शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून विभागीय आयुक्त यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

            सांगली, दि. 2, (जि. मा. का.) :  पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्देश देवून नुकसानीची भरपाई लवकरच दिली जाईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज शेतकऱ्यांना दिली.
डॉ. म्हैसेकर यांनी आज सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज, शेळकेवाडी व तासगाव तालुक्यातील मणेराजुरी व कवठेएकंद येथील नुकसानग्रस्त द्राक्ष, डाळींब, ज्वारी, सोयाबीन आदि पीकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, उपविभागीय अधिकारी मिरज समिर शिंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी पीकांची पाहणी केल्यावर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे, शेतकऱ्यांकडे अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत असे सांगून पंचनाम्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, नुकसान झालेल्या पिकांचे छायाचित्रे काढून ठेवावी, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याबाबतची कागदपत्रे तयार करावीत. त्यासाठी विमा प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी एकत्र येऊन काम करावे, असे सांगितले.
जिल्ह्यात माहे ऑक्टोबर महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत एकूण दोन ते अडीच पट पाऊस जास्त झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 512 गावांमधील १ लाख १७ हजार ५८२ शेतकऱ्यांचे ५५ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे   33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक नजरअंदाज आहे. यामध्ये परतीच्या पावसामुळे काढणी योग्य सोयाबीन, मका, भुईमुग, ज्वारी व बाजरी आदि पिकांचे नुकसान झाले आहे. अतिजोराच्या अवेळी झालेल्या पावसामुळे फळे व भाजीपाला पिकांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. काही ठिकाणी द्राक्षांचे घड कुजले आहेत. द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंबाची फळे झडली आहेत. हवेतील आद्रता वाढून फळकुज, बॅक्टेरिया व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. रब्बी हंगामातील उगवण झालेली मका व रब्बी ज्वारी पीक अतिपावसामुळे काही ठिकाणी पिवळे पडले आहे. एकूणच परतीच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यात कृषि क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देवून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना पंचनामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

00000



गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

सांगली येथे रन फॉर युनिटी - राष्ट्रीय एकता दौडीस उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्म दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे सांगलीमध्ये आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त घेण्यात आलेल्या रन फॉर युनिटी उपक्रमात सांगलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सकाळी 7 वाजता  राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, खेळाडू, विद्यार्थी, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवून राष्ट्रीय एकता दौडची सुरुवात केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्व विशद करून उपस्थितांना शुभेच्छा देवून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. ही दौड पुष्कराज चौक सांगली येथून सुरु  होवून पुढे ही दौड मार्केट यार्ड, विश्रामबाग चौक परत त्याच मार्गाने पुन्हा पुष्कराज चौक येथे आल्यानंतर एकता दौडचा समारोप झाला.
00000

   



 

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

चला सर्वजण प्लॅस्टिक मुक्तीचा निश्चय करूया एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला जीवनातून हद्दपार करूया - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा या विषयावर राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्लॅस्टिक मुक्त भारत उपक्रम 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त सर्व जिल्ह्यात श्रमदान चळवळीचे आयोजन करण्यात येवून विविध घटकांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक संकलित करण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर पूर्णत: जीवनातून आपण हद्दपार करण्यासाठी सर्वजण मिळून निश्चय करूया.
       स्टेशन चौक सांगली येथे स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत श्रमदान चळवळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी तथा या अभियानाचे नोडल अधिकारी गोपीचंद कदम, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपायुक्त राजेंद्र तेली, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी सुनिल आंबोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
       यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, प्लॅस्टिक हे जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहे. यामुळे एकूणच पर्यावरणाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर पूर्णत: थांबवणे व हळूहळू प्लॅस्टिकला जीवनातून हद्दपार करणे यासाठी सर्वांनी सक्रीय योगदान देणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व मतदारांनी निर्भय व भयमुक्त वातावरणात मतदान करून लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा याबाबत प्रतिज्ञा दिली. तर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी उपस्थितांना प्लॅस्टिक मुक्तीची शपथ दिली. यावेळी स्टेशन चौक परिसरात श्रमदान करून स्वच्छता केली व प्लॅस्टिक संकलित केले.
       प्रास्ताविकात उपायुक्त स्मृती पाटील यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद करून सविस्तर माहिती दिली. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
       श्रमदान चळवळीत शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी सहभाग नोंदविला. तसेच आजपासून मी सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणार नाही, गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक, आता आपल्यामुळेच फरक पडेल या तयार करण्यात आलेल्या सेल्फी पाँईटने तसेच दीपक चव्हाण यांच्या शोले स्टाईल स्वच्छता रथाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कापडी पिशव्या देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
000000




महात्मा गांधी यांचे विचार आधुनिक युगातही प्रेरणादायी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक सांगली येथे पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण

     सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : प्रत्येक युगात महात्मा गांधी यांचे विचार प्रेरणादायी असून आधुनिक युगात ते जास्त महत्वपूर्ण ठरत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात सन 1936 मध्ये लावलेल्या पिंपळ वृक्षापासून तयार करण्यात आलेली रोपे दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक शहिद स्मारक परिसरात लावण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यातील 15 शहिद स्मारकांमध्ये प्रत्येकी चार पिंपळ वृक्ष रोपे स्वातंत्र्य सैनिक यांच्याहस्ते लावण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक सांगली येथे पिंपळ रोपाचे रोपण ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उप वनसंरक्षक प्र. भि. धानके,  स्वातंत्र्य सैनिक जयराम कुष्टे, माधवराव माने, चंद्रकांत पोरे, शिवाजीराव पवार यांच्यासह रोटरीचे अध्यक्ष प्रशांत माने, स्नेहल गौंडाजे, मंदार बने, रणजित माळी, रविंद्र फडके, अरूण दांडेकर, प्रमोद लाड, ॲड दिनकर माने, रामचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती देशभरात वेगवेगळ्या उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सेवाग्राम येथील पिंपळ वृक्षापासून तयार करण्यात आलेली रोपे राज्यातील विविध शहिद स्मारकामध्ये लावण्यात येत आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महात्मा गांधी यांचे विचार प्रत्येक युगात प्रेरणादायी आहेत. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश अधिक दृढ करूया. महात्मा गांधी यांची शिकवण अहिंसा, स्वच्छता, व्यक्तीची प्रतिष्ठा, सर्व धर्म समभाव हे विचार शांतताप्रिय समाजाच्या निर्मितीसाठी पुढे घेऊन जावूया. 150 व्या महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा हे अभियान हाती घेण्यात आले असून प्लॅस्टिक मुक्तीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्वजण मिळून यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

000000

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : सार्वजनिक बांधकाम विभागाने स्काडा प्रणाली वापरून उभारलेल्या आणि सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या 828 मीटर लांबीच्या विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार पृथ्वीराज देशमुख, महापौर संगीता खोत, महावितरणच्या संचालिका निता केळकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूर चे अधिक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपअभियंता संजय देसाई, माजी आमदार नितीन शिंदे, कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर, शाखा अभियंता राजेंद्र मोगली, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, टि. ॲन्ड टी. इन्फ्रा लि. पुणे चे विकास पुराणिक, शेखर इनामदार आदि उपस्थित होते.
सांगली येथील विश्रामबाग रेल्वे उड्डाण पुल हा मिरज तालुक्यातील पद्माळे, सांगली, अंकली, इनामधामणी विश्रामबाग, माधवनगर, पद्माळे रस्ता राज्य मार्ग क्र. 154 भाग विश्रामबाग ते माधवनगर रेल्वे गेट क्र.  137 येथे येतो. एमआयडीसी सांगली, साखर कारखाना, सांगली कुपवाड, यशवंतनगर, बालाजीनगर, संजयनगर सर्व शहरी विस्तारीत भाग व तासगाव कराड असा उत्तरेकडील भागाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामाचा समावेश सन 2014-15 च्या अर्थसंकल्पात करण्यात येवून यासाठी 200 कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली.
या मार्गावरील रेल्वे गेट दिवसातून 52 वेळा बंद व उघड करावे लागत असल्याने रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा निर्माण होवून रूग्ण सेवेला व इतर आवश्यक वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच वर्दळीची वाहतूक असल्याने वारंवार अपघात घडत होते. त्यामुळे स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सदर उड्डाण पुलासाठी वारंवार मागणी करण्यात येत होती. या उड्डाण पुलामुळे वाहतूकीचा त्रास कायमस्वरूपी बंद होणार आहे. या पुलाची लांबी 828 मीटर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 10.50 मीटर रूंदीचे 25 मीटरचे 6 गाळे व रेल्वे विभागामार्फत 30 मीटरचा एक गाळा असा एकूण 180 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे. विश्रामबाग बाजूस 10.50 मीटर लांबीचा एक व कुपवाड बाजूस 13.50 मीटर लांबीचा एक व्हेइकल अंडर पास ठेवण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस 5.50 मीटर रूंदीचे सेवा रस्ते करण्यात आले आहेत.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी या उड्डाण पुलासाठी अतिक्रमण काढणे व त्यांचे पुनर्वसन करणे, तसेच पोलीस विभाग, रेल्वे विभाग, महानगरपालिका, विद्युत विभाग तसेच विभागांचे एकत्रित सहकार्य जमवून आणणे इत्यादी कामे अत्यंत जलदगतीने उत्कृष्ठ पध्दतीने केली. त्यामुळे हे काम गतीने पूर्ण झाले.
000000




शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

सांगलीत कृष्णेची पातळी 29.3 फूटावर स्थिर ; कोणतीही धोकादायक स्थिती नाही नागरिकांनी घाबरू नये सतर्कता बाळगावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सध्या कोयना धरणातून 41 हजार 514 व वारणा धरणातून 14 हजार 851 क्युसेक विसर्ग सुरु आहे. शुक्रवार, दिनांक 6 सप्टेंबर दुपारी 2 वाजल्यापासून सांगली येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फूट 3 इंचावर स्थिरावली असून आयर्विन पूलाजवळ असणाऱ्या 40 फूट या इशारा पातळीपेक्षाही सद्याची पाणी पातळी जवळपास 10 फूट कमी आहे. पर्जन्यमान व विसर्ग सध्या प्रमाणेच राहिल्यास पाणी पातळी कमी होईल. कोणतीही धोकादायक स्थिती नाही. नागरिकांनी घाबरू नये. नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
            शुक्रवार, दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायं 5 वाजेपर्यंत कोयना 42 मि.मी., महाबळेश्वर 21 मि.मी., नवजा 44 मि.मी., वळवण 33 मि.मी., अशी पर्जन्यवृष्टी झाली आहे. कोयना धरण पाणीसाठा 103.30 टी.एम.सी (98 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांवरुन 4.50 फूट करण्यात आले आहेत. तर  पाण्याचा विसर्ग 70 हजार 404 क्युसेस वरुन 41 हजार 514 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग  14 हजार 851 क्युसेक्स इतका आहे. अलमट्टी धरणातून 1 लाख 74 हजार 812 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पूल येथील पाणीपातळी सध्या 29 फुट 3 इंच इतकी स्थिर असून सध्यस्थितीनुसार विसर्ग राहिल्यास यापुढे ती स्थिर राहील अथवा यामध्ये घट होईल. कृष्णा पूल कराड येथे पाणी पातळी सकाळी 6 वाजता असणारी 24 फूट 10 इंच पाणी पातळी कमी होवून दुपारी 4 वाजेपर्यंत ती 21 फूट 1 इंचावर आली होती. तर भिलवडी येथे दुपारी 12 वाजता 35 फूट 10 इंच असणारी पाणी पातळी कमी होवून दुपारी 4 वाजता 35 फूट 5 इंचावरती आली होती. याचे अवलोकन करता पाणी पात्राबाहेर जाणार नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन यामध्ये समन्वय आहे. आपल्याकडील पाणी पातळीत काही बदल संभवल्यास 24 ते 48 तास आधी नागरिकांना याबाबत सूचित केले जाईल व सुरक्षिततेची आवश्यक खबरदारी घेतली जाईल. सद्यस्थितीत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, केवळ सावधानता व सतर्कता बाळगावी. कोणत्याही आपत्तीमध्ये मदत हवी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असणाऱ्या आपत्ती निवारण कक्षाशी ०२३३-२६००५०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
00000

बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 4, (जि.मा.का.) : कोयना धरणातून सद्या 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू असून चांदोली धरणातून 3400 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग असाच पुढील दोन दिवस सुरू राहिल्यास सांगली येथील आयर्विन पुलाजवळील सद्या 10 फूट 6 इंच असणारी पाणी पातळी 34 फूटावर जाण्याची शक्यता आहे. आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्ये रहाणार असले तरी नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगून सतर्क रहावे व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, धरणातून होणाऱ्या विसर्गावर प्रशासन नजर ठेवून आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जावू नये पण सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी अलमट्टी धरणातून 1 लाख विसर्ग करण्याबाबत समन्वय ठेवण्यात आल्याचेही सांगितले.

00000

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम करावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



 सांगली, दि. 4, (जि.मा.का.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे निवडणूक विषयक कामकाज करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, विविध यंत्रणांचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विधानसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने यंत्रणांनी निवडणूक विषयक कामकाज गतीमान करावे. परस्परांमध्ये समन्वय ठेवावा व काटेकोरपणे कामकाज हाताळावे, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या महापुरामुळे सांगली शहरासह अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रांची तपासणी करून दुरूस्तीबाबत तपशिलासह प्रस्ताव द्यावेत. मतदार जनजागृती मोहिमेबाबतचा तपशिलवार आराखडा तयार करावा असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी नव्याने समाविष्ट होणाऱ्या मतदारांची संख्या विचारात घेवून सहाय्यकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव तयार करावेत. दिव्यांग मतदारांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यांचे मार्किंग करावे. एसएसटी, व्हीडिओ सर्व्हिलियंस टीम आदि अनुषंगिक टीम तयार कराव्यात. मतदान केंद्रात बदल असेल तर त्या संबंधित परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. चुनाव पाठशाला उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवावा, असेही निर्देश यावेळी दिले.
00000

पूरबाधित कुटूंबाना 64 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

-  पूरबाधित 79 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
- 28 हजार 27 घरांची पडझड

सांगली, दि. 4 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी दिनांक 3 सप्टेंबर अखेर ग्रामीण भागातील 43 हजार 492 व शहरी भागातील 40 हजार 936 कुटूंबांना 42 कोटी 21 लाख 40 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 34 हजार 397 व शहरी भागातील 4490 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 21 कोटी 68 लाख 85 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटपाचे काम सर्व गावांत युध्दपातळीवर सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

पूरबाधित 79 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
दिनांक 3 सप्टेंबर अखेर 79 हजार 168 कुटुंबांना एकूण 7916.8 क्विंटल गहू व 7916.8 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 60 हजार 264 इतक्या बाधित कुटुबांना 5 लिटर प्रमाणे 3 लाख 1 हजार 320 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.
28 हजार 27 घरांची पडझड
पूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 9 हजार 391 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 18 हजार 636 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 1923 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू आहेत.

50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 99 हजार 698 शेतकऱ्यांच्या 50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.

97 पाणीपुरवठा योजना सुरू
जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सध्या 97 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 2 गावांसाठी एकूण 4 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

27 हजाराहून अधिक पशुधनावर उपचार
 जिल्ह्यात पूरबाधित कुटूंबातील आजअखेर 52 हजार 185 पशुधनावर लसीकरण व 27 हजार 837 पशुधनावर उपचार करण्यात आले आहेत. तर 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
बाधित कुटुंबातील गाय व म्हैस वर्गीय 380 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर 119 जनावरे, उंट, घोडा व बैल वर्गीय 9 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर वर्गीय 131 जनावरे, कोंबड्या व इतर पक्षी 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले आहे. नुकसानीची अंदाजित रक्कम 1 कोटी 43 लाख 32 हजार 400 इतकी आहे.
जिल्हाभरातील 290 दुधाळ जनावरांचे 74 लाख 31 हजार, ओढकाम करणाऱ्या 112 जनावरांचे 18 लाख 30 हजार व 13 हजार 481 कोंबड्या व कुक्कुट वर्गीय प्राण्यांचे 1 लाख 10 हजार 200 असे आतापर्यंत एकूण 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
पूरबाधित जनावरांसाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून 2 हजार 284 मे. टन चारा प्राप्त झाला आहे. सांगली जिल्हाकरिता 208.75 मे. टन पशुखाद्य प्राप्त झाले असून सदरचा चारा व पशुखाद्य आवश्यकतेप्रमाणे बाधित गावांमध्ये वाटप करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 23 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 306 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 52.48 कोटी इतका आहे.

000000

नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन

सांगली, दि. 4 (जि. मा. का.) :  कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणीपातळी मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये व सुरक्षेची काळजी घेवून सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे.
धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा व विसर्ग चालू आहे. कोयना धरणात 104.72 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. कोयना धरणातून 73 हजार 63 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धोम धरणात 12.82 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 95 टक्के भरले आहे. धोम धरणातून 460 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कन्हेर धरणात 9.89 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 98 टक्के भरले आहे. कन्हेर धरणातून 50 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.  उरमोडी धरणात 9.90 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. उरमोडी धरणातून 450 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तारळी धरणात 5.20 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 89 टक्के भरले आहे. वारणा धरणात 34.16 टीएमसी पाणीसाठा असून हे धरण 99 टक्के भरले आहे. वारणा धरणातून 3620 क्युसेस्क पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
विविध ठिकाणी पडलेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 71, नवजा 90, महाबळेश्वर 104, धोम 20, कन्हेर 12, उरमोडी 14, तारळी 2 व वारणा 36.

000000

नदीकाठच्या लोकांना सावधानता बाळगण्याचे नदीपात्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : कोयना धरण पाणीसाठा 104.72 टी.एम.सी (99 टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरण परिसरात अतिवृष्टी होत असून आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता कोयना धरणाचे रेडियल गेट 8 फूटाने उघडण्यात येवून पाण्याचा विसर्ग 73 हजार 63 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग  3 हजार 620 क्युसेक्स इतका आहे. यामुळे सांगली येथील सद्याच्या कृष्णा नदीच्या पात्रामधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होवून सद्यस्थितीत 25 फूटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
00000


शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

केंद्रीय पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी परिसराला भेट देवून नुकसानीची केली पाहणी

सांगली, दि. 30 (जिमाका) :   सांगली शहर व जिल्ह्यातील 104 गावांना महापूराचा जबर फटका बसला आहे. व्यापार, शेती, घरे, पशुधन यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दोन दिवस जिल्ह्यात दाखल होते. आज या पथकाने ब्रम्हनाळ, भिलवडी, भुवनेश्वरवाडी या परिसराला भेट देवून पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
डॉ. व्ही. थिरुपुगाज, सहसचिव (पी ॲण्ड पी) नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने या गावांची पाहणी केली. त्यांच्या समवेत संजय जयस्वाल अधिक्षक अभियंता, नवी मुंबई  हे होते. या पथकासमवेत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील पथक ब्रम्हनाळ येथे दाखल झाले. त्यांनी तेथील दलित वस्ती, कुटुंब कल्याण केंद्र, पोस्ट ऑफिस, अंगणवाडी या ठिकाणी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ दुर्घटना कशी घडली याबाबत जाणून घेतले. तसेच तेथील शेतकऱ्यांचे शेतीचे किती नुकसान झाले आहे, पशुधनाचे किती नुकसान झाले आहे याचीही माहिती घेतली. यावेळी गावकऱ्यांनी भिलवडी, ब्रम्हनाळ, खटाव या भागात प्रामुख्याने ऊसाचे पिक असून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 240 हून अधिक पशुधन वाहून गेले आहे असे सांगून मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा मोठा पूल व्हावा, अशी विनंती केली. तसेच गावचे पुनर्वसन व्हावे, अशीही मागणी केली. यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने पूरपश्चात उपाययोजना, मदतकार्य अत्यंत उत्तमरित्या राबविल्याचे नमूद केले.
 या पथकाने भिलवडी येथे पडझड झालेली घरे, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, जनावरांचा गोठा आदिंची पाहणी केली. तर भुवनेश्वरवाडी येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

हरिपूर येथे केंद्रीय पथकाची भेट
तसेच हरिपूर येथे केंद्रीय पथकातील आर. पी. सिंग संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली या सदस्यांनी भेट दिली. या ठिकाणी पडझड झालेली घरे, हळदीचे पेव यांची पाहणी करून केळी, भुईमुग, ऊस आदि नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच मयत झालेल्या जनावरांच्या गोठ्यास भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
00000








कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) :  विविध आंदोलने, सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.      
यानुसार सडकांवरील व सडकेने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व त्यांची वर्तवणुक कशी असावी या विषयी निर्देश देणे, मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेच्या आसपास, उपासनेच्यावेळी कोणत्याही सडकेवरून किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा वेळी अडथळा होवू न देणे, मिरवणूका ज्या मार्गाने जाव्यात अथवा जावू नयेत, त्यांची वेळ व मार्ग ठरवून देणे, सार्वजनिक सडकांवर व सडकेमध्ये घाटात किंवा घाटावर मार्ग असल्यास किंवा धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक लोकांच्या स्नानाच्या ठिकाणी, जागेमध्ये, जत्रा, देवालय, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जाण्या येणाच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणे, कोणत्याही सडकेत किंवा सडकेजवळ, सार्वजनिक जागेत वाद्य वाजविणे किंवा ढोल, ताशे, इतर वाद्ये वाजविणे यांचे नियमन करणे, कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक उपहाराच्या जागेत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम प्राधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 33, 36, 37 ते 40, 42, 43 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या अधिन असलेल्या व त्यास पुष्ठी देणारे योग्य ते आदेश काढणे, असे अधिकार प्रदान केले आहेत. हा आदेश दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजीच्या 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
या दरम्यान वरील पोलीस ठाणे स्थलसिमा हद्दीत कोणालाही मोर्चे, निदर्शने, मिरवणुका, सभा इत्यादी आयोजित करावयाच्या असल्यास त्यांनी संबधीत पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वेळ, मार्ग, घोषणा, सभेचे ठिकाण इत्यादी बाबी ठरवून घेवून परवानगी घेतली पाहिजे. या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 134 प्रमाणे कारवाईस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.


00000

गणेशोत्सवानिमित्त सांगली व मिरज शहरात मनाई आदेश जारी

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) :  सांगली जिल्ह्यात दिनांक 2 ते 12 सप्टेंबर 2019 अखेर गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात देखावे व गणेश विसर्जन मिरवणूका पाहण्यासाठी सांगली व मिरज शहरात बहुसंख्य लहान मुले, स्त्रिया, पुरुष गर्दी करीत असतात. नागरीकांना व्यवस्थीत देखावे व विसर्जन मिरवणूका पाहता याव्यात तसेच कोणतेही वाहन गर्दीत घुसुन नागरीकांच्या जिवीतास धोका पोहोचू नये याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये सांगली व मिरज शहरातील खालील मार्गावर मिरवणुकीचे वाहने, पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार सांगली शहरात  दिनांक 6, 8 व 10 सप्टेंबर 2019 रोजी  दुपारी 2 ते रात्री 12 या वेळेत तसेच दिनांक 12 सप्टेंबर 2019 रोजीेचे दुपारी 2 वाजल्यापासून ते दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजीचे रात्री 12 या वेळेत, टिळक चौक ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, जोग ज्वेलर्स ते सराफ कट्टयाकडे जाणारा रस्ता, गारमेंट सेंटर ते मारुती चौकाकडे जाणारा रस्ता व बालाजी चौकाकडे जाणारा रस्ता, मैत्रिण कॉर्नर ते करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, सांगली शहर पोलीस ठाणे ते करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, राजवाडा चौक ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, स्टेशन चौक ते टेलीफोन ऑफिसकडे जाणारा रस्ता, जुना बुधगांव रोड ते बायपास कडून वखारभागाकडे जाणारा रस्ता, जामवाडी कॉर्नर ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी ते तानाजी चौकाकडे जाणारा रस्ता, गवळी गल्ली ते झांशी चौकाकडे जाणारा रस्ता, मगरमच्छ कॉलनी (क्रॉस रोड) ते सराफ कट्टयाकडे जाणारा रस्ता, वसंतदादा समाधी स्थळ (क्रॉस रोड) ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, नवसंदेश कार्यालय ते आनंद टॉकीजकडे जाणारा रस्ता, कामगार भवन ते आमराईकडे जाणारा रस्ता, देशपांडे बिल्डींग (वखारभाग) ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता व वखारभाग ते गवळी गल्लीकडून हायस्कूल रोड व गणपती पेठेस मिळणारे सर्व रस्ते या मार्गावर उपरोक्त कालावधीसाठी मनाई आदेश लागू राहील.
तर मिरज शहरात दिनांक 10 सप्टेंबर 2019 रोजीचे 9 वाजल्यापासून ते 11 सप्टेंबर 2019 रोजीचे 8 वाजेपर्यंत व दिनांक 12 सप्टेंबर 2019 रोजीचे 8 वाजल्यापासून ते  13 सप्टेंबर 2019 रोजीचे 15.00 वाजेपर्यंत, श्रीकांत चौक ते श्रीकांत चौकात येणारे रस्ते, स्टेशन चौक ते मिरासो दर्ग्याकडे जाणारा रस्ता, हिरा हॉटेल ते मिरज शहर पोलीस ठाणेकडून जाणारा रस्ता, फुलारी कॉर्नर ते फुलारी कॉर्नरकडे येणारे सर्व रस्ते, बॉम्बे बेकरी ते बॉम्बे बेकरीकडे येणारे सर्व रस्ते, किसान चौक ते श्रीेकांत चौक व पोलीस ठाणे कडे जाणारा रस्ता, दत्त चौक ते श्रीकांत चौकाकडे जाणारा रस्ता, जवाहर चौक ते किसान चौकाकडे जाणारा रस्ता, भोसले चौक ते पाटील हौदाकडून भोसले चौकोकडे जाणारा रस्ता, झारी मस्जिद कॉर्नर ते बॉम्बे बेकरीकडे जाणारा रस्ता व श्रीकांत चौक ते गणेश तलाव या मार्गावर येणारे सर्व रस्ते या मार्गावर उपरोक्त कालावधीसाठी मनाई आदेश लागू राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यायी वाहतूक, गणपती विसर्जन मार्ग व पार्किंग व्यवस्था
सांगली शहर येथील पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - मिरजकडून येणारी व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - पुष्पराज चौक-सिव्हील हॉस्पीटल-झुलेलाल चौक-पत्रकार नगर कॉर्नर-आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील), इस्लामपूरकडून येणारी व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - इस्लामपूर टोलनाका-बायपास-कॉलेज कॉर्नर-आपटा चौकी-पुष्पराज चौक-सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकारनगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील). तासगाव, विटा कडून सांगलीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी - कॉलेज कॉर्नर-आपटा चौकी - पुष्पराज चौक - सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकार नगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील).
सांगली शहर गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग - विश्रामबाग चौकाकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - विश्रामबाग - पुष्पराज चौक - राममंदिर - काँग्रेस भवन - कामगार भवन - स्टेशन चौक - राजवाडा चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदीर - टिळक चौक - कृष्णा घाट. रिसाला रोडकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - रिसाला रोड - शिवाजी पुतळा - मारूती चौक - गारमेंट सेंटर चौक - बालाजी चौक येथून वेगवेगळे मार्ग, बालाजी चौक - करमरकर चौक - राजवाडा चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदिर - टिळक चौक - कृष्णा घाट, बालाजी चौक - झांशी चौक - गणपती मंदिर - टिळक चौक - कृष्णा घाट. टिंबर एरियाकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - कॉलेज कॉर्नर - सांगली हायस्कूल - पुष्पराज चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदिर - टिळक चौक - कृष्णा घाट. गणपती विसर्जन झालेल्या मंडळाचा परतीचा मार्ग - टिळक चौक - हरभट रोड - गारमेंट सेंटर चौक मार्गे.
सांगली शहर पार्किंग व्यवस्था - जनावर बाजार (टिळक मार्ग) - इस्लामपूर व सांगलीकडून येणाऱ्या वाहनांच्यासाठी, जूनी जयश्री टॉकीजच्या मागे (हरभट रोड) - चारचाकी वाहनांसाठी (पे पार्कींग), शिवनेरी हॉटेलच्या पाठीमागे (भावे नाट्यगृहालगत) - दूचाकी व चारचाकी वाहनांसाठी, वैरण बाजार (तरूण भारत स्टेडियम समोर) - कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी, राजवाडा पटांगण - पलूस नांद्रेकडून येणाऱ्या वाहनांसाठी, कोर्ट आवार - दूचाकी वाहनांसाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम - तासगाव किंवा मिरजकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पीटल - तासगावकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम - दूचाकी पार्किंगसाठी, सांगली हायस्कूल सांगली (आमराईजवळ) -टिंबर एरियाकडून येणाऱ्या दूचाकी वाहनांसाठी, कर्नाळ पोलीस चौकीच्या मागील पटांगण (जामवाडी) - कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, पटेल चौक क्रीडा मंडळ - कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी.
मिरज येथील पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे - सोलापूरकडून म्हैशाळकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी-तासगाव फाटा-सुभाषनगर-विजयनगर मार्गे-म्हैशाळ/कागवाड, म्हैशाळ व कर्नाटककडून पंढरपूर सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी - म्हैशाळ- विजयनगर - सुभाषनगर - तासगाव फाटा - पंढरपूर, सोलापूर. सोलापूर, पंढरपूरहून मिरज मार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी - पंढरपूर रोड, गांधी चौक, वंटमुरे कॉर्नर, विजयनगर, विश्रामबाग, धामणी, अंकली, कोल्हापूरकडे जातील. कोल्हापूरहून पंढरपूर, सोलापूरकडे जाणारी वाहने - अंकली फाटा, धामणी, विश्रामबाग, विजयनगर, वंटमुरे कॉर्नर, गांधी चौक, पंढरपूर, सोलापूरकडे जातील. कर्नाटकातून म्हैशाळ मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहने - म्हैशाळ, शास्त्री चौक, महात्मा फुले चौक, रेल्वे ब्रीज मार्गे कोल्हापूरकडे जातील. कोल्हापूरकडून म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जाणारी वाहने - अंकली फाटा, रेल्वे ब्रीज, महात्मा फुले चौक, शास्त्री चौक, म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जातील. कृष्णाघाट मार्गे शिरोळ तालुक्याकडेजाणारी वाहने - शास्त्री चौक, महात्मा फुले चौक, रेल्वे ब्रीज, अंकली फाटा, उदगाव मार्गे शिरोळ कोल्हापूरकडेजातील. कृष्णा घाट मार्गे मिरजकडे येणारी वाहने कृष्णा नदीच्या पलीकडून उदगाव, अंकली मार्गे मिरजकडे जातील. सुभाषनगरकडून मिरजकडेयेणारी वाहने सुभाषनगर, गाडवे चौक, वखार भाग, पंचशील चौक मार्गे जवाहर चौक, शास्त्री चौक, मार्गाचा वापर करतील. सुभाषनगरकडून सांगली, एमआयडीसीकडे जाणारी वाहने दिंडीवेस, आळतेकर हॉल, शिंदेबंगला, कर्मवीर भाऊराव चौक, बसाप्पा हलवाई कॉर्नर, मिशन हॉस्पीटलच्या मार्गे सांगलीकडेजातील.
मिरज शहर गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग - गणेश तलावामध्ये विसर्जन होणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - पंढरपूर रोडकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - गांधी चौक - शिवाजी रोड -स्टेशन चौक - मिरासो दर्गा - किसान चौक - श्रीकांत चौक - नागोबा कट्टा - गणेश तलाव. सुभाषनगर/मालगावकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - सुभाषनगर - मालगाव रोड - दिंडीवेस - विजापूर वेस - श्रीकांत चौक - नागोबा कट्टा - गणेश तलाव. हीरा हॉटेलकडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - गांधी चौक - शिवाजी रोड -  हीरा हॉटेल - गुरूवार पेठ -  किसान चौक - श्रीकांत चौक - नागोबा कट्टा - गणेश तलाव. कृष्णा घाट मिरज येथे विसर्जन होणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - गांधी चौक -शिवाजी रोड - स्टेशन चौक - शास्त्री चौक - नदीवेस - कृष्णा घाट.
मिरज शहर पार्किंग व्यवस्था - छ. शिवाजी स्टेडीयम - कोल्हापूर, सांगली कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, महात्मा फुले चौक - कर्नाटक, म्हैशाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. न्यू इंग्लीश स्कूल - कवठेमहांकाळ, मालगाव, सुभाषनगरकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, मिरज हायस्कूल - आरग, बेडगकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, एमआयडीसी हायस्कूल - टाकळी, बोलवाड, एरंडोली कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, साठे पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस - वाहनांची गर्दी झाल्यास पर्यायी पार्किंग व्यवस्था.
00000




पूरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी

सांगली, दि. 29 (जिमाका) :   पूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने आज वाळवा तालुक्यातील वाळवा, शिरगाव , मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे भेट देवून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.
डॉ. व्ही. थिरुपुगाज, सहसचिव (पी ॲण्ड पी) नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने या गावांची पाहणी केली. त्यांचे समवेत आर. पी. सिंग, संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली, संजय जयस्वाल अधिक्षक अभियंता, नवी मुंबई व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली हे होते. या पथकासमवेत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने पूरबाधीत गावातील ऊस, केळी, द्राक्ष, सोयाबिन, आदी पिकांची, पडझड झालेल्या घरांची, पाणी किती वाढले होते याची पाहणी करुन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पहाणी केली.  सानुग्रह अनुदान मिळाले का, स्थलांतर कसे झाले आदी बाबतही त्यांनी विचारणा केली.
 सांगली येथे  रेसिडेंसी क्लब येथे अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात पूरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राचे पंचनामे अंतीम टप्प्यात असल्याचे सांगितले. तसेच शाळा, रस्ते, पशुधन नुकसानीबाबत माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीची माहिती उद्या जिल्हाधिकारी दौलत देसाई देणार आहेत.
या बैठकीला महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, कोल्हापूरचे मल्लीनाथ कलशेट्टी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, सार्वजनिक बांधकाम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000





गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

52 हजाराहून अधिक पशुधनावर लसीकरण 26 हजाराहून अधिक पशुधनावर उपचार

सांगली, दि. 29 (जि.मा.का) : जिल्ह्यात पूरबाधित कुटूंबातील आजअखेर 52 हजार 185 पशुधनावर लसीकरण व 27 हजार 43 पशुधनावर उपचार करण्यात आले आहेत. तर 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
बाधित कुटुंबातील गाय व म्हैस वर्गीय 379 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर 119 जनावरे, उंट, घोडा व बैल वर्गीय 7 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर वर्गीय 131 जनावरे, कोंबड्या व इतर पक्षी 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले आहे. नुकसानीची अंदाजित रक्कम 1 कोटी 42 लाख 52 हजार 400 इतकी आहे.
जिल्हाभरातील 290 दुधाळ जनावरांचे 74 लाख 31 हजार, ओढकाम करणाऱ्या 112 जनावरांचे 18 लाख 30 हजार व 13 हजार 481 कोंबड्या व कुक्कुट वर्गीय प्राण्यांचे 1 लाख 10 हजार 200 असे आतापर्यंत एकूण 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
पूरबाधित जनावरांसाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून 2 हजार 274 मे. टन चारा प्राप्त झाला आहे. सांगली जिल्हाकरिता 208.75 मे. टन पशुखाद्य प्राप्त झाले असून सदरचा चारा व पशुखाद्य आवश्यकतेप्रमाणे बाधित गावांमध्ये वाटप करण्यात आले आहे.
000000


पूरबाधित कुटूंबाना 50 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

- 26 हजार 594 घरांची पडझड
- जीवनावश्यक वस्तूंचे 23 हजार 351 किट वितरीत
-  पूरबाधित 69 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

सांगली, दि. 29 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 351 व शहरी भागातील 36 हजार 63 कुटूंबांना 39 कोटी 70 लाख 70 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 19 हजार 109 व शहरी भागातील 1280 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 10 कोटी 83 लाख 45 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

26 हजार 594 घरांची पडझड
पूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 8 हजार 898 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 17 हजार 696 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 958 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू असून शहरी भागातही मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे, वाणिज्यिक पंचनामे सुरू झाले आहेत. पूरबाधित वाणिज्य मिळकतीची नुकसान झालेली 88 गावे बाधित असून 16 हजार 162 मिळकती आहेत. त्यापैकी 11 हजार 329 पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे गतीने सुरू आहेत.

पूरबाधित 69 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
दिनांक 28 ऑगस्ट अखेर 69 हजार 971 कुटुंबांना एकूण 6997.1 क्विंटल गहू व 6997.1 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 51 हजार 973 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 2 लाख 59 हजार 865 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.

50319.23 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 97 हजार 701 शेतकऱ्यांच्या 50319.23 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.

97 पाणीपुरवठा योजना सुरू
जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सध्या 97 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 19 गावांसाठी एकूण 21 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 13 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे 23 हजार 351 किट वितरीत
राज्यभरातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या विविध मदतीचे वितरण महानगरपालिका व पूरबाधित तालुक्यांना करण्यात आले आहे. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे 23 हजार 351 किटचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही किट बनविण्याचे काम सुरू असून जसजसे किट तयार होतील तसे त्याचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 24 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 305 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 56.37 कोटी इतका आहे.
000000






बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

परवडणाऱ्या घरांचा कर दर एक टक्का झाल्याने घरे स्वस्त -सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 28: महानगरातील 60 चौ.मी चटई क्षेत्र असणाऱ्या घरांसाठी आणि महानगराव्यतिरिक्त इतर शहरे आणि गावांमधील 90 चौ.मी चटई क्षेत्राच्या घरांसाठी जीएसटीचा दर 8 टक्क्यांवरून एक टक्का करण्यात आल्याने अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचे घर कमी किंमतीत मिळणे शक्य झाले असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
वस्तू आणि सेवा कर परिषदेने गृहनिर्माण क्षेत्रावरचा कराचा भार कमी केल्याने सर्वसामान्य माणसाचे हक्काचे घर असण्याचे स्वप्नं प्रत्यक्षात येण्यास मदत झाली आहे. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जीएसटी आधी वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर व्हॅट आणि सेवाकर आकारला जात असे. वस्तू आणि सेवा कर अस्तित्वात आल्यानंतर या क्षेत्रासाठी पूर्वीच्या करांचा एकत्रित भार घेऊन नवीन दर निश्चित करण्यात आला होता. परंतु सर्वसामान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्नं आणि या क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन गृहनिर्माण क्षेत्रावरील कराचा बोजा कमी करण्यात आला.
गृहनिर्माण क्षेत्रासाठी कराचा बोजा कमी करण्याचा शासनाने वस्तू आणि सेवा कर परिषदेने प्रयत्न केला आहे. याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे, असेही अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
परवडणाऱ्या घरांव्यतिरिक्त बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील कराचा दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना घर खरेदीसाठी कमी किंमत मोजावी  लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त झाली असून या क्षेत्राच्या वाढीसाठी चालना मिळाली  असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
निवासी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी
निवासी सोसायटींना पूर्वी 5 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक देखभाल शुल्क (मेंटेनन्स) आकारल्यास वस्तू आणि सेवा कर द्यावा लागत असे. आता नवीन बदलामुळे 7500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक देखभाल शुल्क असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना वस्तु आणि सेवाकर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जमीन मालकाने टीडीआर, एफएसआय किंवा लाँग टर्म लिज द्वारे  संबंधित हक्क हस्तांतरीत करून या जमीनीवर बांधण्यात आलेली घरे जर बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी विक्री करून त्यावरील कर भरला असेल तर टीडीआर, एफएसआय अथवा दीर्घकालीन भाडे करारांवर वस्तु आणि सेवा कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे ही घरांच्या किंमती कमी होण्यास मदत होत असल्याचे वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

0000