मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

पी. एम. किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभासाठी शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारी पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करावी

- सामाईक सुविधा केंद्रांमार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी 21 फेब्रुवारी पर्यंत देशव्यापी संपृक्तता मोहीम सांगली दि. 13 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार प्राधान्याने नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्ता माहे फेब्रुवारी 2024 च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवश्यक बाबीची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपृक्तता साध्यतेसाठी राज्यात दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, 3 लाख 1 हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. तथापि, राज्यातील एकूण 1 लाख 94 हजार शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी दि. 12 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आणखी 10 दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त कृषी डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. या मोहिमेदरम्यान केवळ ई-केवायसी प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रणाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन अॅप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा