रविवार, २२ मार्च, २०२०

जनता कर्फ्यू 23 मार्च रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार 23 मार्च ते 31 मार्च या काळात कलम 144 लागू - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : रविवार, दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु असणाऱ्या जनता कर्फ्यू ची वेळ वाढविण्यात आली असून दिनांक 23 मार्च रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत जनता कर्फ्यु सुरू राहणार आहे. या काळात एकही व्यक्ती, एकही वाहन घराबाहेर येऊ नये, असे निर्देशित करण्यात आले असून यातून अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय तातडीची निकड या बाबी वगळण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दिनांक 23 मार्च सकाळी पाच वाजल्यापासून 31 मार्च 2020 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी भारतीय दंड संहिता कलम 144 लागू करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
 कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत संवेदनशीलपणे व गतिमानतेने उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवार, दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व भारतवासीयांनी जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व जिल्हावासियांनी घराबाहेर न पडून जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद देत यशस्वी करावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला सर्व जिल्हावासियांनी संपूर्ण प्रतिसाद देत जनता कर्फ्यू यशस्वी करून कोरोना विरुद्धच्या लढाईत सक्रिय योगदान दिले. याबद्दल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व जनतेचे आभार मानले आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा