गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. पीकस्पर्धेतील ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस ही पाच रब्बी पिके आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत. स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रूपये प्रवेश शुल्क राहील. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी स्पर्धा पातळीनुसार पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे पुढीलप्रमाणे. तालुका पातळी- 5 हजार रूपये, 3 हजार रूपये व 2 हजार रूपये. जिल्हा पातळी - 10 हजार रूपये, 7 हजार रूपये व 5 हजार रूपये. राज्य पातळी - 50 हजार रूपये, 40 हजार रूपये व 30 हजार रूपये. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहनही श्री. कुंभार यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा