मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

पूरबाधित 35 हजार 853 कुटूंबांना मोफत अन्नधान्य पुरवठा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली (जि. मा. का.) दि. 20 : जिल्ह्यात आलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर पूरपश्चात उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. पूरग्रस्त कुटूंबांना तातडीची मदत म्हणून 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसीन या प्रमाणे मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 35 हजार 853 कुटूंबांना 3585.3 क्विंटल गहू व 3585.3 क्विंटल तांदूळ तर 49 हजार 215 लिटर केरोसीनचे वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
 सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 104 गावातील बाधीत कुटूंबापैकी एकूण 87 हजार 939 कुटूंबे स्थानांतरीत होती. त्यापैकी 45 हजार 293 ग्रामीण व 42 हजार 646 शहरी होती. 19 ऑगस्ट रोजी यातील 1143 कुटूंबातील 5231 व्यक्ती स्थानांतरीत आहेत. सध्यस्थितीत स्थानांतरीत व्यक्ती करीता एकूण 6 निवारा केंद्र सुरू आहेत. त्यापैकी 1 शहरी भागात व 5 ग्रामीण भागात अशी निवारा केंद्रे सुरू आहेत. शहरी भागातील एकूण 127 कुटूंबातील 634 व्यक्ती व ग्रामीण भागातील 138 कुटूंबातील 624 व्यक्ती निवारा केंद्रात रहात आहेत,

1 कोटी 11 लाख 98 हजार 150 रूपये पशुधनाचे नुकसान
पुरामुळे आजअखेर 28 व्यक्ती मयत आहेत तर पशुधनाचे अंदाजित नुकसान 1 कोटी 11 लाख 98 हजार 150 रूपये एवढे असून यामध्ये गाय व म्हैस वर्गीय 308 जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर वर्गीय 105 जनावरे, उंट, घोडा व बैल 5 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर 112, कोंबड्या व इतर पक्षी 27 हजार 402 पशुधनाचे नुकसान झाले आहे.

10 हजार 70 घरांचे नुकसान
महापुरामुळे जिल्ह्यातील 2 हजार 831 घरे पूर्णत: तर 7 हजार 239 घरे अंशत: पडली आहेत. पडझड व नष्ट झालेल्या 146 झोपड्या असून 101 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

178 वैद्यकीय पथकांमार्फत उपचार
जिल्ह्यात 178 वैद्यकीय पथके कार्यरत झाली असून या वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रात 44 वैद्यकीय पथके व ग्रामीण भागात 134 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील कॅम्पची संख्या कमी झाल्याने या पथकातील कर्मचारी 26 तात्पुरत्या उपचार केंद्रामधून रूग्णांना तात्पुरत्या उपचार सुविधा पुरविणार आहेत.

6 711 जीवनोपयोगी वस्तुंचे किट व अन्य मदत साहित्य वाटप
लोकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण प्रशासनातर्फे करण्यात येत असून 9 हजार 434 बिस्कीट पाकीटे, 64 हजार 995 पिण्याचे पाणी बॉक्स, 415 किलो दूध पावडर पाकिटे, 194 डझन मेणबत्या, 43 हजार 441 भोजन पाकिटे, 32 हजार 226 किलो रवा, साखर, आदि अन्नधान्याचे वाटप, 6 हजार 711 जीवनोपयोगी वस्तुंचे किट, 2 हजार 630 भांड्यांचे किट यांचे वाटप करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाकडील 4 मार्ग बंद
अद्यापही राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडील 4 मार्ग बंद आहेत तर 329 एटीएम पैकी 56 एटीएम बंद अवस्थेत आहेत. उर्वरित कार्यरत असलेल्या एटीएम मधून 49.80 कोटी निधी उपलब्ध आहे.

मृतांच्या वारसांना आतापर्यंत 1 कोटी 15 लाख रूपयांची मदत वितरीत
28 मयत व्यक्तींपैकी 19 मयत व्यक्तींच्या वारसांना रूपये 4 लाख सानुग्रह अनुदान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रूपये 1 लाख असे 5 लाख रूपये या प्रमाणे एकूण 95 लाख रूपयांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. अन्य 5 व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान प्रत्येकी 4 लाख रूपये या प्रमाणे एकूण 20 लाख रूपये असे एकूण 1 कोटी 15 लाख रूपये वितरीत करण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 6 मयत व्यक्तींना प्रत्येकी 1 लाख रूपये अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
000000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा