शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

रस्ते, पाणी, वीजेबाबत राज्य स्वयंपूर्ण करण्यावर भर - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : माणसाच्या जीवनावश्यक गरजा मूलभूत पायाभूत सुविधा या गुणवत्तापूर्ण पध्दतीने पूूर्ण करून रस्ते, वीज, पाणी बाबत महाराष्ट स्वयंपूर्ण करण्यासठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील विविध शासकीय विकास कामांचा शुभारंभ महसूल, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जत येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या नवीन इमारत रस्ते कामाचा शुभारंभ, आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे हायब्रीड ॲन्युएटी कार्यक्रमांतर्गत विविध कामांचा शुभारंभ, कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील विविध रस्ते कामांच्या शुभारंभाचा समावेश होता. यावेळी त्यांच्या समवेत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संचालिका निता केळकर, जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य समितीचे सभापती तमनगौडा रवि पाटील, इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात रस्ते, वीज, घरे, पाणी योजना, आरोग्य सुविधा आदि कामांमधील अनुशेष पूर्ण करून सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून अनेक योजना, अनेक उपक्रम कार्यान्वीत केले आहेत. गेल्या चार वर्षामध्ये राज्याचे रस्ते विकासावरील 1700 कोटींवरील असणारा निधी वाढवून तो 6 हजार कोटी करण्यात आला आहे. केंद्र शासनाने दिलेल्या 1 लाख 6 हजार कोटी निधीतून राज्यात 22 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गांचे दर्जेदार काम करण्यात येत आहे. तर महाराष्ट्र शासन हायब्रीड अन्युएटीच्या माध्यमातून 10 हजार किलोमीटरचे रस्ते करत आहे. राज्यात येत्या वर्ष - दीड वर्षात 30 ते 32 हजार किलोमीटरचे गुणवत्तापूर्ण रस्ते होतील. त्यातून शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेपर्यंत जलद गतीने पोहचवून शेतीमालाला चांगला दर मिळण्यास मदत होईल. ग्रामीण विकास गतीमान होईल.
राज्यात गेल्या चार वर्षात वीज निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला असून विजेच्या बाबतीतही राज्य स्वयंपूर्ण करण्यात येत असल्याचे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने शेतमालाला हमीभाव दिला आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 16 हजार गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. यातून निर्माण झालेल्या जलसाठ्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन 40 हजार कोटी रूपयांनीे वाढले आहे. टँकरने पाणी पुरवठ्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी झाले आहे. यावर्षी पर्जन्यमान कमी राहीले असले तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे.

जत उपजिल्हा रूग्णालयाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

जत येथे 50 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय इमातरीच्या बांधकामाचे भूमीपूजन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी मंगळवेढा, जत, बिळूर, सिंदूर, पारे, वायफळे रस्त्याच्या कामाचे  भूमीपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या विकास कामांच्या भूमीपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जत तालुक्यातील 42 गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कर्नाटक सरकारबरोबर बोलणी सुरू असून हा प्रश्नही लवकरच सोडविण्यात येईल. राज्यातील अनेक तालुक्यामध्ये दुष्काळ सदृष्य स्थिती असून जत तालुक्यातही दुष्काळ असल्याचे दोन टप्प्यामध्ये निदर्शनास आले आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये तिसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू असून ऑक्टोबर अखेर पर्यंत दुष्काळ घोषीत करण्यात येईल. त्यातून अशा तालुक्यांना दुष्काळी मदत मिळेल.
या कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या माध्यमातून रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने रस्त्यांची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. म्हैसाळ मधील कामांसाठीही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून  सप्टेंबर - ऑक्टोबर अखेरपर्यंत ताकारी-म्हैसाळच्या अनेक योजना पूर्ण केल्या जातील. नाबार्ड, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनांच्या माध्यमातून लोकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. जत तालुका दुष्काळी असला तरी लोक कष्टाळू आहेत. या भागाला शेतीसाठी पाणी मिळाल्यास जत तालुका मोठ्या प्रमाणावर सुजलाम सुफलाम होईल.
आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्याला रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याबद्दल तसेच संखला अप्पर तहसिल कार्यालय दिल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.

टेंभूचे पाणी गावागावात पोहोचविण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करू - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सुमारे 690 कोटी रूपयांचा विविध रस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, टेंभू योजनेचे पाणी गावागावात पोहोचविण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करू. रस्ते झाल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही म्हणून रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातील अपुऱ्या धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने 24 हजार कोटी रूपये दिले असून यातून रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होईल. कृषि पंपांच्या वीज जोडण्याबाबतचा प्रश्नही मार्गी लावण्यात येत आहे. 2022 पर्यंत देशाच्या सर्वांगीण संपूर्ण विकासाचे शासनाचे ध्येय आहे. मुंबईत टेंभूच्या पाण्यासाठी दिवाळी पर्यंत बैठक घेवून विषय मार्गी लावण्यात येईल.
या कार्यक्रमात आमदार अनिल बाबर म्हणाले, दिघंची आटपाडी परिसरातील रस्ते कामांसाठी सुमारे 225 कोटी रूपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये दिघंची - भिवघाट रस्ता, आटपाडी - शेटफळे रस्ता आणि मायणी - उंबरगाव रस्ता या कामांचा शुभारंभ आहे. शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामांवर मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशिलपणे काम करावे. ग्रामीण भागात होणाऱ्या रस्त्यांचा उपयोग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल. विशेषत: या भागातील द्राक्ष डाळींब पिकांना अधिक चांगला दर मिळू शकेल. आटपाडी तालुक्यामध्यंे महिनाभर पुरेल एवढे पाणी असून टेंभू योजनेत थोडासा बदल करून आटपाडी तालुक्यातील एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये अशी मागणी केली.

तोंडोली येथे विविध रस्ते सुधारणा कामांचा शुभारंभ

कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथे 30 कोटी 11 लाख रूपये रक्कमेच्या विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व रस्तांची कामे येत्या वर्षभरात मार्गी लावण्यात येणार असून कडेगाव तालुक्याचाही सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक माणसाला घर, गॅस, वीज, पाणी असे सुखी आयुष्य देण्यासाठी केंद्र राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कडेगाव तालुक्यात टेंभू, ताकारी योजनेचे पाणी असले तरी अद्यापही 14 हजार एकर क्षेत्राला पाणी मिळणे बाकी असल्याचे सांगून यासाठीच्या कामांना गती द्यावी असे आवाहन केले. तसेच जिल्हा परिषदेकडील 8 हजार किलोमीटरपेक्षा जास्त असणाऱ्या रस्त्यांच्या दर्जाउन्नतीसाठी निधी द्यावा अशी मागणी केली. यावेळी यशवंत पंचायत राजमध्ये सांगली जिल्हा परिषदेने मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या दौऱ्यात महसूल विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, विविध पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा