शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर -पालकमंत्री सुभाष देशमुख

- कुंभारी, घाटनांद्रे, हिवरे आणि तडवळेमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी
- शेतकऱ्यांच्या भावना शासनापुढे मांडणार
- पीक कर्जमाफीतून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावांची प्रत्यक्षात पाहणी केली असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यांना भेटी देऊन दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जतचे आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळच्या आमदार सुमन पाटील, खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती तमन्नगौडा रवी पाटील आदिंसह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जत तालुक्यातील कुंभारी, कवठेमहांकाळ तालुक्यातील घाट नांद्रे, खानापूर तालुक्यातील हिवरे आणि आटपाडी तालुक्यातील तडवळे या गावांना भेट देऊन दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली. तसेच, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी अल्प पाऊस पडल्यामुळे म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचन योजनांच्या पाण्याने तलाव भरून घेण्याची मागणी केली. तसेच, पिण्याच्या पाण्याची कमतरता, जनावरांसाठी पिण्याचे पाणी चारा छावण्या, भारनियमन, वीज देयके आदींबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्यक उपाययोजना करण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी केली आहे. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल मंत्री मंडळापुढे सादर करणार असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, या दुष्काळसदृश्य पाहणीत शेतकऱ्यांनी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची तसेच उपसा सिंचन योजनांच्या पाण्याने तलाव भरुन घेण्याची मागणी केली आहे. तसेच, पावसाचे प्रमाण, खरीप रब्बी पीक पेरणी, मूग, उडीद, सोयाबीन, मका, ज्वारी आदिंसह अन्य पिकांची परिस्थिती, उत्पादनातील घट, पीक कर्जमाफी, जनावरांसाठी पाणी चारा याबाबतही शेतकऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. शेतकऱ्यांच्या भावना, त्यांची बाजू येत्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनापुढे सादर करणार आहे. राज्य शासन शेतकऱ्याप्रती संवेदनशील आहे. पीक कर्जमाफीतून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे संबंधिताना आदेश दिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
 यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, कवठेमहांकाळचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, खानापूर आटपाडीच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्यासह संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, उपअभियंता यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शेतकरी उपस्थित होते.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा