शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

ग्रामसेवकांनी गावाच्या विकासासाठी गतीने काम करावे - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 16 (जि.मा.का.) : ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय प्रशासनाचा महत्वाचा खांब असतो. शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. त्यांचे सांगली जिल्ह्यात उत्कृष्ट काम सुरू आहे. ग्रामसेवकांनी सर्वांच्या बरोबर राहून गावाच्या विकासासाठी गतीने काम करून प्राप्त निधी विहीत मुदतीत खर्च करावा, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालय येथे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, सहायक गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करावा त्यामध्ये विविध प्रकारच्या पुरस्कारांचा समावेश करावा, असे सूचित करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसीत भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी एक वाहन असून या माध्यमातून प्रत्येक गावागावात शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. याचा लाभ तळागाळातील व्यक्तिपर्यंत पोहोचवावा. ग्रामसेवकांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत, त्यांना काही अडचणी असतील तर त्या मांडाव्यात, शासन दरबारी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी जिल्हा परिषदेचा कणा आहे. त्यांनी तळागाळापर्यंत काम केले तरच पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच शासनाच्या ग्राम विकासाच्या योजनांची योग्य अंमलबावणी होण्यासाठी मदत होवू शकते. शासनाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करणे हे प्राथमिक कर्तव्य असून ग्राम विकास अधिकारी मोठ्या उत्साहाने पुढेही काम करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली व पुरस्कारार्थीं व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय गायकवाड, प्रविण देसाई व धनश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामसेवकांच्या जबाबदाऱ्या व ते करत असलेली विविध प्रकारची कामे याबद्दल विवेचन केले. यावेळी सन 2010-11 ते 2022-23 या पुरस्कार वर्षातील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन वृषभ आकिवाटे यांनी केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा