गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

सांगली येथे रन फॉर युनिटी - राष्ट्रीय एकता दौडीस उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्म दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे सांगलीमध्ये आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त घेण्यात आलेल्या रन फॉर युनिटी उपक्रमात सांगलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सकाळी 7 वाजता  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, खेळाडू, विद्यार्थी, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवून राष्ट्रीय एकता दौडची सुरुवात केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्व विशद करून उपस्थितांना शुभेच्छा देवून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. ही दौड पुष्कराज चौक सांगली येथून सुरु  होवून पुढे ही दौड मार्केट यार्ड, विश्रामबाग चौक परत त्याच मार्गाने पुन्हा पुष्कराज चौक येथे आल्यानंतर एकता दौडचा समारोप झाला.
00000

   



 

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

चला सर्वजण प्लॅस्टिक मुक्तीचा निश्चय करूया एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला जीवनातून हद्दपार करूया - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा या विषयावर राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्लॅस्टिक मुक्त भारत उपक्रम 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त सर्व जिल्ह्यात श्रमदान चळवळीचे आयोजन करण्यात येवून विविध घटकांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक संकलित करण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर पूर्णत: जीवनातून आपण हद्दपार करण्यासाठी सर्वजण मिळून निश्चय करूया.
       स्टेशन चौक सांगली येथे स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत श्रमदान चळवळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी तथा या अभियानाचे नोडल अधिकारी गोपीचंद कदम, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपायुक्त राजेंद्र तेली, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी सुनिल आंबोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
       यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, प्लॅस्टिक हे जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहे. यामुळे एकूणच पर्यावरणाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर पूर्णत: थांबवणे व हळूहळू प्लॅस्टिकला जीवनातून हद्दपार करणे यासाठी सर्वांनी सक्रीय योगदान देणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व मतदारांनी निर्भय व भयमुक्त वातावरणात मतदान करून लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा याबाबत प्रतिज्ञा दिली. तर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी उपस्थितांना प्लॅस्टिक मुक्तीची शपथ दिली. यावेळी स्टेशन चौक परिसरात श्रमदान करून स्वच्छता केली व प्लॅस्टिक संकलित केले.
       प्रास्ताविकात उपायुक्त स्मृती पाटील यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद करून सविस्तर माहिती दिली. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
       श्रमदान चळवळीत शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी सहभाग नोंदविला. तसेच आजपासून मी सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणार नाही, गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक, आता आपल्यामुळेच फरक पडेल या तयार करण्यात आलेल्या सेल्फी पाँईटने तसेच दीपक चव्हाण यांच्या शोले स्टाईल स्वच्छता रथाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कापडी पिशव्या देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
000000




महात्मा गांधी यांचे विचार आधुनिक युगातही प्रेरणादायी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक सांगली येथे पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण

     सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : प्रत्येक युगात महात्मा गांधी यांचे विचार प्रेरणादायी असून आधुनिक युगात ते जास्त महत्वपूर्ण ठरत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात सन 1936 मध्ये लावलेल्या पिंपळ वृक्षापासून तयार करण्यात आलेली रोपे दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक शहिद स्मारक परिसरात लावण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यातील 15 शहिद स्मारकांमध्ये प्रत्येकी चार पिंपळ वृक्ष रोपे स्वातंत्र्य सैनिक यांच्याहस्ते लावण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक सांगली येथे पिंपळ रोपाचे रोपण ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उप वनसंरक्षक प्र. भि. धानके,  स्वातंत्र्य सैनिक जयराम कुष्टे, माधवराव माने, चंद्रकांत पोरे, शिवाजीराव पवार यांच्यासह रोटरीचे अध्यक्ष प्रशांत माने, स्नेहल गौंडाजे, मंदार बने, रणजित माळी, रविंद्र फडके, अरूण दांडेकर, प्रमोद लाड, ॲड दिनकर माने, रामचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती देशभरात वेगवेगळ्या उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सेवाग्राम येथील पिंपळ वृक्षापासून तयार करण्यात आलेली रोपे राज्यातील विविध शहिद स्मारकामध्ये लावण्यात येत आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महात्मा गांधी यांचे विचार प्रत्येक युगात प्रेरणादायी आहेत. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश अधिक दृढ करूया. महात्मा गांधी यांची शिकवण अहिंसा, स्वच्छता, व्यक्तीची प्रतिष्ठा, सर्व धर्म समभाव हे विचार शांतताप्रिय समाजाच्या निर्मितीसाठी पुढे घेऊन जावूया. 150 व्या महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा हे अभियान हाती घेण्यात आले असून प्लॅस्टिक मुक्तीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्वजण मिळून यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

000000