सांगली (जि. मा. का.) दि. 20 : सांगली व
कोल्हापूर ही दोन्ही शहरे जुळ्या शहरांप्रमाणे असून यावेळच्या महापूरा प्रमाणे
भविष्यात आपत्ती उद्भवल्यास त्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी कायमस्वरूपी सुसज्ज
यंत्रणा आवश्यक आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात भेट देवून त्यांनी महापुराने उद्भवलेली स्थिती व पूरपश्चात करण्यात येत
असलेल्या उपाययोजना यांची माहिती घेतली. यावेळी महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी
डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस
अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, विशेष कार्य अधिकारी
रविंद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे आदि उपस्थित होते.
सांगली व
कोल्हापूर या ठिकाणी महापूराप्रमाणे कोणतीही भीषण आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा
मुकाबला करण्यासाठी संयुक्त, सक्षम यंत्रणा असावी, असे मत व्यक्त करून खासदार
संभाजीराजे छत्रपती यांनी अशा कोणत्याही प्रसंगी सांगलीला तात्काळ मदत उपलब्ध
होण्यासाठी विमान धावपट्टीची अत्यंतीक आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी
त्यांनी पाटबंधारे विभागाची यंत्रणा, मशनरी अधिकाधिक हायटेक होणे आवश्यक असल्याचे
सांगून खाजगी विमा कंपन्यांचे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा
करू असे सांगितले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा