सोमवार, १३ एप्रिल, २०२०

सांगली जिल्ह्यात 94 निवारा केंद्रात 36135 व्यक्ती - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी



सांगली (जि.मा.का) 13 :जगभरात कोरोणा संसर्गाने अक्षरशः थैमान घातले आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. भारतात हा संसर्ग वाढू नये यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गापासून बचावासाठी घराबाहेर पडणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. हा काळ सर्वांसाठीच कठीण आहे. त्यातही जे आपल्या कुटुंबापासून दूर आहेत अशांसाठी, ज्यांची हातावरची पोटे आहेत अशांसाठी तो जास्त कठीण आहे.  रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी ते सद्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना आसरा देण्यासाठी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 94 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 135 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 892 लोकांना जेवण देण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 1921 व्यक्ती, तासगाव तालुक्यात 1 निवारा केंद्रामध्ये 155 व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यात 2 निवारा केंद्रामध्ये 470 व्यक्ती, जत तालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 310 व्यक्ती, खानापूर तालुक्यात 18 निवारा केंद्रात 2576 व्यक्ती, आटपाडी तालुक्यात 6 निवारा केंद्रात 788 व्यक्ती, पलूस तालुक्यात 8 निवारा केंद्रात 7648 व्यक्ती, कडेगाव तालुक्यात 18 निवारा केंद्रामध्ये 10 हजार 226 व्यक्ती, वाळवा तालुक्यात 18 केंद्रामध्ये 10 हजार 964 व्यक्ती, शिराळा तालुक्यात 2 केंद्रामध्ये 185 तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 5 निवारा केंद्रामध्ये 892 व्यक्ती आहेत. अशा एकूण 94 निवारा केंद्रामधून 36 हजार 135 व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. यामध्ये साखर कारखाना कॅम्पमधील 31 हजार 81 ऊसतोड कामगारांचा समावेश आहे. तसेच 85 एनजीओंची निवारा केंद्रात खाद्यपदार्थ वितरणासाठी मदत होत आहे. निवारा केंद्रामध्ये आसरा देण्यात आलेल्या लोकांमध्ये हॉटेल कामगार, रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक असून या सर्वांना जेवण, औषधे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत. वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. निवारा केंद्रात भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा