मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

म्हैसाळ योजनेचे 20 जानेवारी पासून आवर्तन सुरू करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 17 (जि. मा. का.) : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी म्हैसाळ योजनेतून दि. 20 जानेवारी 2023 पासून पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिल्या. म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता श्री. रासनकर उपस्थित होते. म्हैसाळ योजनेतून पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी प्राप्त झाली असल्याचे जलसंपदा विभागामार्फत सांगण्यात आले. जे लाभार्थी शेतकरी थकीत पाणीपट्टी व चालू आवर्तनाकरीता आगाऊ पाणीपट्टी भरतील अशा शेतकऱ्यांना योजना चालू झाल्यानंतर प्रथम प्राधान्याने पाणी देण्यात येईल. तरी योजना चालू करण्याकरीता लाभक्षेत्रातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पाणी मागणी अर्ज व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा ‍विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा