शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा...तुकाराम या गजरात १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा ग्रंथ दिंडीने शुभारंभ

पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन सांगली दि. 24 ( जि.मा.का.) : ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा... तुकाराम .. जय जय राम कृष्ण हरी..... गजरात १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्याहस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभूषा करून सहभागी झालेले युवक आणि संबळ वाद्य वाजवणारी गौरी वायचळने ग्रंथ दिंडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळस कट्टा, हाती ब्रेल लिपीत लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व मुखाने ज्ञानोबा... तुकाराम .. जय..जय राम... कृष्ण हरी... असा हरी नामाचा गजर करीत ग्रंथ दिंडीत सहभागी झालेले कै. सु.धा. घोडावत या अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ग्रंथ दिंडीत अंध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चमू सोबत वासुदेवानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कामगार साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ही ग्रंथ दिंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महापालिका कार्यालय, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रवेशद्वार या मार्गावरून बालगंधर्व नाट्यमंदिर पर्यंत काढण्यात आली. ग्रंथ दिंडीत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कामगार विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. ग्रंथ दिंडी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे पोहोचल्यानंतर विं. दा. बालमंचाचे, डॉ. शंकरराव खरात ग्रंथ दालन आणि लोकशाहीर पट्टे बापूराव कविता भिंतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा