गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : सध्या उष्णता वाढत असून नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून खबरदारी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे, शरीराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरीरातील पाणी कमी होणे ही उष्माघाताचे लक्षणे आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे - तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावीत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा, प्रवास करतांना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या कामगारांनी, व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा पांढरा रुमाल बांधावा किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यांदीचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना, पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर उन्हात काम करीत असतांना थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करावी. काँक्रीट घराच्या छतावर पांढरा रंग द्यावा. टीन पत्र्याचे छतावर गवताची पेंढी / धान्याचा कडबा यांचे आच्छादन करावे. छतावरील पाणी साठवण्याच्या प्लास्टिक टाक्या गोणपाटाच्या सहायाने झाकाव्यात. काय करू नये - लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शाररीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर कामे करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयं पाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये. त्यामुळे डीहायड्रेशन होते. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा. ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर रहावे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा