मंगळवार, १८ जून, २०२४

प्रशिक्षण संस्थेच्या निवडीसाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली दि. 18 (जि.मा.का.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली आणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेव्दारे मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या संस्था चालकांनी आपला प्रस्ताव दि. 30 जून 2024 पर्यंत दोन प्रतित सादर करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवसापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 500 प्रशिक्षणार्थीचे कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटूंबाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून समाजातील गरजूनां आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परिक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकाची राहील. त्याशिवाय संस्थेची फी दिली जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधी नुसार टप्प्या टप्प्याने प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल. सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या संस्था चालकांनी आपला प्रस्ताव 30 जून पर्यंत सादर करावा. सांगली जिल्ह्यातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे, त्याच संस्था आपला प्रस्ताव दाखल करू शकतील. 30 जून नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी केले आहे. प्रशिक्षणासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे -अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० असावे. अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा लागेल. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा