शनिवार, १७ जून, २०१७

डंख छोटा धोका मोठा

        डेंगी हा आजार विशिष्ट विषाणूमुळे होतो. या रोगांचा प्रसार एडीस एजिप्टाय नावाच्या डासामार्फत होतो. डासांची उत्पत्ती स्वच्छ, साठविलेल्या पाण्यात होते. या रोगावरील तपासणी उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये जिल्हा रूग्णालयार्मात मोफत उपलब्ध आहेत. शासनाच्या कुठल्याही उपक्रमाचे योजनेचे यशापयश हे जनतेच्या सहकार्यावरती अवलंबून असते. यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. तर जाणून घेऊया डेंगी चिकुनगुन्या आजाराविषयी.

चिकुनगुन्या डेंगी हे आजार विशिष्ट विषाणूमुळे होतात एडीस एजिप्टाय नावाच्या डासामार्फत या रोगांचा प्रसार होतो. हा डास दिवसा एकाचवेळी अनेक लोकांना चावतो. या डासाला पायवर पट्टे असल्याने "टायगर मॉस्किटो" म्हणतात. या डासांची उत्पत्ती स्वच्छ, साठविलेल्या पाण्यात उदा. रांजण, माठ, पाणी साठविण्याच्या टाक्या, पाण्याचे हौद, कुलर मधील पाणी, रिकाम्या बाटल्या, डबे, नारळाच्या करवंट्या, टायर्स इत्यादीमध्ये होते.
डेंगीची लक्षणे
         2 ते 7 दिवस तीव्र ताप डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, डोळ्याच्या खोबण्या दुखणे, अंत:त्वचा, नाक-तोंड इत्यादीतून रक्तस्त्राव, अंगावर पुरळ येणे, त्वचा थंड निस्तेज होणे, रक्तदाब कमी होणे.
चिकुनगुन्याची लक्षणे
        तीव्र ताप, तीव्र सांधेदुखी, अंगदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे, तीव्र डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. सर्व वयोगटात हा रोग आढळून येतो. दुषित एडीज एजिप्टाय हा डास चावल्यानंतर निरोगी व्यक्तीला हा रोग होवू शकतो.
चिकुनगुन्या / डेंगी तापाचा प्रसार कसा थांबविता येईल ?
        डासाचे जीवनचक्र एका आठवड्यात पूर्ण होते. त्यामुळे पाण्याचे सर्व साठे दर आठवड्याला एकदा रिकामे करावेत. या साठ्याच्या आतील बाजू तळ घासून पुसून कोरडे करून पुन्हा वापरावेत. घराभोवती फुटके डबे, वापरलेले जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साचून राहिल्यास तसेच घरातील पाणी साठविण्याचे रांजण, बॅरेल, हौद, फुलदाण्या, कुलर्स इत्यादी नियमितपणे स्वच्छ केल्यास त्यात डासाची निर्मिती होते. वापरलेल्या वस्तुची विल्हेवाट लावणे तसेच घरातील पाण्याची भंडी नियमितपणे स्वच्छ केल्यास डासांच्या निर्मितीवर नियंत्रण येईल. घराभोवतालचा परिसर स्वच्छ करून तुंबलेल्या गटारी वाहत्या कराव्यात. पाण्याची डबकी बुजवावीत अथवा त्यात जळके ऑईल टाकावे किंवा
डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. संडासच्या व्हेट पाईपला जाळी लावावी. हा आजार विषाणुजन्य असल्याने खाजगी व्यवसायिकांनी लक्षणे चिन्हावर आधारीत औषधोपचार करावा. स्टेरॉईड औषधाचा वापर करू नये. सलाईनचा जलशुष्कता असेल तरच वापर करावा. डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या सभोवतालची डबकी, खड्डे बुजवून टाकावीत अथवा त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत. कीटकनाशक फवारणीच्या वेळी सर्व घरांमध्ये फवारणी करून घ्यावी, त्यास नकार देऊ नये. तसेच फवारलेल्या भिंती सहा आठवडे सारवू नयेत.
जीवशास्त्रीय उपाययोजना
      दिवसेदिवस किटकनाशकांच्या किंमतीत होणारी वाढ किटकनाशकांचा पर्यावरणावर होणार प्रतिकूल परिणाम यांचा अभ्यास केला असता जीवशास्त्रीय उपाययोजनेला पर्याय नसल्याचे दिसून येतेच. "जिवो जिवस्य जिवनम्" अर्थात "जगा आणि जगू द्या" या उक्तीप्रमाणे गप्पी मासे हे डासांच्या अळ्यांचा खाद्य म्हणून वापर करतात. हा सर्वात सुरक्षित बिनखर्चाचा उपाय आहे.
       



,सांगली जिल्ह्यामध्ये हिवताप रूग्णसंख्या सध्या मर्यादित असली तरी, वाढते शहरीकरण, विविध प्रकल्प, वाढती बांधकामे, पाणीपुरवठा योजना, मजूर वर्गाचे स्थलांतर इत्यादीमुळे डासोत्पती स्थानात वाढ होऊन भविष्यात ही रूग्ण संख्या नियंत्रणात राहण्याच्या दृष्टिने शासकीय प्रयत्नांबरोबरच जनतेचा सहभाग सहकार्य आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून 2017 मध्ये हिवताप जनजागरण मोहिम गावपातळीपर्यंत विविध उपक्रमाव्दारे राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कीटकजन्य हिवताप आणि डेंगी आजार, लक्षणे आणि प्रतिरोध यांची माहिती 2 भागात घेऊया.
भारतातील हवामान हे हिवतापास पोषक असल्याने स्वातंत्र्य पूर्व काळापासून हिवताप हा मुळ धरून आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात हिवतापाचे 7.5 कोटी रूग्ण होते त्यापैकी 8 लाख लोकांचा हिवतापाने मृत्यू झाला. यावरून स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये हिवतापाने फारच भयानक रूप धारण केलेले होते. 1965 साली मात्र हिवताप बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेला होता. यावर्षी फक्त 1 लाख लोकांनाच हिवतापाची लागण झालेली होती. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या वर्षी एकही हिवतापाने मृत्यू झालेला नव्हता. हिवतापासाठीचे ते साल फारच आशादायक होते. परंतु 1976 नंतर आजतागायत हिवताप रूग्णांच्या संख्येत वाढत दिसून येत आहे. 1997 मध्ये 90 कोटी लोकसंख्येपैकी 24 लाख लोकसंख्या ही हिवतापाने पिडीत होती. तर त्या वर्षी 711 हिवताप मृत्यूची नोंद झालेली होती. यावरून हिवताप हा किती भयानक रोग आहे याची कल्पना येते.
हिवताप हा तीव्र ताप येणारा म्हणूनच ओळखला जातो. त्याची लागण ही अतिसुक्ष्म अशा जंतूमुळे होते. त्यास हिवताप परापजीवी जंतू म्हणतात. हिवताप झालेल्या व्यक्तीपासून निरोगी व्यक्तीच्या शरीरात हिवताप जंतूचा प्रवेश विशिष्ट प्रकारच्या डासामुळे होतो. सर्व प्रकारचे डास हे हिवतापाचा प्रसार करू शकत नाहीत. तर लाळग्रंथीमध्ये हिवताप जंतू आलेल्या ऍ़नाफेलीस डासाच्या मादीने चावा घेतला असता हिवतापाची लागण होते. (सुक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने हिवताप जंतूचे निरीक्षण करता येते) हिवताप जंतूच्या जीवनचक्राचा काही भाग मानवी शरीरात तर काही भाग डासाच्या शरीरात पूर्ण होतो. जेव्हा ऍ़नाफेलीस डासाची मादी आजारी असलेल्या व्यक्तीस चावते तेव्हा हिवताप जंतंूचा तिच्या शरीरात प्रवेश होतो. नंतर हिवताप जंतू डासाच्या पोटात प्रवेश करतात. ती हिवताप प्रसारास सक्षम बनते. हा डास जेव्हा निरोगी व्यक्तीस चावतो तेव्हा हिवतापाचे जंतू त्याच्या रक्तामध्ये सोडले जातात. त्या व्यक्तीस 14 ते 21 दिवसांनी ताप येतो. हिवतापाचा एक रूग्ण पुष्कळ लोकांना हा आजार देवू शकतो.
हिवतापाच्या मुख्यत: तीन अवस्था असतात. थंडी (कोल्ड स्टेज) - या अवस्थेमध्ये प्रथम थंडी वाजते. कापरे भरते डोके दुखते. अशा अवस्थेमध्ये रूग्णास रजई, दुलई पांघरावीशी वाटते, ओठ हातापायाची बोटे निळसर होवून कोरडी भासतात, त्वचेवरील केस उभे राहतात, ही अवस्था 15 मिनिटापासून 1 तासापर्यंत टिकते. ताप (हॉट स्टेज) - या अवस्थेमध्ये खूप ताप येतो रोग्यास अंग भाजल्यासारखे वाटू लागते. तो कपडे काढून टाकतो. रोग्यास मळमळल्यासारखे वाटते. उलट्या होतात डोके अतिशय दुखते. रोग्यास सारखी तहान लागते. नाडीची गती वाढते. ही अवस्था 2 तासापासून 6 तासापर्यंत टिकते. घाम (स्वेटिंग स्टेज) - या अवस्थेमध्ये भरपूर घाम येवून ताप उतरतो. रोग्यास गाढ झोप लागते. तो कपडे काढून टाकतो. जाग आल्यावर अशक्तपणा जाणवतो. ही अवस्था 2 ते 4 तास टिकते.         जगामध्ये आढळणाऱ्या चार प्रकारच्या हिवतापापैकी आपल्या देशामध्ये तीन प्रकार आढळून येतात त्यापैकी पी. व्हायव्हॅक्स प्रकारचा हिवताप (हिवतापाचा सर्वसामान्य प्रकार) पी. फॅल्सीफेरम प्रकारचा (मेंदूवर परिणाम करणारा मस्तिष्कज्वर) आपल्याकडे प्रामुख्याने आढळून येतात. पी फॅल्सीफेरमध्ये मेंदूचा हिवताप (मेंदूज्वर) झाल्यास तो हिवताप घातक असू शकतो. त्वरीत औषधोपचार केला नाही तर रूग्ण 2 ते 3 दिवसात दगावण्याची शक्यता असते.  पूर्वी भारतात आढळून येणाऱ्या एकूण हिवताप रूग्णापैकी सुमारे 60-65 टक्के रूग्ण हे पी. व्ही. प्रकारचे असत. सध्यामात्र ही परिस्थिती बदलत असून पी. एफ. रूग्णांची संख्या सर्वत्र वाढत आहे.
व्यक्तीगत संरक्षण - डास आपणास चावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. देशातील अनेक लोक पांघरूणाशिवाय घराबाहेर झोपणे पसंत करतात. अशावेळी डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाण्यांचा उपयोग केला पाहीजे. डासांचा त्रास टाळण्यासाठी किटकनाशकभारीत मच्छरदाणीचा वापर केला पाहीजे. डास प्रतिबंधक अगरबत्यांचा वापरही करणे आवश्यक आहे.
पर्यावरणीय नियंत्रण योजना - सभोवताली पाणी साठून राहीलेले खड्डे, डबकी बुजवून डासोत्पती स्थाने कमी करता येतात. ज्या छोट्या डबक्यातील, तळ्यातील पाणी वाहते करणे शक्य नसेल अशा डबक्यामध्ये, तळ्यामध्ये डासांच्या अळ्या खाणारे गम्बुशिया वा गप्पी जातीचे मासे सोडता येतात. इमारतीवरील टाक्या, वॉटर कुलर्स, कारंजी नियमितपणे वेळोवेळी स्वच्छ करावीत जेणेकरून डासोत्पतीस प्रतिबंध घातला जाईल. प्रत्येक सेप्टिक टँकवरील पाईपना कॅप / जाळी बसविल्याने डासांची वाढ रोखता येते.
हिवतापाचे दुष्परिणाम - हिवतापामध्ये सर्वसाधारणपणे प्रथम ताप येतो त्यानंतर यकृत प्लीहाला सूज येते. हिवताप परोपजीवी जंतूचे हे तांबड्या रक्तपेशीवर हल्ला केल्यामुळेच रक्तक्षय होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे मानवाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. भारतासारख्या देशामध्ये जर 20-30 लाख लोकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असेल तर ते देशाचेच नुकसान आहे. गर्भवती स्त्रियांना बालकांना हिवतापासून सर्वात जास्त धोका आढळून आलेला आहे. तसेच हिवताप जंतूच्या सततच्या वास्तव्यामुळे अशक्तपणा येतो वजनात घट येते त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मेंदूच्या हिवतापामध्ये वाढती डोकेदुखी, ग्लानी, जलद श्वासोच्छवास, बुध्दीभ्रम होवून रूग्ण बेशुध्द होतो. प्रसंगी मुत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. भारतात जवळ जवळ सर्व हिवताप मृत्यू हे या प्रकाराने होतात. गर्भवती स्त्रियांना हिवतापाची लागण झाल्यास प्रसंगी गर्भपात होण्याची शक्यता असते.
फोफावणाऱ्या हिवतापाला वेळीच प्रतिबंध घातला तरच मानवी जीवन हे सुसह्य होणार आहे. यासाठी हिवतापाला सर्वांनी मिळून विरोध केला पाहीजे. यासाठी मुख्यत: डासांवर नियंत्रण हिवताप रोग्यावर उपचार या दोनच पध्दती अंमलात आणावयाच्या आहेत. हिवताप जंतूचे रूग्णाच्या शरीरातील सततच्या वास्तव्यामुळे हिवतापाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी रूग्णांनी हिवतापासाठीचा समूळ उपचार घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे.
संप्रदा द. बीडकर
प्र. जिल्हा माहिती अधिकारी

सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा