रविवार, २८ जून, २०२०

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील कोविड योध्‌यांचा सत्कार पालकमंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले कौतुक

सांगली, दि. २८, (जि. मा. का.) : गत तीन महिन्यापासून पोलीस विभाग, आरोग्य विभाग, संपूर्ण प्रशासन अविरत कार्यरत आहेत. कोरोनाच्या महामारीत संक्रमण रोखण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून अनलॉक काळात संक्रमणाचा धोका अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे गाफील राहू नका. संक्रमण वाढू नये यासाठी अधिक सतर्क रहा, असे प्रतिपादन                  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
कृष्णा मॅरेज हॉल सांगली येथे महाराष्ट्र पोलीस कोविड-१९ अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दल अधिकारी, कर्मचारी संवाद व सत्कार कार्यक्रमात आपत्ती काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोविड योध्‌यांचा सत्कार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल व अशोक वीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लॉकडाऊन काळ संपून अनलॉकचा काळ सुरू झाला आहे. परगावी, परराज्यात गेलेले श्रमिक, मजूर उद्योगधंदे सुरू होऊ लागल्याने पुन्हा येत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज ठेवा, असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या विविधांगी कामामुळे पोलीसांची प्रतिमा सर्वाधिक उंचावली आहे. या काळात अनेक कर्मचारीही राज्यभरात कोरोना बाधीत झाले आहेत. त्यांना चांगल्या उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या असून एखाद्या कर्मचाऱ्याचा यामध्ये दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला ६५ लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत त्यांचे कुटुंबिय शासकीय निवासस्थानामध्ये राहू शकेल, असाही निर्णय घेण्यात आल्याचे सांगून कोरोना काळात चांगली सेवा बजावणाऱ्यांना आपत्ती सेवा पदक देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार पालकमंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला.  यावेळी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते सत्कार होत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. पोलीस दल सक्षम करण्याचे, पोलीस दलात सरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास निर्माण करण्याचे काम गृहमंत्री अनिल देशमुख करत आहेत, याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्तीच्या काळात रात्रंदिवस तैनात आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी, अत्यावश्यक सेवांचा पुरवठा यामध्ये महत्वपूर्ण योगदान जिल्हा पोलीस दलाने दिले आहे. गृह मंत्रालयाकडून मास्क, सॅनिटायझर, संरक्षक सामग्रीचा पुरवठा जिल्ह्याला झाल्याबद्दल आभारही व्यक्त केले.
यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणारे डॉक्टर्स तसेच कोविड काळात पोलीसांना मदत करणाऱ्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात शहीद जवान यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी मानले.
00000


कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यंत्रणांमधील समन्वय उल्लेखनीय - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. २८, (जि. मा. का.) :  कोरोना प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या काळात परदेशवारी करून आलेल्या काही इस्लामपूर येथील प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परंतु कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अचूक व गतीने करण्यात आल्याने कम्युनिटी प्रादुर्भावाचा धोका टळला. यामध्ये महसूल, पोलीस, आरोग्य या सर्वच यंत्रणांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय होता. यंत्रणांमधील उत्तम समन्वयामुळेच जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रार्दुभावावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदर संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अप्पर उपायुक्त संजीवकुमार पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  
जिल्ह्यात कोरोना बाधितांवर त्वरीत आणि अतिशय चांगले उपचार केले जात आहेत. लॉकडाऊननंतर स्थलांतराला परवानगी मिळाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या कोरोना हॉटस्पॉट भागातून नोकरीधंद्यासाठी बाहेर गावी असणारे अनेक लोक आपल्या मुळ गावी परत आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढली. असे असले तरी संपूर्ण प्रशासन व आरोग्य विभाग यांनी अत्यंत सुक्ष्म नियोजन करून स्थिती नियंत्रणात ठेवली असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. कोविड-19 ची जशी काळजी आहे, तशी लोकांच्या मनात पूराचीही धास्ती आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, संभाव्य पूरकाळातील आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी जागा निश्चित करून आवश्यक आराखडे तयार करण्यात आले आहेत. जलसिंचन विभागाच्या वतीने पाण्याचा विसर्ग नियोजनबध्द करण्यात येणार आहे, असे सांगून आपत्तीच्या काळात जिल्हा पोलीस दल अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तसेच प्रशासकीय टीमचा परफॉर्मन्स ही अत्यंत चांगला आहे, अशा शब्दात त्यांनी यंत्रणांचे कौतुक केले.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेचे
योगदान महत्वपूर्ण - गृहमंत्री अनिल देशमुख

पोलीस विभाग, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात अत्यंत चांगला समन्वय असून राज्यभर कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यात पोलीस यंत्रणेचे योगदान महत्वपूर्ण आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पोलीस दल अहोरात्र कष्ट घेत आहे, असे सांगून गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने हळूहळू उद्योगधंदे गती घेत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात स्वराज्यात व स्वगावी परत गेलेले मजूर, श्रमीक पुन्हा कामासाठी महाराष्ट्रात  येत आहेत. त्यामुळे स्थानीक यंत्रणांवर पुन्हा ताण वाढणार आहे. त्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन काटेकोर पध्दतीने व्हावे, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ८१ कंटेनमेंट झोन सुरू असून ग्रामीण भागात ६८, शहरी भागात ८, मनपा भागात ५ कंटेनमेंट झोन सुरू आहेत. आजअखेर जिल्ह्यात ३३९ कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण झाले असून यापैकी २२१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १०६ रूग्ण रूग्णालयात उपचाराखाली आहेत तर १२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर ९ हजार १८५ थ्रोट स्वॅब तपासण्यात आले आहेत. सद्यस्थितीत १३ ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असून यामध्ये ४४१ व्यक्ती आहेत तर २२४ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत. ३८ ठिकाणी कोविड केअर सेंटर, ४९ ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व ४ जिल्हास्तरीय कोविड हॉस्पीटल यांचा समावेश आहे. रूग्ण दुप्पटीचा दर २७.८ तर जिल्ह्यात मृत्यू दर ३.१ आहे. अशी माहिती यंत्रणांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी जिल्ह्यात कोविड अनुषंगाने तपासणी सुविधा चांगली असून पीपीई किट अन्य संरक्षक सामग्री पुरेशा प्रमाणात आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनुष्यबळ वृध्दी करण्यात आले असून यामाध्यमातून आयुष मेडिकल अधिकारी व स्टाफ नर्स उपलब्ध झाल्या आहेत. तसेच कम्युनिटी हेल्थ अधिकाऱ्यांचाही चांगला उपयोग होत आहे. प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर कार्यरत झाले असून ज्या ठिकाणी आयसीयु सुविधा निर्माण केल्या आहेत त्या ठिकाणी ऑक्सीजीनेशन सुविधाही जोडण्यात आल्या आहेत. रूग्ण संख्या वाढल्यास बेडची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक ती तजवीज केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर करताना पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, सांगली जिल्ह्यात आंतरराज्य सीमा चेकपोस्ट एकूण ११ असून आंतरजिल्हा सीमा चेकपोस्ट २१ आहेत. या सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. लॉकडाऊनचे यशस्वी पालन व्हावे यासाठी २५ मार्च पासून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सुविधा देण्याचा उपक्रम जिल्हा पोलीस दलाने सुरू केला. तर जिल्ह्यात ५२ पोलीस पथकांमार्फत जनजागृतीचे समुपदेशनाचे कार्य करण्यात येत आहे. स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या स्वगावी पाठविण्यामध्येही पोलीस विभागाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ५५ वर्षावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड संसर्ग टाळण्यासाठी त्यांना जनसंपर्क होणारे कर्तव्य  न देता फक्त कार्यालयीन काम देण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्यात येत असून त्यासाठी मोबाईल पोलीस फिवर क्लिनीक सुर करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात उल्लंघन करणाऱ्या ४ हजार ५०९ प्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस व जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, अधिष्ठाता सुधीर नणंदकर यांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल माहिती दिली.
000000


गुरुवार, २५ जून, २०२०

लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई


सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवसायिकांचे अर्थचक्र थांबलेले असताना बचत गटातील महिलांसमोर आव्हान उभे ठाकले. परंतु महिलांनी कल्पकता दाखवत व्यवसायाच्या नव्या वाटा शोधल्या. कोरानामुळे बाजारामध्ये मास्कची मागणी प्रचंड वाढल्याने ही सुसंधी महिला बचत गटांनी साधली. जिल्ह्यातील 182 महिला बचत गट मास्क शिलाई करण्यासाठी पुढे सरसावले. लॉकडाऊनच्या काळात कच्चा मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्व गटानी एकत्रित इचलकरंजी या ठिकाणाहून कच्चा माल मागवून घेतला त्यापासून अडीच महिन्यात कापडी वॉशेबल 2 लाख 90 हजार मास्क शिवून जिल्हाभर माफक दरात विक्री केली. यातून तब्बल 20 लाख रूपयांची कमाई बचत गटातील महिलांना झाली.
याबाबत पलूस तालुक्यातील बांबवडे येथील साईकृष्णा महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषा पवार म्हणाल्या, एप्रिल मे महिन्यामध्ये त्यांच्या बचत गटांमार्फत 7 हजार मास्क शिवण्यात आले. हे मास्क पलूस तालुक्यातील सूर्यगाव ग्रामपंचायत, कवठेमहांकाळ तालुक्यातील वाघोली गरजेवाडी ग्रामपंचायत, गावातील मेडीकलमध्ये तसेच कोल्हापूर येथेही मास्कची विक्री करण्यात आली. मास्क शिवण्याचे काम त्यांच्या बचत गटातील दोघी तिघींना मिळून अन्य गटातील महिलांनाही देण्यात आले. या मास्कची विक्री 8 ते 10 रूपये प्रमाणे करण्यात आली. त्यातून बचत गटाला चांगला फायदा झाला.
कडेगाव तालुक्यातील शिरसगाव येथील रमाई महिला बचत गटाच्या सदस्या वनिता सकटे म्हणाल्या, त्यांच्या बचत गटात 13 महिला असून एप्रिल मे महिन्यात बचत गटामार्फत 4 हजार मास्क शिवण्यात आले. हे मास्क 10 रूपये दराने कडेगाव तालुक्यातील  शिरसगाव बोंबलवाडी या ग्रामपंचायतींना देण्यात आले. यामधून बचत गटाला लाभ झाला.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केलेल्या मार्गदर्शनातून भाजीपाला फळे विक्रीची यंत्रणा राबविली. औषधी दुकाने, रूग्णालये, जिल्हा परिषदेसह सरकारी, निमसरकारी खाजगी कार्यालये येथे मास्क पोहोचवले. लॉकडाऊन काळात अनेक गटांनी भाजीपाला, मसाले चटण्याचीही मोठी उलाढाल केली. प्रसंगी घरोघरी जावून भाजीपाला फळे यांची विक्री केली. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक आधार मिळाला. या कामी बचत गटातील महिलांना जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, जिल्हा व्यवस्थापक अतुल नांद्रेकर, महेश गायकवाड, स्वरांजली वाटेगावकर यांचे सहकार्य लाभले.

000000

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वारणा प्रकल्पावरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी 8 कोटी 43 लाख केले मंजूर

मांगले - सावर्डे चावरे (कुंडलवाडी) बंधाऱ्यांची होणार विशेष दुरुस्ती

सांगली जि.मा.का 25 : वारणा प्रकल्पाच्या 87 हजार हेक्टर लाभ क्षेत्रापैकी 46 हजार 78 हेक्टर क्षेत्र वारणा नदीवरील उपसा सिंचन योजनेव्दारे सिंचनाखाली आणण्याचे नियोजित आहे. त्यासाठी वारणा धरण ते वारणा- कृष्णा संगमापर्यंत कोल्हापूर पध्दतीचे नऊ बंधारे घालण्यात आले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मांगले सावर्डे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे (कुंडलवाडी) या दोन कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांचा समावेश आहे. तथापि, सदर दोन्ही बंधारे जवळपास चाळीस वर्षापासून असल्याने त्यांची मोठ्याप्रमाणावर दुरुस्ती होणे आवश्यक आहे. यासाठी जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी 21 जून रोजी याची प्रत्यक्ष पाहणी करुन चावरे कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यास 4 कोटी 47 लाख मांगले सावर्डे कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यास 3 कोटी 96 लाख इतक्या रक्कमेस विशेष दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. 
वारणा नदीस दरवर्षी किमान दोन वेळा महापूर येत असतो, तसेच रब्बी हंगामापासून उन्हाळी हंगाम संपेपर्यंत बंधाऱ्यात वेळोवेळी प्रकल्पिय सिंचन, तसेच म्हैशाळ उपसा सिंचन योजनेसाठी सोडावे लागणारे पाणी यामुळे बंधाऱ्यामध्ये बहुतांशीवेळी पूर्ण संचय पातळी पर्यंत पाणीसाठा करावा लागतो. शिराळा तालुक्यातील मांगले - सावर्डे येथे सन 1979 साली बंधारा बांधलेला असून 1979 पासून पाणीसाठा करण्यात येत आहे. सदर बंधाऱ्याची एकूण लांबी 109.40 मीटर जास्तीत जास्त उंची 11.44 मीटर असून एकूण 24 गाळे आहेत. बंधाऱ्याची जास्तीत जास्त साठवण क्षमता 5.56 दलघमी (196.35 दलघफू) असून प्रकल्पीय सिंचन क्षमता 10015 हेक्टर आहे. सदरचा बंधारा जवळजवळ 38 वर्षापुर्वी बांधालेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे (कुंडलवाडी) येथे एक कोल्हापूर पध्दतीचा बंधारा सन 1973 साली बांधलेला असून 1974 पासून पाणीसाठा करण्यात येत आहे. सदर बंधाऱ्याची एकूण लांबी 90 मीटर जास्तीत जास्त उंची 12.32 मीटर असून एकूण 29 गाळे आहेत. बंधाऱ्याची जास्तीत जास्त साठवण क्षमता 4.75 दलघमी (167.75 दलघफू) असून प्रकल्पीय सिंचन क्षमता 8548 हेक्टर आहे. सदरचा बंधारा जवळजवळ 45 वर्षापुर्वी बांधालेला आहे.
दोन्ही बंधाऱ्यांस 40 वर्षे इतका प्रदिर्घ कालखंड झालेला आहे. सततच्या पाण्याच्या दाबामुळे दगडी बांधकामास असलेले बंधाऱ्याचे पिलर कमकुवत झालेले आहेत. पिलरचे दगडी बांधकाम बऱ्याच ठिकाणी निखळलेले तर काही ठिकाणी तुटुन पडलेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात बरगे बसविणे अडचणीचे झालेले आहे. यासाठी दोन्ही बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानसिंगभाऊ नाईक यांच्या सोबत दिनांक 21 जून 2020 रोजी वारणा प्रकल्पाच्या भेटीच्या दरम्यान सदर बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पहाणी केली. त्यानुसार चावरे बंधाऱ्यास रुपये 4 कोटी 47 लाख मांगले-सावर्डे बंधाऱ्यास 3 कोटी 96 लाख इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
00000