शनिवार, १२ मार्च, २०२२

माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम सुरू- पालकमंत्री जयंत पाटील

वाळवा पंचायत समिती आवारात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते अनावरण - पंचायत समिती वाळवा यांनी तयार केलेल्या ई-लर्निंग डिजीटल स्टुडिओचे उद्घाटन सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : ‍वाळवा तालुक्याने स्वातंत्र्याच्या संग्रामात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका म्हणून वाळवा तालुक्याची ओळख आहे. त्याचबरोबर आधुनिक विकासाचा तालुका म्हणूनही ओळख निर्माण केली आहे. आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिंचन, कृषि या क्षेत्रात हा तालुका नेहमीच अग्रेसर राहिला. यामध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. याचप्रमाणे सांगली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्रिसुत्री तयार करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम सुरू असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 173 व दुसऱ्या टप्प्यात 163 मॉडेल स्कूल विकसीत करण्यात येत आहेत. उर्वरीत सर्व शाळा मॉडेल स्कूल करण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. वाळवा पंचायत समिती इस्लामपूर येथील आवारात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण व पंचायत समिती वाळवा यांनी तयार केलेल्या ई-लर्निंग डिजीटल स्टुडिओचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील व ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरूण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रातांधिकारी डॉ. संपत खिलारी, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तहसिलदार प्रदीप उबाळे, ‍शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती आजी माजी सदस्य, महिला बचतगटाच्या सदस्या उपस्थित होत्या. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा आदर्श होत चाचल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढत असून यावर्षी 7 हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आले आहेत. ही या उपक्रमाची यशस्वीता असून हा उपक्रम अधिक व्यापकपणे राबविण्यावर भर देण्यात येईल. तसेच पुढील काळात लवकरच 11 वी व 12 वी च्या शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच जात पडताळणीचे प्रमाणपत्र देण्याबाबतची योजना तयार करून त्याचीही अंमलबजावणी करण्यात येईल. महिला बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणात वस्तुंचे उत्पादन करीत असतात. या वस्तुंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठीही यंत्रणा उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला बचतगटानांही आर्थिक बळ मिळेल. जिल्ह्यामध्ये शासकीय कामांसाठी येणाऱ्या व्यक्तींना त्यांची कामे तातडीने व्हावीत यासाठी प्रशासन गतीमान व पारदर्शी कारभार करण्यासाठी प्रयत्न करून जनतेला चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न पुढील काळात राहील. राज्य शासनही जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी अनेक योजना राबवित आहे. सन 2022-23 मध्ये मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सर्वसमावेशकपणे विचार होवून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, वाळवा तालुक्याने सर्वांगीण विकास साधला असून हा विकास अल्पकाळाचा नाही. यामागे लोकनेते राजारामबापू पाटील यांचा दुरदर्शीपणाचा दृष्टीकोन आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांनी दुष्काळी भागात प्रामुख्याने पाणी मिळावे यासाठी अनेक पदयात्रा काढल्या म्हणून ते पदयात्री ठरले. लोकनेते राजारामबापूंच्या दृष्टीकोनातून विकास साधला गेला. त्याचपध्दतीने ग्रामविकास खात्याच्या माध्यमातूनही विकास करण्याचे काम सुरू आहे. राज्यामध्ये 34 जिल्हा परिषदा, 530 पंचायत समिती तर 38 हजार ग्रामपंचायती आहेत. या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मिळणाऱ्या निधीचे ग्रामपंचायतींना 80 टक्के तर पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रत्येकी 10 टक्के अनुदान विकासकामांसाठी वितरीत करण्यात येते. त्याचबरोबर महाआवास अभियानांतर्गत आत्तापर्यंत 7 लाख इतकी घरे बांधून तयार झाली आहेत. तीन महिन्यात 5 लाख घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतींना बांधकाम परवाने देण्याचे अधिकारही वाढविण्यात आले आहेत. राज्य शासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासाला झुकते माप दिले आहे. ग्रामविकास खात्याने ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबर महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्यावरही भर दिला आहे. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, लोकनेते राजारामबापू यांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून टाकलेल्या पाऊलांमुळे वाळवा भागाचा सर्वांगीण विकास झाला. वाळवा पंचायत समितीच्या आवारातील लोकनेते राजारामबापूंचा अर्धकृती पुतळा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. बापूंनी केलेले शैक्षणिक काम असो अथवा दुष्काळी भागासाठी केलेला संघर्ष असो हा नेहमी लक्षात राहील. राज्य शासनही अशाच लोककल्याणकारी योजना राबवित असून यातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचे काम सुरू आहे. शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबरीने नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय क्रांतीकारक आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी महिलांसाठी असलेल्या धोरणांची माहिती मनोगतात दिली. पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील यांनी गेल्या पाच वर्षात पंचायत समितीने राबविलेल्या विविध उपक्रमाचा सविस्तर आढावा मनोगतात सादर केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमामुळे जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांची माहिती सांगून या उपक्रमास लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी योगदान द्यावे, असे आवाहन करून ही चळवळ अधिक गतीमान व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी ई-लर्निंग डिजीटल स्टुडीओ व्दारे चालणाऱ्या कामांची व शैक्षणिक उपयुक्तता यावेळी विशद केली. आभार पंचायत समितीचे उपसभापती तानाजी पाटील यांनी मानले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा