची जागा घेऊ शकत नाही. ओआरएस हे अतिसाराच्या उपचारासाठी जलशुक्षतेची तीव्रता कमी करण्यासाठी देण्यात येते. झिंक हे अतिसाराची तीव्रता कालावधी कमी करते पण शरीरातील कमी होणाऱ्या पाण्याचे प्रमाण भरून काढत नाही.
अतिसार बंद झाल्यानंतर झिंकच्या गोळ्या देणे आवश्यक आहे. कारण झिंक हे फक्त अतिसारास बरे करण्यात मदत करत नाही तर पोटातील आतड्यांना बरे होण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यासही मदत करते.  झिंक हे 14 दिवसापर्यंत देण्यात यावे. झिंक घेतल्याने मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत नाहीत. फक्त किरकोळ स्वरूपात उलटी होण्याची शक्यता असते. बालकास बहू जीवनसत्वाची मात्रा देत असताना झिंक दिल्यास कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. झिंक हे सुरक्षित औषध आहे. जर बाळाला अतिसार होत असेल तर झिंकचे प्रमाण बरेच कमी होते. म्हणून अधिक झिंक देणे हे चांगले आहे.
झिंकची मात्रा देण्याची पध्दत - 2 ते 6 महिन्याच्या बाळासाठी स्वच्छ कप घेऊन त्यामध्ये मातेचे दुध घ्यावे. झिंकची अर्धी गोळी (10 मि.ग्रॅ.) कपामध्ये टाकावी. कपातील गोळी पूर्ण विरघळेपर्यंत कपाला हळूहळू हलवावे. हे पूर्ण द्रावण बाळाला पाजावे. 6 महिने ते 5 वर्षाच्या बाळासाठी स्वच्छ कप घेऊन त्यामध्ये पिण्याचे पाणी घ्यावे. झिंकची एक गोळी (20 मि.ग्रॅ.) कपामध्ये टाकावी. कपातील गोळी पूर्ण विरघळेपर्यंत कपाला हळूहळू हलवावे. हे पूर्ण द्रावण बाळाला पाजावे. अतिसारामध्ये होणारे जलशुष्कता (डिहायड्रेशन) यावर उपचार म्हणून जलसंजीवनी (ओआरएस) याचा वापर करावा.
पुढीलपैकी लक्षण आढळल्यास बाळाला तात्काळ रूग्णालयात संदर्भित करावे - 2 महिन्यापेक्षा लहान वयाचा असल्यास, संडासावाटे रक्त पडत असल्यास, तीव्र स्वरूपाचे डिहायड्रेशन    झाले असल्यास, स्तनपान घेण्यात अडचण येत असल्यास किंवा द्रवपदार्थ पिण्यास त्रास होत असल्यास, खाल्लेल सगळं उलटून पडत असल्यास, आकडी येणे, बाळाच्या हालचाली मंदावणे किंवा बाळ बेशुध्द होणे, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होणे आणि धाप लागणे किंवा निमोनिया असणे, तीव्र कुपोषण, डायरिया / जुलाब 14 दिवसांपेक्षा अधिक काळ रहाणे.

                  संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली