सांगली
दि. 9 (जि.मा.का.) : सांगली
जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी
प्रशासनाने स्थळ निश्चित केले असून या ठिकाणी सदर प्रवासी स्वखर्चाने क्वारंटाईन
करण्यात येतील. यासाठी अशा प्रवाशांनी उपविभागीय अधिकारी मिरज व पोलीस प्रशासन
यांच्याशी स्वतःहून संपर्क साधावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
यांनी दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर
केला आहे. यामुळे परदेशात अडकलेले विविध कामानिमित्त गेलेले नागरिक, परदेशात
नोकरी करणारे भारतीय नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा तेथील रहिवास लांबल्याने
अनेक जण भारतात येण्यासाठी प्रयत्नशील होते. अशांना भारतात आणण्याची प्रक्रिया
सुरू झाली आहे.
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांनी आरोग्याचे सर्व
प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळणे अनिवार्य असून यामध्ये मास्क वापरणे, पर्यावरणीय
स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, हातांची स्वच्छता आदींचा समावेश आहे. विमानतळावर
उतरल्यानंतर सर्वांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार असून यात ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळतील त्यांना
तात्काळ वैद्यकीय उपचाराखाली ठेवण्यात येईल. तर उर्वरित प्रवाशांना त्यांच्या
स्वतःच्या जिल्ह्यात 14 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येईल. 14
दिवसांनंतर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना स्वतःच्या घरी
पाठविण्यात येईल, असे करताना त्यांनी पुढील 14 दिवस स्वतःच्या आरोग्याची स्वतः
निरीक्षणाची हमी देणे आवश्यक आहे. असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
त्यानुसार सांगली जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी
विद्यार्थ्यांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यासाठी स्थळ निश्चिती केली असून या
ठिकाणी सदर प्रवासी स्वखर्चाने इंस्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहेत. अशी
माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली असून जे विद्यार्थी
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण न करता स्वतःच्या थेट घरी जातील, अशा
विद्यार्थ्यांची माहिती स्थानिक लोकांनी तात्काळ प्रशासनास द्यावी, असे आवाहनही
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा