बुधवार, ९ मार्च, २०२२

पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च अखेर खर्च करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : पाण्यावाचून कोणतेही कुटुंब वंचित राहू नये यासाठी नळजोडणी तातडीने करून घ्या. त्याचबरोबर ज्या कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत ती पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत. पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला निधी मार्च अखेर खर्च करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) विजयसिंह जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. कदम, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे नोडल अधिकारी शितल उपाध्ये, ग्रामीण पुरवठा योजना (ग्रामीण) उपअभियंता डी. जे. सोनवणे, कनिष्ठ भूवैज्ञानिक जे. बी. वरूटे, डी. ए. मुल्ला तसेच सर्व तालुक्याचे उपअभियंता ऑनलाईन उपस्थित होते. पाण्यापासून कोणतेही गाव वंचित राहू नये यासाठी रखडलेल्या योजनांचा सर्व्हे करण्यात यावा. त्याचबरोबर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पाणीपुरवठा योजनांचे कामकाज पूर्ण करावे. जिल्ह्यामध्ये सन 2021-22 मध्ये 533 नळपाणीपुरवठा योजनांचे डीपीआर तयार करण्यात आले आहेत. यापैकी 477 योजनांना तांत्रिंक मंजुरी मिळाली असून 427 योजनांची प्रशासकीय मंजुरी झाली आहे. आत्तापर्यंत 407 यांच्या निविदा प्रक्रिया झालेल्या आहेत. तर आत्तापर्यंत 194 कामांच्या वर्कस्‍ ऑर्डर देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 155 कामे प्रगतीपथावर आहेत. आज जिल्ह्यातील नविन 17 डीपीआर तयार झालेल्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याची अंदाजपत्रकीय रक्कम 22 कोटी 10 लाख 82 हजार इतकी आहे. यामधून 3 हजार 799 नळजोडण्या करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यामध्ये 706 योजना असून यामध्ये आटपाडी तालुक्यातील 55, जत 129, कडेगाव 55, कवठेमहांकाळ 63, खानापूर 64, मिरज 60, पलूस 30, शिराळा 88, तासगाव 69 व वाळवा तालुक्यात 93 योजना आहेत. अशी माहिती देवून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, पाणीपुरवठा योजनांचा निधी 31 मार्च अखेर पर्यंत खर्च करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वर्क ऑर्डर झालेली कामे सुरू करण्यासाठी कंत्राटदारांची बैठक बोलावण्यात आली असून ही कामे तातडीने सुरू करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा