शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

कोविडमुळे पालक गमावलेल्या ६८७ बालकांना प्रतिमहा ११०० रूपये बालसंगोपन निधी लाभ मंजूर

- १२ बालकांना प्रत्येकी ५ लाख रूपये बालकांच्या व शासनाच्या संयुक्त नावे कायम ठेव (FD) स्वरुपात जमा सांगली, दि. 3. (जि. मा. का.) : ‍कोविड-१९ संसर्गामुळे जिल्ह्यातील ७१५ पेक्षा जास्त बालकांनी आपले पालक गमावले आहेत. कोविड-१९ या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांवर तसेच एक पालक गमावलेल्या मुलांना गंभीर समस्यांना तोंड देण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महिला व बाल विकास मार्फत अशा १८ वर्षाखालील ६८७ बालकांना प्रतिमहा ११०० रुपये प्रमाणे बालसंगोपन निधी लाभ मंजूर करण्यात आला आहे. तसेच कोविडच्या प्रादुर्भावाने दोन्ही पालक गमावलेल्या १८ वर्षाखालील एकूण २० बालकांपैकी १२ बालकांना आजअखेर प्रत्येकी रक्कम ५ लाख रूपये इतका निधी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बालकांच्या व शासनाच्या संयुक्त नावे कायम ठेव (FD) स्वरुपात जमा करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत ८ बालकांना या योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरु आहे. केंद्र शासनाकडूनही विविध योजनांचा लाभ कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत मिळावी याससाठी PM care for children scheme ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची काळजी व संरक्षण सुनिश्चित करणे, आरोग्य, शिक्षणाद्वारे सक्षमिकरण करणे. वयाच्या १८ व्या वर्षी मासिक वेतन आणि वयाच्या २३ व्या वर्षी एकरकमी १० लाख रुपयांचा लाभ देवून स्वयंपूर्णत्वासाठी सुसज्ज करणे हा आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत आरोग्य विमा अंतर्गत ५ लाख रूपये आरोग्य विमा वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेंतर्गत मासिक हप्ते देण्याचे प्रावधान आहे. या योजनेचा लाभ देण्याकरीता १९ लाभार्थी बालकांची माहिती व कागदपत्रे शासनास पोर्टलच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहेत. लाभार्थीयांना १० लाख रुपयांच्या लाभासाठी जिल्हाधिकारी व लाभार्थी यांचे संयुक्त खाते जिल्ह्याच्या मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये उघडण्यास मान्यता घेण्यात आली आहे. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा