मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

सार्वजनिक ठिकाणी मास्क, रूमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसत असल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेणे बंधनकारक

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिनांक 14 एप्रिल 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते पुढील आदेश होईपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सर्व नागरिकांना कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते, वाहने, दवाखाने, कार्यालये बाजार इ.) तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रूमाल किंवा कापडाने नाक तोंड झाकून वावरणे बंधनकारक केले आहे.
यासाठी वापरण्यात येणारे मास्क हे प्रमाणित असलेल्या कोणत्याही औषध दुकारात मिळणारे किंवा घरगुती तयार करण्यात आलेले कापडाचे, रूमालाचे धुण्यायोग्य असावेत. तसेच त्याचा पुनर्वापर करताना स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करून वापरावेत. असे मास्क प्रत्येकाचे स्वतंत्र असावेत एकमेकांमध्ये हस्तांतरित करू नयेत. वापर झालेले सर्व डिस्पोजेबल मास्क इतरत्र टाकता त्यांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असेल. कोणत्याही नागरिकांनी किंवा शासकीय / निमशासकीय / खाजगी कर्मचाऱ्यांनी त्याचे स्वत:च्या अथवा कार्यालयाच्या वाहनातून आपल्या कार्यक्षेत्रात किंवा कार्यालय परिसरात प्रवास करताना, काम करताना बैठकीचे वेळी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी दोन व्यक्तींनी एकत्र येताना सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना, शासकीय अधिकारी, कर्मचारी इतर सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी वरील सूचनांच्या बरोबर बैठकीसाठी अथवा इतर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी एकत्र येताना परस्परात वैद्यकीयदृष्ट्या निर्धारित केलेले सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक आहे.
कोणत्याही नागरिकांस सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, धापलागणे, थकवा येणे इत्यादी कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसत असल्यास त्यांनी त्वरित सक्तीने वैद्यकीय तपासणी करून घेणे शासकीय रूग्णालयांच्या सल्ल्याने कोरोना संसर्ग तपासणी शासकीय निर्धारित ठिकाणी करून घेणे, त्याच प्रमाणे लक्षणे दिसू लागताच त्याबाबत आरोग्य / वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी कोणतेही कामकाज पार पाडताना कोविड-19 या विषाणू संसर्ग प्रतिबंध उपाययोजनांची आवश्यक ती काळजी घ्यावी. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य कुटुंबकल्याण विभागाने यासंबंधी वेळोवेळी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
सदरचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचना क्र.करोना2020/प्र.क्र.58/आरोग्य 5 दि. 13, 14, 15 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचना नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून  जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा