मंगळवार, २७ जून, २०२३

संभाव्य गुंतवणुकीला व विकासाला चालना देऊ शकणाऱ्या विविध क्षेत्रांच्या वृध्दीबाबत 30 जून पर्यंत अभिप्राय द्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 27 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील विकासाच्या संभाव्य संधी ओळखून संभाव्य गुंतवणुकीला व विकासाला चालना देऊ शकणाऱ्या तसेच कृषी व संलग्न सेवा उद्योग (वस्तुनिर्माण सह), जलसंधारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन इत्याची क्षेत्रांच्या वृध्दीबाबत दि. 30 जून 2023 पर्यंत अभिप्राय द्यावेत. अभिप्राय गुगल फॉर्म लिंक https://forms,gle/x8sMvgSjAF4UWu1U9 वर किंवा dposangli22@gmail.com या ई-मेल आयडीवर लेखी स्वरूपात द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत - भारत @ 2047 (India @ 2047) करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंतचे नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. तसेच सन 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्ट सुद्धा साध्य करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुद्धा 2047 पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर, सन 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलर पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणे शक्य होईल असा विकास सर्वसमावेशक असेल आणि शास्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यात मदतही करेल. जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्ह्यातील नागरिक, संस्था व आस्थापनांनी 30 जून पर्यंत अभिप्राय कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा