सोमवार, २३ मार्च, २०२०

पाळीव प्राण्यांना मोकाट सोडल्यास कारवाई

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पाळीव प्राण्यांना मोकळे सोडून दिल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. असे पाळीव प्राण्यांच्या पालकाने केल्यास हे कृत्य प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे समजले जाऊन प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त मिरज यांनी दिली.
पाळीव प्राणी जसे कुत्रा, मांजर, कोंबड्या इत्यादीच्या मार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावतो हा गैरसमज असून या प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. त्यामुळे या प्राण्यांचे पालकत्व पत्करलेल्या लोकांनी घाबरून आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देवू नये. त्यामुळे प्राण्यांची उपासमार होऊ शकते. उपासमारीमुळे अथवा आजारामुळे, अपघातामुळे त्यांना अपंगत्व अथवा मृत्यूस करणीभूत ठरणार नाही, याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी. याबाबत अफवा पसरणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. असे झाल्यास प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा