शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

पूरबाधित 50 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 23 (जि.मा.का) : सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज व शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुरामुळे सुमारे 104 गावे बाधित झाली. मदत व पुनर्वसनासाठी पूरपश्चात उपाययोजना अत्यंत गतीने सुरू आहेत. 22 ऑगस्ट अखेर 50 हजार 953 कुटुंबांना एकूण 5095.3 क्विंटल गहू व 5095.3 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 26 हजार 909 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 1 लाख 34  हजार 545 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाकडील सर्व रस्ते सुरू झाले आहेत. 288 एटीएम कार्यरत असून 41 एटीएमची दुरूस्ती सुरू आहे. सुरू असलेल्या एटीएम मधून अंदाजे 53 कोटी 67 लाखाची रक्कम उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

15 हजार 861 घरांची  पडझड
 पुरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत पूर्णत: पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या 5357 आढळून आली असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या 10 हजार 504 आढळून आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील एकूण 101 गोठ्यांना पण पुराची बाधा झाली आहे. तसेच पडझड / नष्ट झालेल्या झोपड्या 146 आहेत.

90 पाणी पुरवठा योजना सुरू
जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पुरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सद्या 90 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पुरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 38 गावांसाठी एकूण 43 टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून 2 खाजगी बोअर / विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 27 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा