मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

पूरबाधित कुटूंबाना 42 कोटीहून अधिक सानुग्रह अनुदान वितरीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

- 23 हजार 317 घरांची पडझड
- जीवनावश्यक वस्तूंचे 16 हजार 998 किट वितरीत
-  पूरबाधित 64 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप

सांगली, दि. 27 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. ग्रामीण भागातील 43 हजार 67 व शहरी भागातील 31 हजार 757 कुटूंबांना 37 कोटी 41 लाख 20 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 9 हजार 303 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 4 कोटी 66 लाख 65 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

23 हजार 317 घरांची पडझड
पूरामुळे जिल्ह्यातील 7 हजार 424 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 15 हजार 893 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 828 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू असून शहरी भागातही मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे, वाणिज्यिक पंचनामे सुरू झाले आहेत. पूरबाधित वाणिज्य मिळकतीची नुकसान झालेली 88 गावे बाधित असून 16 हजार 177 मिळकती आहेत. त्यापैकी 8 हजार 378 पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे गतीने सुरू आहेत.

पूरबाधित 64 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
दिनांक 26 ऑगस्ट अखेर 64 हजार 795 कुटुंबांना एकूण 6479.5 क्विंटल गहू व 6479.5 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 46 हजार 544 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 2 लाख 32 हजार 720 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.

47420.66 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 96 हजार 431 शेतकऱ्यांच्या 49425.75 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.

95 पाणीपुरवठा योजना सुरू
जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सध्या 96 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 22 गावांसाठी एकूण 23 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 14 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे 16 हजार 998 किट वितरीत
राज्यभरातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या विविध मदतीचे वितरण महानगरपालिका व पूरबाधित तालुक्यांना करण्यात आले आहे. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे 16 हजार 998 किट पाठविण्यात आले असून त्यामध्ये महानगरपालिका 6536, मिरज 7581, शिराळा 711, वाळवा 1110, पलूस 1060 एवढ्या किटचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही किट बनविण्याचे काम सुरू असून जसजसे किट तयार होतील तसे त्याचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 25 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 304 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 55.17 कोटी इतका आहे.
000000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा