बुधवार, ४ सप्टेंबर, २०१९

पूरबाधित कुटूंबाना 64 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

-  पूरबाधित 79 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
- 28 हजार 27 घरांची पडझड

सांगली, दि. 4 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी दिनांक 3 सप्टेंबर अखेर ग्रामीण भागातील 43 हजार 492 व शहरी भागातील 40 हजार 936 कुटूंबांना 42 कोटी 21 लाख 40 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 34 हजार 397 व शहरी भागातील 4490 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 21 कोटी 68 लाख 85 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटपाचे काम सर्व गावांत युध्दपातळीवर सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

पूरबाधित 79 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
दिनांक 3 सप्टेंबर अखेर 79 हजार 168 कुटुंबांना एकूण 7916.8 क्विंटल गहू व 7916.8 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 60 हजार 264 इतक्या बाधित कुटुबांना 5 लिटर प्रमाणे 3 लाख 1 हजार 320 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.
28 हजार 27 घरांची पडझड
पूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 9 हजार 391 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 18 हजार 636 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 1923 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू आहेत.

50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 99 हजार 698 शेतकऱ्यांच्या 50833.61 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.

97 पाणीपुरवठा योजना सुरू
जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सध्या 97 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 2 गावांसाठी एकूण 4 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

27 हजाराहून अधिक पशुधनावर उपचार
 जिल्ह्यात पूरबाधित कुटूंबातील आजअखेर 52 हजार 185 पशुधनावर लसीकरण व 27 हजार 837 पशुधनावर उपचार करण्यात आले आहेत. तर 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
बाधित कुटुंबातील गाय व म्हैस वर्गीय 380 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर 119 जनावरे, उंट, घोडा व बैल वर्गीय 9 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर वर्गीय 131 जनावरे, कोंबड्या व इतर पक्षी 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले आहे. नुकसानीची अंदाजित रक्कम 1 कोटी 43 लाख 32 हजार 400 इतकी आहे.
जिल्हाभरातील 290 दुधाळ जनावरांचे 74 लाख 31 हजार, ओढकाम करणाऱ्या 112 जनावरांचे 18 लाख 30 हजार व 13 हजार 481 कोंबड्या व कुक्कुट वर्गीय प्राण्यांचे 1 लाख 10 हजार 200 असे आतापर्यंत एकूण 13 हजार 883 जनावरांच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात येवून 93 लाख 71 हजार 200 एवढे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
पूरबाधित जनावरांसाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून 2 हजार 284 मे. टन चारा प्राप्त झाला आहे. सांगली जिल्हाकरिता 208.75 मे. टन पशुखाद्य प्राप्त झाले असून सदरचा चारा व पशुखाद्य आवश्यकतेप्रमाणे बाधित गावांमध्ये वाटप करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 23 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 306 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 52.48 कोटी इतका आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा