मंगळवार, १५ मार्च, २०२२

बालसुधारगृहात अद्ययावत स्वयंपाकगृह व भोजनालयासाठी सीएसआर निधीमधून सढळहस्ते मदत करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 15 (जि.मा.का.) : बालसुधारगृह सांगली संस्था 1952 पासून कार्यरत असून सद्यस्थितीत या संस्थेस 100 मुले आणि 50 मुलींच्या प्रवेशास मंजुरी आहे. बालसुधारगृहामध्ये असलेल्या मुला-मुलींसाठी अद्ययावत स्वयंपाकगृह व भोजनालय यांची गरज असून त्यासाठी सुमारे 40 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. या कार्यासाठी समाजातील उद्योजक, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी पुढे येवून सामाजिक उत्तरदायित्व निधी मधून (CSR) भरीव सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. सन 1952 मध्ये अजानता गुन्ह्याला प्रवृत्त झालेल्या मुला-मुलींना तसेच अनाथ, निराधार, निराश्रीत मुला-मुलींसाठी कै. राजाभाऊ देसाई व डॉ. आशाराणी देसाई यांच्या पुढाकाराने गणेशदुर्ग राजवाड्यात बालसुधारगृह सांगली ची सुरूवात झाली. या कार्याचा हेतू व गरज लक्षात घेवून कै. राजेसाहेब चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी संस्थेस सांगली मिरज रोडवरील अडीच एकर जागा दिली. या संस्थेत 6 ते 18 वयोगटातील अजानता गुन्ह्याला प्रवृत्त झालेली बालके, अनाथ, निराधार, निराश्रीत यांना दाखल करून घेण्यात येते. बाल अधिनियम 2015 नुसार दाखल करण्यात आलेल्या बालकांची प्रारंभिक चौकशी करून त्यांना सुधारण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येते. संस्था निवासी असून दाखल प्रवेशितांना संपूर्ण निवासासह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या मुला-मुलींना निसर्गाच्या सानिध्यात एकत्र भोजन करता यावे यासाठी अद्ययावत स्वयंपाकगृह व भोजनालय यांची गरज असून समाजातील उद्योजक, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा