गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : व्यापक पध्दतीने साजरा करा कार्यक्रमांचा सविस्तर आराखडा 15 नोव्हेंबर पर्यंत सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्याला स्वातंत्र्य लढ्याचा दैदीप्यमान, गौरवपूर्ण वारसा लाभलेला आहे. देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या निमित्त देशभरात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात अधिक व्यापक पध्दतीने साजरा करण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे. यामध्ये प्राधान्याने अंमलात आणावयाचे उपक्रम, योजना, कार्यक्रम याबाबतचा सविस्तर आराखडा 15 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा प्रशासनास सादर करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाबाबत आयोजित आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, सर्व प्रातांधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे. हा महोत्सव अधिक व्यापकपणे साजरा करण्यासाठी नवनविन संकल्पना राबविण्यात याव्यात. त्याचबरोबर शासनाकडून प्राप्त झालेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो प्राधान्याने सर्व कार्यालयांनी दर्शनी भागात लावावा. तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करावी. या समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमात सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, संकल्पक व्यक्ती यांचा सहभाग घ्यावा. ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत स्तरावरही समित्यांची स्थापना करावी व दरमहा या विषयाचा आढावा घेण्यात यावा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आत्तापर्यंत विविध विभागांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती छायाचित्रासह विहीत नमुन्यात द्यावी. तसेच १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजनही 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत विहीत नमुन्यात द्यावे. सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्य चळवळी संबंधित असणारी स्मारके, हुतात्मा स्मारके सुस्थितीत ठेवावीत. त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी आवश्यक असल्यास प्रस्ताव त्वरीत सादर करावेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दर्जेदार आरोग्य, पर्यटन संधी, युवा शक्ती, सामाजीक न्याय, सामाजिक सलोखा, कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान, सुशासन, माझी वसुंधरा, अर्थ साक्षरता, रोजगार निर्मीती, चिरंतन विकास, महिलांचा वाढता सहभाग, सांस्कृतिक निर्देशांक वाढ या विषयांवर प्राधान्याने वैविध्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. याबरोबरच स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हेरीटेज वॉक, सायकल रॅली, पथनाट्य, चर्चासर्त्रे, परिसंवाद, प्रदर्शने, मेळावे, लोककला, अभिजात कला, ‍निबंध स्पर्धा यांच्या माध्यमातून लोकसहभागातून महोत्सवी वातावरण निर्माण करावे. स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दिलेली व्यक्तीमत्वे, वारसा स्थळे अशा ठिकाणी पदयात्रांचे आयोजन व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांमध्ये वातावरण निर्मिती करावी. मॉडेल स्कूल, क्रीडा विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या सर्वांचा सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा